बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

आयुष्याची आता झाली उजवण...

सखे, माझा मित्र जय जोशी याने विचारले की, ‘मृत्यू, नकारात्मक असेच का लिहिता?’ तेव्हा थोडा विचारात पडलो. आपले लिखाण नकारात्मक तर होत नाही ना, असा एक प्रश्न स्वत:ला पडला. ‘मृत्यू’ हा अटळ विषय नकारात्मक नाही. आपण त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. त्याला टाळतो. या विषयावर भाऊसाहेब पाटणकर यांनी खूप चांगले विचार मांडले आहेत. मला आवडतात ते बा. भ. बोरकरांचे विचार. मृत्यूकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फारच सुंदर आहे. विशेषत: ‘मृत्यू यावा’ असं वाटण्याच्या स्थितीकडे पाहण्याचे वेगळेपण. ती सार्थक, तृप्त आणि परिपक्व आयुष्य जगल्याची खूण आहे. 

सखे, त्यासाठी तुला बोरकरांची आयुष्याची आता झाली उजवण, ही कविता ऐकावी लागेल. सलिल कुलकर्णी यांनी ती  ‘संधिप्रकाशात’ या कवितेशी जोडून सादर केली आहे. आयुष्याची झाली उजवण ही मृत्यूपूर्वीची देवाकडे केलेली अपेक्षा आहे, तर संधिप्रकाशात ही सखीकडे मृत्यूनंतर केलेली अपेक्षा आहे. ‘आयुष्य कसं कृतार्थ जगून दाखवलंय’ या संचितावर देवाला भक्तीने आणि सखीला प्रेमाने केलेली प्रार्थना म्हणजे या दोन कविता आहेत. 

सखे, उजवण या शब्दाला दोन अर्थ आहेत. भूमी, वस्त्र, मनुष्य इत्यादींची ऊर्जित अवस्था म्हणजे उजवण हा एक अर्थ. उजवण म्हणजे समाप्ती, अखेर असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ घेतल्यास त्या जागी, तो शब्द अगदी योग्य ठरतो. ऊर्जित किंवा समाप्तीची अवस्था आयुष्याला प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे दु:ख नाही उरत. कारण, बोरकर म्हणतात की, येतो तो तो क्षण अमृताचा. प्रत्येक क्षण अमृताचा असेल, तर मृत्यू कसा संभवेल? मग ती अवस्था कोणती? चैतन्यात विलीन होऊन जाणे, सद्-चित-आनंद होणे ही ती अवस्था.

सखे, आयुष्याची कृतार्थता स्थितप्रज्ञतेत आहे. मागणी किंवा अपेक्षा आणि तक्रारी थांबल्या की आपण स्थितप्रज्ञ होत जातो. वेगळं काही करण्याची आवश्यकता राहत नाही. ‘तो करी तो परमार्थु’ या अवस्थेला आपण येऊन पोहोचतो. ज्याला हात लावू तो दगड, धोंडा इतरांसाठी परीस, चिंतामणी होतो. ज्या पाण्याला स्पर्श करू, ते पाणी गंगोदक होते. कुठलातरी परीस माझ्या आयुष्याचे सोने करेल, कुणीतरी चिंतामणी नावाचा दगड माझ्या चिंता हरण करेल,  या अपेक्षाच शिल्लक राहत नाहीत. एवढेच नव्हे तर स्वर्गीच्या नवलाईचे कौतुकही उरत नाही. जे जे स्वर्गात जाऊन मिळवायचे ते ते सर्व इथे या गोव्याच्या भूमीने मला दिले आहे, हा सार्थ अभिमान झळकतो. पृथ्वीवरल्या नश्वर गोष्टींची फिकीर उरत नाही ती नाहीच, त्याही पुढे जाऊन त्या ईश्वराचीही फिकीर, कौतुक उरत नाही.

सखे, आपण जे पाहतो, ते परब्रह्माचेच प्रतिबिंब असते. फक्त जे दिसते ते कायम टिकणारच आहे, असे आपण धरून चालतो. ब्रह्म, चैतन्य कायम आहे, त्याचे झालेले प्रकटीकरण न टिकणारे किंवा बदलत जाणारे आहे, हे सत्य आपल्याला मान्य नसते. आपल्यासह या सर्व स्थिरचराला ‘एक्स्पायरी डेट’ आहे, हे आपण नाकारतो. आपणच चैतन्य आहोत याची जाणीव झाली की, आयुष्य कृतार्थ होते. 

सखे, या ब्रह्मचैतन्यात विलीन व्हायची ओढ लागते. सासरी येताना संपून न संपणारी वाट, सासरहून माहेरी जाताना मात्र लवकर संपते. वाट तीच असते, अंतर तेच असतं. हृदयीचा जिव्हाळा पायीं आला की पावलांनाही स्थळकाळाचे भान राहत नाही. आतबाहेर आनंद भरून राहतो. श्वास कस्तुरीसारखे परिमळतात. बोरकरांंनी इथे दरवळ असा शब्द न वापरता परिमळ असा शब्द वापरला आहे. दरवळ सुरुवातीला खूप उग्र असतो, नंतर हळूहळू कमी कमी होत जात नाहीसा होतो. परिमळ हा कायम तसाच राहतो, तो उग्र नसतो आणि नाहीसाही होत नाही. आतबाहेर आनंदी असलेला माणूस, सकारात्मक ऊर्जेने भारलेला असतो. त्याचा सहवास इतरांनाही आनंदी करतो. अगदी कस्तुरीसारखा.

सखे, ही रडकी, नकारात्मक अवस्था अजिबात नाही. हा सुखाचा उत्सव आहे. तरीही त्याचे अप्रूप नाही. ‘शिव’ होण्यासाठी ‘जीव’ अनावर झालेला आहे. सोनेरी पिंजर्‍यात अडकलेला हा जीव चैतन्यमयी होण्यासाठी आतुर आहे. 

सखे,  बोरकरांची ही कविता म्हणजे मृत्यूपूर्वी कशी अवस्था असावी, याचा वस्तुपाठ आहे. तृप्त आयुष्य जगल्यानंतर चैतन्यमयी होण्याचं मागणं आहे. इथे रडारड नाही. चैतन्यमय होण्याचं साधन म्हणून मृत्यूकडे पाहिलं आहे. मरण येत नाही म्हणून जिवंत असणं नाही. जिवंत असणं असह्य झालं म्हणून मरण हवंय असंही नाही. उलट इतरांना जेव्हा, ‘आता मृत्यूने येऊच नये’, असे वाटेल अशावेळी केलेली मृत्यूची मागणी आहे. तृप्त, कृतार्थ आणि व्रतस्थ आयुष्याचं हे उद्यापन आहे, ही उजवण आहे.


रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

इस मोड से जाते हैं...

सखे, तू हळूहळू माझ्यापासून दुरावत गेलीस. तुझं वय आणि आमच्यातील अंतर वाढत गेलं. तुझं वयात येणं आणि आमचं दुरावणं हातात हात घालून चालत होतं. त्यांची ही संथ गतीच फार भयानक होती. तू पेन ड्राइव्ह हातात न देता, टेबलवर ठेवलास, त्यातून तू हे दुरावणं दाखवून दिलंस. तुझ्यापाशी येणार्‍या माझ्या सगळ्या वाटा तू बंद केल्याचा तो संकेत होता. तुझ्यापाशी घेऊन जाणारी एकही वाट माझ्याकडे नव्हती. 

सखे, आपली वेदना गीतातून ऐकावी, छान वाटते. एरव्ही वेदना ठसठसते, त्या वेदनेचं गीत झालं की, वेदना झंकारते. माझ्याप्रमाणे तूही गुलजार यांचं आंधी चित्रपटातलं ‘इस मोड से जाते हैं’, हे गीत ऐक. त्यातील ‘इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है’, ही ओळ लक्षपूर्वक ऐक. सगळी वेदना या एका ओळीत सामावली आहे. सगळ्या वाटा बंद झाल्यानंतरचा मार्ग, गुलजार यातून दाखवतात. सन्मार्गावर चालणार्‍यांच्या पावलांची चाळण होते, तर हेतूवरच शंका घेतल्याने हृदयाची चाळण होते. माझ्या एका सन्मित्राचा हा शेर तुलाही आवडेल;

रक्ताळलेली, फाटलेली होती पावले त्याची
आजन्म बहुधा सन्मार्गावरून चालला असावा

सखे, सन्मार्ग आणि प्रेमाचा मार्ग कधीच निष्कंटक, साधा, सरळ नसतो. तसा आपल्या आयुष्याचा रस्ता, जगण्याच्या पाऊलवाटाही सरळ वळणाच्या नसतातच. काही पायवाटांना रस्तेच सापडत नाहीत. त्या अंतहीन प्रवास करत राहतात. खास करून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार्‍या पाऊलवाटा. तुझ्या देहाशी नव्हे तर तुझ्या हृदयाशी पोहोचायचं होतं, खूप दूरवर जाणार्‍या पाऊलवाटेचा हा न संपणारा प्रवास माझ्याबरोबरच संपेल कदाचित.

सखे, माझ्यासारखीच तूसुद्धा मनस्वी आहेस. दूर गेलेली आपुलकी हे मनस्वी माणसाचं सर्वांत मोठं दु:ख असतं. एकाच घरात राहत असल्याने जवळ जाण्याच्या वाटा, रस्ते असा प्रश्नच नसतो. त्यामुळेच, आपण जवळ असूनही खूप दूर असतो. ओळखीचे असूनही अनोळखी असतो. 

सखे, ओळख व्हायच्या आधी संवाद साधण्याचे अनेक मार्ग असतात. ओळख झाल्यानंतर या वाटाच हरवतात. वाटांची आवश्यकताच नसलेल्या गावी येऊन आपण पोहोचतो. खूप जवळ असलेल्या व्यक्तीकडे घेऊन जाणारी एखादी वाट शोधत राहतो.

सखे, दूर गेलेल्या आपल्याच जवळच्या माणसापाशी घेऊन जाणार्‍या तयार वाटा नसतातच. त्या तयार कराव्या लागतात. कधी अहंकाराची झुडपं कापून, तर कधी आपल्यालाच तुडवून ही वाट तयार करावी लागते. 

सखे, इतकं करूनही आपलं माणूस गवसेल, हे नक्की नाही सांगता येत. पण, प्रयत्न तर करावेच लागतात. कधी कधी जेथे पोहोचायचे आहे, त्यापेक्षाही तेथे जाण्याचा प्रवासच खूप काही देऊन जातो. मग, आयुष्याच्या कुठल्यातरी एका वळणावर स्थिरावलेली माणसं इतरांना सांगतात, 

‘इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे...’

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे

‘तो आता माझा नाही उरला...’

अगं झालं काय ते तरी सांगशील? मघापासून नुसते हुंदके. चला काही चार शब्द ऐकू आले तर तेही असंबद्ध. काय सखे, काय झालंय? तो काही म्हणाला का तुला?

‘हे बघ! तू त्याची बाजू घेणार असशील तर मी सरळ निघून जाईन. संपवेन स्वत:ला. तुलाही ऐकून घ्यायचं नसेल, माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर मग जगून काय फायदा?’ 

सखे, माझ्या एवढ्या बोअरिंग प्रवचनांचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही का गं? एकही विचार त्यातून तुला घ्यावासा वाटला नाही का गं? गुण नाही निदान वाण तरी लागायला हवा होता. मारक्या म्हशीसारखी नको बघूस आता. ते जाऊ दे. मी त्याच्या किंवा तुझ्या बाजूचा नाही गं, तुमचाच आहे. तू माझी सखी आहेस. मरणाआधी मरणं आपल्याला जमत नाही, पटतही नाही. पूस पाहू डोळे. काय झालं सांग.

‘तुला माहितीय सगळं. तूच तर साक्षीदार आहेस आमच्या प्रेमाचा. त्यानंही तुझाच सल्ला घेतला होता आणि मीही तुझाच.’

अरे देवा! देशील बर्व्या पुन्हा प्रेमाचे सल्ले देशील? 

‘मी तुला ब्लेम करत नाही. समजून घेऊ शकशील असा तूच आहेस, म्हणून सांगते. त्याचं आता प्रेम नाही राहिलं माझ्यावर. त्याच्यावर प्रेम करणार्‍या त्या सुनितेची याला काळजी. जे हवं ते मिळाल्यावर लग्न झालेले सगळे पुरुष मेले असेच वागतात. तू हसू नकोस रे. वंदनाला विचारेन मी.’ 

सखे, हसू नको तर काय करू? सगळ्या पुरुषांना एकाच मापात मोजणं बरं नव्हे. 

‘ते जाऊ दे. मरणाची इच्छा नाही. पण, जगणंच ओझं झालं आहे. त्याचं प्रेम नाही तिच्यावर हे मान्य आहे. पण, माझा काही विचार नको करायला का त्याने? आमच्यातलं नातं बिघडत चाललं आहे, ते कसं सावरावं हेच कळत नाही.’

सखे, रिलॅक्स हो. तुझ्यामाझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करतो. तोपर्यंत तू लताचं ‘रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे’ हे गाणं ऐक. माझ्या आवडत्या मदन मोहनचं गाणं आहे. नक्श लायलपुरी यांना जे सांगायचं आहे, ते थेट हृदयात पोहोचवणारा सूर लताकडे आणि सुरावट मदनमोहनकडे आहे. डोळे मीट आणि ऐक. तोपर्यंत कॉफी बनवतो.

‘ऐकलंय रे. हजारवेळा ऐकलंय. मग आता काय वेगळं समजणार आहे?’

सखे, या अजरामर गीतांची खासियतच ही आहे की, जेवढ्या वेळा ऐकावं तितकी ती नव्याने समजतात. प्रत्येक वेळी अर्थाची एक वेगळीच छटा समोर येते, जिचा आधी कधी अनुभवच नसतो. कदाचित त्या शब्दांचा अर्थ ऐकल्याक्षणी समजतो, पण पटायला तसा अनुभव यावा लागतो. तुला जे दु:ख झालंय ते आधी तुला नव्हतं, म्हणून तू मुद्दाम हे गीत ऐक. या गीतात एकूण पाच वेळा ‘कैसे’ हा शब्द येतो. पण, प्रत्येकवेळी लतादीदीने तो वेगवेगळा गायला आहे. स्वरातलं मला काही कळत नाही. पण, वेदना सुराला चिकटली की तो सूर प्रत्येकवेळी वेगळीच अनुभूती देऊन जातो. आपल्याच लोकांनी उभ्या केलेल्या आपल्यातल्या भिंती पाडणार तरी कशा, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाला हजारो पद्धतींनी सांगता येईल पण, ज्या हृदयाने ते सांगायचं आहे, तेच भंगलेलं असेल तर सांगावं कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाचं ओझं कितीही असतं तर उचललं असतं पण, आयुष्यच ओझं झालं तर ते उचलावं तरी कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ तर अगदीच वेगळं. या प्रत्येक ‘कैसे’तलं वेगळेपण वेदनेची वेगळी अनुभूती देऊन जातं. आपलीच वेदना आपल्याला इतक्या प्रभावीपणे ऐकू येते की, आपणही तिला सहज दाद देऊन जातो. आपल्या वेदनेचं आपण दु:ख करतो. आपली वेदना आपल्याला दु:ख देऊन जाते. पण तीच वेदना लता ऐकवते आणि आपली दाद घेऊन जाते. 

सखे, तुला येत असलेला अनुभव थोड्या फार फरकाने प्रत्येक संसारात येत असतो. आपल्याला त्रास देणारी माणसे आपलीच असतात. त्या त्रासापेक्षाही ती आपली असतात याचंच जास्त दु:ख असतं. ती परकी असती, तर एका मिनिटात प्रश्न सुटतो. हे न सुटणारे प्रश्न अर्जुनापासून द्रौपदीपर्यंत सगळ्यांना पडले व पडत आहेत. उत्तरेही कृष्णाने दिलेली तीच आहेत. वेगळी अजिबात नाहीत. तुला एक प्रश्न विचारतो. तुला त्याच्या मनाची मालकी हवी की शरीराची मालकी हवी आहे?

‘दोहोंपैकी एक हा पर्याय ठेवत आहेस का? तो शरीरानं आणि मनानंही माझाच असावा, असं वाटतं. काही चूक आहे का त्यात?’

सखे, दोन्ही हवं असल्यास दोन्हीवरची मालकी पूर्णपणे सोडावी लागेल. 

‘हा शुद्ध वेडेपण आहे. असं प्रत्येक स्त्री करू लागली तर पुरुषांना रान मोकळंच मिळेल. त्याची काही जबाबदारी उरणारच नाही. तसंही, ‘सगळं हवं तर सगळं सोड’ हे काय लॉजिक आहे? तुझं नेहमी काही तरी वेगळंच असतं. नाही पटत.’

सखे, प्रत्येकीनं असं करावं असं मी नाही म्हणणार. पण, तू तसं करावंस असा माझा आग्रह आहे.  नीट ऐक, मी मालकी सोडायला सांगितली आहे, त्याला नाही. 

‘हे काय भलतंच?’

सखे, नवरा मालक नसतो आणि बायको मालकीण नसते. पण, तरीही दोघे एकमेकांवर मालकीहक्क गाजवत असतात. प्रेमाचा हक्क असावा, हक्काचं प्रेम असू नये. 

सखे, द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट जशी महाभारतात आहे, तशी न सांगता थोडी वेगळी सांगतो. दु:शासन जेव्हा द्रौपदीचं वस्त्र ओढू लागतो तेव्हा एकवस्त्रा असल्याने ती पदर घट्ट धरून ठेवते. कृष्णाचा धावा करू लागते. कृष्ण येत नाही. ती याज्ञसेनी रडू लागते, त्याला हाका मारते, तरीही तो येत नाही. दु:शासनाच्या बळापुढे तिचं काही चालत नाही. ती पदराचा नाद सोडून देते. घातलेल्या निर्‍या घट्ट पकडते. तिची अब्रू वाचवणारी ती शेवटची गोष्ट असते. उघडे पडू नयेत म्हणून एक हात वक्षांवर असतो व दुसर्‍या हाताने निर्‍या घट्ट धरून ठेवलेल्या असतात. तशातही कृष्णाचा धावा सुरूच असतो. कृष्ण काही येत नाही. द्रौपदीला खूप दु:ख होतं. दु:शासनाच्या बलप्रयोगापुढे ती हतबल असते. त्याहीपेक्षा आपण धावा करूनही आपला कृष्ण येत नाही, याचं  तिला दु:ख वाटत असतं. शेवटी काय व्हायचं ते होवो, असं म्हणत सावरण्यात गुंतलेले दोन्ही हात वर करून ‘कृष्णा....’, अशी आर्त हाक मारते. 

सखे, एकच असलेलं तिचं वस्त्र दु:शासनाच्या हातात असतं, तिच्या अंगभर वस्त्रे असतात आणि कृष्ण हसत उभा असतो. अश्रूभरल्या डोळ्यांनी द्रौपदी विचारते, ‘कृष्णा, कुठे होतास?, किती उशीर केलास रे यायला.’ हसत हसत कृष्ण म्हणतो, ‘द्रौपदी मी इथेच तर होतो. जसा मी सर्वत्र आहे, तसाच इथेही आहे, हे तुला माहीत होतं. पण, आला नाही तर, आपण सर्वांसमोर नग्न झाले तर, याची तुला भीती होती. त्यावेळी, सगळं जग, तू आणि मी इथे होतो. मग त्या भीतीची जागा ‘माझा असूनही येत नाही’ या दु:खाने घेतली. तेव्हा जग विसरलीस, फक्त तू आणि मी होतो. जेव्हा तू भीती आणि दु:ख दोन्ही सोडलेस, स्वत:लाही विसरलीस, तेव्हा जग नव्हतं, तू नव्हतीस, फक्त मीच मी होतो. मान खाली घालून बसलेले पांडवही मीच होतो, मदांधतेने हसणारे कौरवही मीच होतो, द्रौपदीही मीच होतो, वस्त्र ओढणारा दु:शासनही मीच होतो. एवढेच कशाला ते वस्त्रही मीच होतो. याची तुला माहिती होती, त्याच माहितीचे ज्ञान झाले तेव्हा मी दिसलो. 

सखे, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं, त्याला आपण बंधनात बांधून ठेवू पाहतो. आपल्या पोटच्या पोरावरही इतकं प्रेम करतो, की ते पोर त्या प्रेमानेच घुसमटतं. प्रेम सर्वत्र आहे. आपण त्याला आडाख्यांमध्ये बांधू पाहतो. अमुक एखादी गोष्ट केली तर प्रेम आहे, नाही केलं तर प्रेम नाही, असले आडाखे नाती संपवतात. हजारो पहारे बसवलेस तरी व्यभिचार करणारा माणूस, संधी मिळताच केल्याशिवाय राहणार नाही. 

सखे, सुनिताचं दु:ख हे त्याचं आहे म्हणून ते तुझंही आहे. आपण सगळे आधी मित्र होतो, तेव्हाही तुझा नवरा इतरांचे प्रॉब्लेम्स सोडवायचा, मदतीला धावून जायचा. तेव्हा तुला त्यानं मैत्रिणीला केलेली मदत त्रास देत नव्हती. आता काय बदललंय? तेव्हाही तुमचं एकमेकांवर प्रेम होतं, आजही तसंच आहे. फरक इतकाच झालाय की, तुम्ही नवराबायको झाले आहात. हक्क म्हणजे प्रेम आणि हक्कभंग म्हणजे प्रेमभंग झालाय. 

सखे, प्रेम करायचं नसतं, ते होतं. ते ‘होणं’ फक्त सांभाळायचं असतं. प्रेम होण्यावर भाळणं सोपं, सांभाळणं कठीण. गाठीशी असलेलं सगळं सोडून द्यावं लागतं. प्रसंगी, ते प्रेमही सोडावं लागतं. 

सखे, तुमच्या दोघांतलं प्रेम, तुमच्या दोघांत, अवती भवती आणि सगळीकडे आहे. अगदी, कृष्णासारखं. ते शोधू गेलीस, तर सापडणार नाही, पाहू गेलीस तर दिसणार नाही. त्याला जसं आहे, तसंच राहू दे. असं केलंस तर कुठल्याही भिंती आड येणार नाहीत, मन मारावं लागणार नाही किंवा  मन मोडणार नाही आणि आयुष्य ओझं वाटणार नाही! 


शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

लीनते, चारुते, सीते...

सखे, ‘किती यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते लीनते, चारुते, सीते’ हे गीत आणि यातली शेवटची ओळ जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात. अक्षरश: रडतो. आतल्या आत कोसळतो. तूसुद्धा हे गीत मुद्दाम ऐक. वाल्मिकी रामायणाशी पूर्णपणे प्रामाणिक राहून लिहिलेले हे गीत श्रीरामांची त्यावेळची भावना व्यक्त करतात. हे गीत तू पूर्णपणे लक्ष देऊन ऐक. त्यानंतर तू धाडलेली हिंदी कवी राजेश्वर वशिष्ठ यांची ‘जानकी के लिए’ ही कविता पुन्हा वाच. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन तुझ्या लक्षांत येतील. सर्वांत आधी वाल्मिकी रामायणातील युद्धकांडाचे ११२ ते १२० हे सर्ग वाच. म्हणजे राजेश्वर वशिष्ठ यांची कविता, गदिमांचे काव्य आणि त्यांचा दृष्टिकोनही समजेल. ‘लीनते चारुते सीते’ ऐकताना मला का रडू कोसळते, तेही तुला समजेल. सीतेला पूर्णपणे असलेली श्रीरामाची जाणीव,  तुलाही होईल.

सखे, श्रीरामांनी हनुमंताला विभीषणाची अनुज्ञा घेऊन सीतेला आपल्यासह सर्व सक्षेम आहेत व रावणाला मारून युद्ध जिंकल्याचा निरोप द्यायला सांगितलं. युद्ध जिंकूनही लंका रामाची नव्हती. ती विभीषणाची होती. त्याची अनुज्ञा घेऊन सीतेला निरोप द्यायला सांगितला. आपण स्वत: भेटायला गेले नाहीत. हनुमंताकरवी दिलेला निरोपही बारकाईने वाचण्याची आवश्यकता आहे. हनुमंताने सीतेचा निरोप श्रीरामांना दिल्यावरही, श्रीरामांनी विभीषणाला तिला घेऊन यायला सांगितले. सीता आंघोळ न करताच शिबिकेत बसायला निघते तेव्हा, विभीषण म्हणतो, ‘सचैल स्नान करून, उत्तम वस्त्रे, आभूषणे धारण करून यायला श्रीरामांनी सांगितले आहे.’ त्यानंतर सीता डोक्यावरून आंघोळ करते, वस्त्रे, आभूषणे धारण करते. शिबिका सरळ रामाजवळ घेऊन यायला श्रीराम मनाई करतात. तेव्हा सीतेला पडद्याआडून आणावे, अशी सूचना विभीषण करतो, ज्याला राम विरोध करतात. जिच्यामुळे हे भयानक युद्ध झाले तिला युद्धात सहभागी झालेल्या व हयात असलेल्या सर्व सैनिकांनी पाहावे, अशी त्यांची इच्छा होती, म्हणून सीतेला पायी चालत यायला सांगितले. याचा सीतेला त्रास झाला किंवा वाईट वाटले, असे चित्रण वाल्मिकी करत नाहीत. श्रीरामांना भेटण्याची तिची ओढच इतकी तीव्र होती की, रघुवंशाच्या स्त्रीला तिचे स्त्रीत्व ठसेल म्हणून मुद्दाम केलेल्या या गोष्टी तिच्यासाठी गौण ठरणे साहजिक आहे. 

सखे, त्यानंतर श्रीरामांनी जे काही सीतेला सांगितले, ते वाल्मिकींपेक्षाही गदिमांनी उत्कटपणे सांगितले आहे. ते ऐकल्यावर सीता काय म्हणाली, हेसुद्धा वाल्मिकी रामायणातील प्रत्येक शब्दावर लक्ष देत वाचण्यासारखे आहे. त्यानंतर लक्ष्मणला चिता पेटवायला सांगून सीता श्रीरामांना परिक्रमा घालते, तेव्हा श्रीराम मान खाली घालून उभे असल्याचे वर्णन वाल्मिकींनी केले आहे. 

सखे, रामायणात श्रीराम स्वत:ला कधीच देव, भगवान असे म्हणत नाहीत. उलट, ‘आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्’, असे म्हणत आपण माणूस असल्याची ग्वाही ते अनेक ठिकाणी देतात. याच्या अगदी उलट महाभारतामध्ये श्रीकृष्ण आपण भगवान असल्याची ग्वाही देतात. स्वत:ला ‘वासुदेव’ म्हणण्याचा आग्रह धरतात. सोळा सहस्र नारींना स्वत:चं नाव देण्यासाठी भगवान व्हावं लागतं. आपल्या मनात यत्किंचितही शंका नसताना, प्राणप्रिय असलेल्या स्वत:च्याच एकमेव पत्नीला संपूर्ण समाजासमोर पावित्र्य सिद्ध करायला लावताना, स्वत:ला सावरायला माणूस व्हावं लागतं. समाजव्यवस्था घडवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक भावना दूर सारत कर्तव्यकठोर माणसाचा देवत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीराम. स्वत: भगवंत आहोत हे माहीत असूनही माणूस म्हणून वागत समाज घडवण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीकृष्ण. आदर्श प्रस्थापित करताना देवत्व कठीण असतं, माणुसकी देवत्वापेक्षाही अधिक कठीण व निष्ठुर असते!

सखे, जिच्यासाठी इतके सायास केले, तिला असं वागवताना श्रीराम नावाच्या माणसाला काहीच दु:ख झालं नसेल का गं? सीतेची अग्निपरीक्षा देताना पाहून, श्रीराम आतल्या आत खाक झाले नसतील का गं? ‘हें तुझ्यामुळें गे झालें, तुजसाठी नाहीं केलें’ आणि ‘मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें’ या दोन ओळी उच्चारताना श्रीरामांची वेदना माझ्या डोळ्यातून ओघळते. या सर्व वेदनांचा आणि मर्यादांच्या छळवादाचा कडेलोट, ‘सखि, सरलें तें दोघांमधलें नातें’ या ओळींनी होतो. माझा प्रत्येक अश्रू पापण्यांची साथ सोडत मुक्तपणे कोसळतो. श्रीरामाला मोकळेपणी रडताही आलं नाही. 

सखे, एक दुसरा, थोडासा वेगळा विचार करून पाहा. सीतेचं दु:ख पाहताना श्रीरामाच्या दु:खाकडेही पाहा. ‘स्त्री-पुरुष भेदभाव’, ‘स्त्रीवर अन्याय’, ‘पुरुषप्रधान संस्कृती’ वगैरे सिद्ध करताना आपण पुरुष असलेल्या श्रीरामाचं दु:ख पाहणेही आवश्यक आहे. स्त्रीची न्याय्य बाजू मांडताना, पुरुषावर अन्याय तर होत नाही ना, हे पाहणेही आवश्यक आहे. स्वाभाविक सहानुभूती मिळालेल्या दु:खाकडे पाहताना, त्याच दु:खाची दुसरी बाजू ‘अन्याय करणारीच आहे’, असे ठरवत तर नाही ना, हे पाहणे आवश्यक आहे. 

सखे, गालांवर ओघळलेली आसवे दु:खाची मर्यादा सांगतात आणि पापण्यांच्या काठावर संयमाने रोखलेले अश्रू दु:खाची व्याप्ती सांगतात. ओघळणेही महत्त्वाचे आणि रोखणेही महत्त्वाचेच. ‘तुला दाही दिशा मोकळ्या आहेत’, ‘सीतेला वनात सोडून ये’ हे राजाराम सांगताना, त्याच्या आत असलेल्या आपल्या रामराजाला काय दु:ख झालं असेल याची जाणीव सीतेला पूर्णपणे होती. म्हणूनच ती प्रत्येक प्रसंगाला सामोरी गेली. सीतेला असलेली रामाची हीच जाणीव आपल्याला आहे?


रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

कार्पे डिअम

‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे.

‘शरीराशिवाय एखाद्या व्यक्तीला भेटणं प्रत्यक्षात शक्य आहे का रे? अरे मी आज एक चित्रपट पाहिला, ‘जस्ट लाइक हेवन’. खरंच असं घडू शकतं का रे आयुष्यात?  तू पाहिला आहेस का तो? ’

सखे, शांत हो, धाप लागली आहे बघ तुला. येता येता किती प्रश्न विचारशील? ‘कधी एकदा विचारेन’ अशी अवस्था होते तुझी हे माहीत आहे. पण, थोडा धीर धर.  बैस तरी आधी. आणि हो, पाहिलाय तो चित्रपट मी.

‘कोमामध्ये असलेली नायिका त्याला प्रत्यक्षात भेटते, इतरांना दिसत नाही, फक्त त्याला दिसते. ती भूत नसते, पण तरीही त्याला भेटते, बोलते आणि तो तिला कोमातून बाहेर आणतो वगैरे. हे सगळं खरंच असं घडतं? जे दिसतं त्या पलीकडेही काही असणं शक्य आहे का? सरळ, सोपं सांग. तुझं ते पुनर्जन्म, ब्रह्म सत्य वगैरे तत्त्वज्ञान नको सांगूस. डोक्यावरून जातं..’

सखे, आपलंच दर्शन, तत्त्वज्ञान, ओव्या आणि चक्क शिव्याही इंग्रजीतून ऐकल्या की, लाखमोलाच्या वाटतात. जाऊ दे. जमेल तेवढं सोपं सांगायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या कुठल्याच क्षणाशी स्वत:ला जोडत नाही. वास्तविक योग म्हणजे तेच आहे, ‘जोडले जाणे’.

‘ए! सोप्या मराठीत सांग..’ 

अरे देवा! आपण आयुष्यातील कुठल्याच गोष्टीशी कनेक्ट होत नाही. आयुष्य जगत नाही, ते फक्त ढकलत राहतो. 

‘असं कसं म्हणतोस? प्रत्येकाला आपली कुठली ना कुठली गोष्ट आवडत असतेच. ती गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. मग, कनेक्ट असल्याशिवाय हे कसं शक्य आहे? आज आपण सगळ्या जगाशी कनेक्टेड आहोत. वी लिव्ह ऑल द टाइम, एव्हरी सेकंड.’

सखे, थोडासा फरक आहे. आपण क्षणापुरते जगतो, प्रत्येक क्षण जगत नाही. आपलं कनेक्टेड असणं तेवढ्यापुरतं प्रामाणिक असतं. त्यानंतर आपल्या आत त्याची साधी जाणीवही नसते. आता तुझंच पाहा, तू कायम सोशल मीडिया, मोबाइल यावर अ‍ॅक्टिव्ह असतेस. पण, त्यातील किती माणसांना तू प्रत्यक्ष भेटली आहेस? त्यांच्याशी प्रत्यक्षात गप्पा मारल्या आहेस? अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच माणसांना तू प्रत्यक्षात ओळखतेस. 

सखे, आभासी जगणं आणि प्रत्यक्षात जगणं यात फरक आहे. माझा दादा, त्याने फुलवलेल्या प्रत्येक झाडाला स्पर्श करतो. त्या फुलांशी बोलतो. त्याला व्यवहारातलं काही कळत नाही, पण हे फुलांचं जग समजतं. डॉक्टरी भाषेत त्याला ‘बॉर्डरलाइन आयक्यू असलेला’ म्हणतात आणि सामान्य भाषेत वेडा. त्याच्या डोक्याला जन्मत: चिमटा लागला नसता, तर तो कदाचित फुलं, झाडं यात एखादा तज्ज्ञ, शास्त्रज्ञ झाला असता. तो फक्त त्यांच्याशी कनेक्टेड आहे आणि इतर सगळ्या गोष्टींशी डिसकनेक्टेड आहे, म्हणून तो सब-नॉर्मल गणला जातो. आपण कुठल्याच गोष्टीशी कनेक्टेड नसतो, म्हणून आपण स्वत:ला नॉर्मल, सोशल वगैरे समजतो.

सखे, पाहुणे घरी आले की, तू खोलीत पळतेस. आईवडिलांसाठी आलेल्या फोनवर त्या व्यक्तीशी बोलून, विचारपूस करून तो त्यांना देण्याऐवजी तसाच देतेस. त्यांच्याशी बोलणेही टाळतेस. असं नाही की, तू बोलत नाहीस किंवा तुला बोलायला आवडत नाही. आवडत्या मैत्रिणीशी तासन्तास बोलतेस. चॅट करतेस.

‘ती फार बोअर करतात रे. मला नाही आवडत त्यांच्याशी कनेक्ट व्हायला.’

सखे, तरीही कनेक्ट हो. नको असलेल्या नातलगांशीही दोन मिनिटे बोलल्याने काही फरक पडत नाही. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीचीच असते असं नाही. पण, तरीही ती जीव लावून करावी. साधं टेबल आवरणं असो की, आपले कपडे हँगरला लावणं असो, त्यावर जीव जडवावा. सजीव नसलेलीही वस्तू आपल्याशी संवाद साधते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रत्यक्षात कनेक्टेड राहा. आजकाल जेव्हा कधी हॉटेलमध्ये जातो तेव्हा पलीकडच्या टेबलवर बसलेलं चौकोनी कुटुंब पाहून चकित होतो. प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो, प्रत्येक जण त्यात गुंग असतो. आपल्याच समोर किंवा बाजूला बसलेल्या कुटुंबातील व्यक्तीकडे मात्र पाहत नाही, बोलत नाही. एकत्र जेवावं, बोलावं, सुख दु:ख शेअर करावं असंही कुणाला वाटत नाही. आपण आपल्या माणसांना भेटत नाही, इतकंच कशाला आपण आपल्यालाही भेटत नाही. 

सखे, विरह, दुरावा जाणवण्यासाठी गुंतावंच लागतं. मीलन म्हणजे काय, हे समजण्यासाठी विरह सहन करावाच लागतो. तुला हवी ती माणसं भेटण्यासाठी त्यांच्यासोबत, त्यांच्याशिवाय त्यांचं व्हावं लागतं. आपल्याला हवं असतं, योग्य असतं ते सगळं आपल्याला मिळतं. फक्त आपण त्यात त्या आर्ततेने गुंतावं लागतं, जगावं लागतं. कनेक्ट होणं, गुंतणं म्हटलं की आपण त्याला शारीरिक पातळीवर घेतो. नवराबायको एकमेकांसोबत राहतात, जगत नाहीत. प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगणार्‍या जोडप्यांच्या मनात एकाच वेळी तोच विचार सहजपणे येतो. न सांगताही एकमेकांना समजतं. यालाच आपल्याकडे ‘सखा सप्तपदी भव’ असं म्हटलं आहे.

सखे, ‘जस्ट लाइक हेवन’ या चित्रपटात ती त्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि तो तिला, म्हणूनच ती कोमात जाऊनही एकमेकांना भेटतात. हा चित्रपट ज्या फ्रेंच कादंबरीवर बेतला आहे, त्या ‘इफ ओन्ली इट वर ट्रू (इंग्रजी भाषांतर) त्यात एक संकल्पना आहे, ती फार महत्त्वाची आहे. लॅटिन भाषेत त्याला ‘कार्पे डिअम’ असं म्हणतात. ‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे. 



चित्र : श्रिया प्रसन्न बर्वे


मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

काय उत्तर देऊ तूच सांग...

पूजाने लिफाफा आणून दिला आणि तंद्री भंगली. लिफाफ्यावर माझं नाव लिहिलं होतं, वर्तमानपत्राचा पत्ता होता. त्या अक्षरात माझं नाव आणि पत्ता वाचताना माझे डोळे भरून आले. ते अक्षर माझ्या सवयीचं होतं. व्हॉट्सअ‍ॅप व एफबीच्या जमान्यात स्वहस्ते मला पत्र लिहील आणि तेही ती? का? आयुष्यातून सहज वजा करताना जिला जराही काही वाटलं नाही, तिला पत्र लिहावसं का वाटावं?

सखे, बराचवेळ मी तो लिफाफा हाती घेऊन तसाच बसून होतो. वॉशरूममध्ये जाऊन गरम पाणी चेहर्‍यावर मारले. कॉफीचा कप भरला. एक दोन घोट प्यायल्यावर बरं वाटलं. लिफाफा फोडला. क्लासमेट वहीच्या फाडलेल्या कागदावर पहिलाच शब्द होता, ’सख्या‘. पत्रातलं अक्षर तिचं नव्हतं. कदाचित कुणाकडून लिहून घेतलं असावं किंवा स्वत:च डाव्या हाताने लिहिलं असावं. पुढं लिहिलं होतं;

’ओळखलंस मला? तू मला ओळखणार नाहीस, असं होऊच नाही शकत. खरं तर कधी कधी वाटतं की, मला तू माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस!! बरं ते सोड. तू कसायस? आणि तुझं काम कसं चाललंय? हल्ली काहीही वाचायला लागले की, तुझी आठवण होते. तू बोलता बोलता पुस्तकातल्या चार ओळी सणसणीत ठेवून देतोस, ते आठवतं. गेल्या काही दिवसांत स्वत:साठी असं काही लिहिलंच नव्हतं. तर आता म्हटलं तुझ्यापासूनच सुरुवात करूयात. आपण नेहमी पैलतीरावर राहतो आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी निरखत राहतो. आपल्याला वाटतं की, जे पलीकडे आहे, ‘तेवढंसं’ आकर्षक नाही. आणि त्याची किंमत आपल्याला किनार्‍यापेक्षा कमीच. पलीकडच्या लोकांनासुद्धा आपल्याविषयी तसंच वाटत असतं बहुधा!! पण हे ऐलतीर आणि पैलतीर एकमेकांचेच रिजेक्टेड सोल्स (नाकारलेले आत्मे) असतात. त्यांना जसंच्या तसं स्वीकारलं नाही की, जगणं कठीण होऊन बसतं!! असो. जास्त लिहायची सवय नाहीये. तुला सगळं माहीत असतंच. त्यामुळे जास्त सांगण्यात काहीच अर्थ नाही. तू क्षणात समजून घेशील. अक्षर खराब आहे. चालवून घे. चालवून घेत आलायस!! उत्तराची वाट बघेन!! मुद्दाम लिही!! माणसं जपता येतील की नाही माहीत नाही. निदान पत्र तरी जपायचा प्रयत्न करेन!!

तुझीच

कुणी लिहिलं आहे ते तुला एव्हाना कळलं असेलच

(उत्तर लिही बरं का!!)’

सखे, ती आयुष्यात आली तेव्हा माझं लग्न झालं होतं. पण, तरीही मी तिच्यात गुंतत गेलो. शारीरिक दृष्ट्या नव्हे, मनाने. काही माणसांचं व्यक्तिमत्त्वच असं असतं की, आपण आपल्याही  नकळत त्यांच्यात गुंतत जातो. हे गुंतणं जेवढं जास्त, तेवढाच त्यातून बाहेर निघताना त्रास होतो. कधी कधी निघणं जमतंच नाही. मलाही आजपर्यंत जमलं नाही. यापुढेही जमणार नाही. काही गोष्टी स्वत:बरोबरच संपण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. असो!

सखे, माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले क्षण कुठले म्हणशील तर ते जे मी तिच्यासोबत घालवले. ती होतीच तशी. झोकून देणारी. माझी अशी कुठलीच गोष्ट नव्हती, जी तिला माहीत नव्हती. तिला सगळं सांगायचो. तिच्यापासून काही लपवणं, मला जमलंच नाही. हे प्रेम होतं की माहीत नाही. पण, जे काही होतं ते होत गेलं. कुठल्या मुलीने माझ्यामध्ये गुंतावं असं माझ्यात काहीच नव्हतं. ना रूप, ना देहयष्टी, ना बुद्धी, ना कर्तृत्व, ना पैसा. तशातच इतरांना फशी पडण्याचा माझा जन्मजात स्वभाव. मला माणसं ओळखता नाही येत. आई म्हणायची मला, ‘माणसांच्या आहारी जाऊ नकोस.’ मी प्रत्येक माणसांच्या आहारी जात राहिलो, स्वत:चा वापर होऊ देत गेलो.  मैत्री, आपुलकी आणि प्रेम यांच्या आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या व्यवहाराला भुलत गेलो. 

सखे, पतीपत्नीमधील नातं दृढ होण्यासाठी पतीला एक मैत्रीण आणि पत्नीला एक मित्र अवश्य असावा. दोघांच्याहीसाठी ‘सेफ झोन.’ नवरा बायकोचं नातंच अधिकार गाजवण्याचं असतं. प्रेम नसतं असं नव्हे, त्याहीपेक्षा अधिकार प्रबल असतो. सगळ्याच गोष्टी बायको नवर्‍याला आणि नवरा बायकोला सांगू शकत नाही त्याला कारणही हे अधिकाराचं प्राबल्य असतं. मित्राच्या कितीही मैत्रिणी असल्या तरी फरक न पडणार्‍या स्त्रीला, तोच मित्र नवरा झाल्यानंतर त्याची एकही मैत्रीण चालत नाही आणि नवर्‍याला बायकोचा मित्र चालत नाही. समाजही एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या नात्याकडे निर्भेळपणे नाही पाहत. म्हणूनच सांगता न येणारं प्रत्येक नातं, प्रत्येक संबंध कायम ‘अनसेफ’ असतात. 

सखे, कालांतराने तिचं लग्न झालं. ती मला घाबरू लागली. मी तिच्यासाठी कमालीचा ‘अनसेफ’ होत गेलो. आमच्यातलं अंतर वाढत गेलं. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप होतं. पण, आता तिला ऐकायचंच नव्हतं. गप्पा करण्यासाठी तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. ती म्हणाली हे शेवटचं. आता आपण भेटायचं नाही, फोन करायचा नाही. काहीच नाही.  अगदी सहजपणे म्हणाली, झालं गेलं विसरायचं. माझ्या ओठावर जितक्या लवकर हसू उमटतं, त्याहीपेक्षा जलद पापण्यांच्या किनार्‍यावर अश्रूंची गर्दी जमते. त्यांना थांबवत तिला विचारलं, 

‘झालं गेलं असं जे म्हणतेस ते काय होतं? ते प्रेम नव्हतं?’ 

तितक्याच सहजतेने ती म्हणाली, 

‘नव्हतं. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.’

’तुला तुझ्या संसारात अडचणीचं वाटत असेल कदाचित. नको भेटूयात आपण. वाईट नाही वाटणार मला. पण, जे होतं, त्याला तू नव्हतंच असं म्हणतेस त्याचं फार वाईट वाटतं. प्रचंड त्रास होतो.’ हे सांगताना मी स्वत:ला सावरलं, आसवं ओघळलीच. 

तरीही ती तितक्याच सहजपणे पुन्हा एकदा ‘नव्हतंच’ असं म्हणाली आणि त्याहीपेक्षा जास्त सहजपणे निघूनही गेली. त्यानंतर कित्येक दिवसांनी हे पत्र. 

सखे, काय उत्तर देऊ तूच सांग. 


शनिवार, ३० जुलै, २०२२

कचपाश मोकळे, मोकळे रेशीम...

सखे, तू रागावणार नसलीस तर एक गोष्ट सांगू? ऐकशील?

‘सांग ना! मी रागावेन म्हणून तू सांगायचा राहिला आहेस का कधी? तुला आवडलेली, न आवडलेली गोष्ट तुझ्या आप्तां
ना तू साखरेच्या पाकात घोळवून सांगतोस. जे सांगतोस ते कडू असलं तरी ऐकायला गोड वाटतं.’

सखे, तसं फार महत्त्वाचं नाही. पण, माझ्यासाठी निश्‍चितच आहे. तुझे कापलेले केस तू पुन्हा वाढव. का कोण जाणे, मला लांब केसांचं फार अप्रूप आहे. नागिणीसारखी पाठीवर सळसळत नितंबांवर हेलकावे खाणारी वेणी चित्त वेधून घेते. लांब केसांचं हे ऐश्‍वर्य जिला लाभलं तिच्यासारखी भाग्यवान स्त्री दुसरी नाही. दुपेडी, तिपेडी हे वेणीचे प्रकार आता दर्शनदुर्लभ झाले आहेत. या निसर्गदत्त ऐश्‍वर्याला विंचरायला वेळ नाही’, आउट ऑफ फॅशन’ या सबबीखाली कात्री लावली जाते. केसाने गळा कापता येईल एवढेतरी लांब केस स्त्रियांनी ठेवले पाहिजेत. पदर गेले, ओढण्या गेल्या त्यामुळे यौवनाच्या धनाचे रक्षण करण्याकरिता ही काळी नागीण पाठीवर असणे आवश्यकच आहे.  

सखे, हे लांब केस जेवढे हाल करतात ना, तेवढे हाल कुणीच करीत नाही. तुला खोटं वाटतं? मग सदानंद डबीर यांचे ‘कचपाश मोकळे मोकळे रेशीम’ हे गीत ऐक. संगीत यशवंत देव यांचं आहे आणि स्वर श्रीधर फडके यांचा. मोकळ्या केसांच्या या पाशातून माझी काही आजतागायत सुटका झाली नाही. व्हावी, असंही वाटत नाही. काही काही बंधनच अशी असतात की मोकळी असली तरी त्यापासून मुक्त व्हावं असं वाटतच नाही. तिच्या मोकळ्या केसांचं बंधनही असंच आहे, अडकवून ठेवणारं.

सखे, तशी ती पहिल्यांदाच दिसली, तेव्हा पाठमोरी दिसली. देहाच्या कमनीयतेपेक्षाही नजर स्थिरावली ती तिच्या लांबसडक, मोकळ्या रेशमी केसांवर. कमरेवर पाण्याने भरलेली घागर घेऊन यौवनाच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. तिच्या पाठीवर विसावलेल्या त्या काळ्या मेघांनी मला पाऊस न पाडताही भिजवलं. भिजलेलं मन  आणि थिजलेला देह या अवस्थेत मी पहिल्या पायरीशी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. ती देवळाचा उंबरठा ओलांडून कधीच आत निघून गेली होती. पाणी भरण्यासाठी ती पुन्हा पायर्‍या उतरून खाली आली तेव्हा हरवलेला मी तिच्या दृष्टीस पडलो. तिने एकवार मला पाहिले आणि उंबरठ्याकडे पाहिले. माझ्या चेहर्‍याकडे पाहात तिने विचारले, 

‘कुणाला पाहताय?’

मी भानावर आलो. मोगर्‍याच्या कळीत उतरलेलं पौर्णिमेचं टिपूर चांदणं, भर दुपारी देवळाच्या दारात माझ्यासमोर उभं होतं. तिच्या सोज्वळ सौंदर्यापुढे तिच्या देहाची कमनीयता ही अतिशय क्षुल्लक गोष्ट होती. पाठमोर्‍या कमनीय देहाला, सुंदर चेहरा असतोच असं नाही आणि सौंदर्य ओसंडून वाहणारा चेहरा, प्रमाणबद्ध देहाचा असतोच असंही नाही. सौंदर्य आणि कमनीयता यांचा मूर्तिमंत आकृतिबंध माझं देहभान हरवून गेला.  तिचा प्रश्‍न माझ्या डोळ्यांनी ऐकला आणि अनिमिष डोळ्यांनी उत्तरही दिले. तिला ते समजेल किंवा न समजेल, असं ओठांना वाटलं, म्हणून ओठातून नकळत शब्द बाहेर पडला,

परमेश्‍वराला...

सखे, मुखातून सहज निघालेल्या उत्तराचे तुला आश्‍चर्य वाटले असेल. तिचे मूर्तिमंत सौंदर्य पाहून परमेश्‍वराची आठवण का व्हावी? तो ज्या ज्या रूपामध्ये समोर आला त्या त्या रूपामध्ये आजवर त्याची पूजाच केली होती. ठळकपणे आलेली शुद्ध चैतन्याची प्रचिती म्हणजे सौंदर्य. मग ते देहाचं असो किंवा विचारांचं. समोरच्याला ओढ लावतंच. निर्जीव, काळ्या पाषाणाच्या ओबडधोबड मूर्तीमधून जसं परमेश्‍वराचं दर्शन घडतं, तसंच ते सजीव, नितळ उजळ रंग लाभलेल्या कमनीय देहातूनही घडतं. मूर्तीतच गुंतून राहिलं तर भक्त होता येत नाही आणि देहातच गुंतून राहिलं तर प्रियकर होता येत नाही!

सखे, मी तिच्या चेहर्‍याकडे अनिमिष नेत्रांनी पाहात राहिलो. तिने माझ्या चेहर्‍यासमोर आपला हात फिरवला. मला तिचा हात दिसत होता, जाणवत नव्हता. सगळ्या जाणिवा, संवेदना या पलीकडची स्तब्धता आली होती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून, खांदे हलवत मला भानावर आणायचा प्रयत्न केला. तिच्या हाताचा चुटपुटसा झालेला तो कोवळा स्पर्श मला वेड लावून गेला. 

सखे, त्यानंतर आमच्या गाठीभेटी होतच राहिल्या. पण, तिचं हे पहिलं दर्शन जे मनावर ठसलं ते ठसलं. ओळख वाढत गेली. वरलिया रंगापेक्षा तिचे अंतरंग खूपच नितळ होते, स्वच्छ होते. आपल्या लाभलेल्या सौंदर्याच्या निसर्गदत्त देणगीचा तिला सार्थ अभिमान होता, पण गर्व नव्हता. म्हणूनच त्या सौंदर्यावर उल्लू होणार्‍यांचा वापर करून घेणं तिला पटत नव्हतं. ती अशा पागल मजनूंना त्यांची जागा व्यवस्थित दाखवून देत होती, त्यांना आपल्यापासून एका अंतरावर ठेवत होती. तिचं मन तिच्या देहापेक्षाही सुंदर होतं. म्हणूनच तिच्या देहाचं आकर्षण उरलं नाही. तनाने रूपवान आणि मनाने कुरूप असणार्‍या स्त्रिया जगात कमी का आहेत? मनाचं सौंदर्य चेहर्‍यावर प्रकट झालं की स्त्री रूपवान होते. ती सुंदर होती, म्हणून सुंदर दिसत होती! 

सखे, आम्ही मनाने जवळ आलो होतो. आमच्या दोघांमध्ये लपवण्यासारखं असं काही नव्हतं. एकमेकांच्याबद्दल प्रचंड खात्री होती, विश्‍वास होता. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर नात्यामध्ये एक प्रकारचा निर्भीडपणा येतो, तो आला होता. आम्ही खूप बोलायचो, खूप फिरायचो. एकदा पावसात भिजत भिजत फिरत होतो. दोघेही चिंब भिजलो होतो. तिच्या लांबसडक केसांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब कोवळे मोती होऊन टपकत होते. अचानक वीज कोसळली. तिने घाबरून मिठीच मारली. त्या अवस्थेत काही क्षण गेल्यावर आम्ही भानावर आलो, सावरलो. लज्जेची वसने ढळली होती, डोळ्यांमध्ये संमती होती. तरीही त्यापुढे पाऊल टाकलं नाही. पायरी समजली की उंबरठा कधी ओलांडायचा आणि कधी नाही हे लक्षात येतं.  ती निघून गेली. मी तसाच न बोलता पावसात भिजत राहिलो. तिची पाठमोरी आकृती पाहात राहिलो. ती जशी पहिल्यांदा दिसली होती, तशीच दिसत होती. पाठमोरा कमनीय देह, लांबसडक केस आणि चिंब भिजलेला मी. 


चित्रस्रोत : आंतरजाल

रविवार, ३ जुलै, २०२२

जीवन क्या है...

सखे, एखादी गोष्ट आपल्याला आत्यंतिक आवडावी, ती मिळावी यासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असावं. पण, ती त्या वेळेस मिळू नये. वेळ निघून गेल्यावर जेव्हा ती मिळावी, तेव्हा तिचं अप्रूप निघून गेलेलं असावं. तेव्हाची आसक्ती खरी म्हणावी की, आजची अनासक्ती खरी म्हणावी? की, दोनही खोटीच? हा संभ्रम, ही जी अवस्था आहे ना, ती माझी गेले दोन दिवस आहे. बरं झालं तू आलीस. कुणाला तरी हे सांगायचंच होतं. अन्यथा वेडा झालो असतो.

‘ऐक सखे, म्हणत मला प्रचंड ऐकवणार्‍या बर्व्यांची ही अवस्था? कसा दिसतो आहेस बघ! सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा, देणारा तू, आज असा गोंधळलेला? पाहवत नाही.’

माझ्या आई! प्रश्न मलाही पडतातच. मी कुणी स्थितप्रज्ञ योगी नव्हे. मलाही दु:ख, वेदना, सुख, न सुटलेले प्रश्न आहेतच की. पोहणार्‍या माणसाला, तो बुडत असलेला पाहून फक्त आठवण करून द्यायची असते की, ‘त्याला पोहता येतं’. त्यावेळेला त्याचे पोहण्याचे क्लास घेत बसायचं नसतं. तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी शोधतो, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तू शोध.

‘ठीक आहे. त्या सुकून गेलेल्या कॉफीच्या मगमधली शिल्लक कॉफी सांगतेय, तिला गार होऊन गेल्याला आता बराच वेळ झालाय. रिकाम्या कपाचेही घुटके नकळत घेणारा तू, एकवेळ मला विसरशील, कॉफी विसरणार नाहीस. जाऊ दे! मस्तपैकी कॉफी करून देते. मग ऐकव काय झालंय ते.’

ठीक आहे सखे, कॉफी करता करता तू जगजित सिंग यांच्या आवाजातलं ‘जीवन क्या है, चलता फिरता एक खिलौना है’ हे सुंदर गीत ऐक. 

‘अरे हे तर तुझ्या त्या खूप आवडत्या ‘सैलाब’ सिरियलमधलं ना?’

हो सखे! परवाच त्या सिरियलचे सगळे एपिसोड एका मित्राने आणून दिले. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायची मला ती. अगदी पहिल्या एपिसोडपासून माझ्या मनाचा कब्जा घेतला होता या सिरियलने. अप्रतिम मांडणी, अप्रतिम पटकथा, अप्रतिम संवाद...

‘आणि अप्रतिम हसणारी रेणुका शहाणे...’

तेवढं बरं लक्षात राहिलं तुझ्या. जाऊ दे! हो, तिच्यासकट सगळंच आवडायचं मला. एकही एपिसोड चुकवायचा नाही असं पहिला एपिसोड पाहिला तेव्हाच ठरवलं होतं. पण, तेव्हा आमच्याकडे टीव्ही होता पण डिश नव्हता. शेजारी राहणार्‍या जिवलग मित्राकडे त्यावेळचा तो मोठ्ठा डिश एन्टेना आणि टीव्ही होता. मी न चुकवता जाऊ लागलो. सिरियल सुरू झाली की, माझं लक्ष कुठेच नसायचं. काही इतर ऐकूही यायचं नाही. पण, जाहिराती लागल्या की, त्यावरच्या टिप्पण्या ऐकू यायच्या. 

आता मित्र म्हटलं की, रुसवे-फुगवे असायचेच. नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण, जोराचं भांडण झालं होतं. मी पुन्हा दारावर पाय ठेवणार नाही, असं सांगून वगैरे बाहेर पडलो असेन बहुधा. घरच्या सगळ्यांना वाटलं होतं की, मी काही आता त्यांच्या घरी पुन्हा पाऊल ठेवणार नाही. पण, त्याला खात्री असावी. मलाही एकेक पायरी चढत जाणं खूप कठीण गेलं. प्रत्येक पायरी ही स्वत:च्या अगतिकतेची चीड आणणारी होती. तरीही मी गेलो, कारण मला ती सीरिअल पाहायची होती. शेवटच्या पायरीवर मला पाहताच मित्र हसला. त्याच्या हसण्यात माझ्या अगतिकतेचा उपहास होता. मी गेलोच नसतो तर कदाचित माझ्या ठाम राहण्याचा त्याला अभिमान वाटला असता. त्याच्या त्या हसण्यामुळे मला रेणुका शहाणेच्या स्मितहास्याचा का कोण जाणे आनंद झाला नाही. कशाचाच झाला नाही. 

तो भाग संपताच मी खाली उतरलो. कुणीतरी माझी वाट पाहत उभे होते. 

‘माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशी मला लग्न करायचं आहे. तू तिच्या प्रेमात आहेस का?’

जिच्यावर माझे प्रेम होते, तिच्याबद्दलच तो विचारत होता. अभावितपणे तोंडातून ‘नाही’, असा शब्द निघून गेला. केवळ मलाच माहीत असलेली ही गोष्ट त्याला कशी समजली, हा विचारही डोक्यात आला नाही.  

‘ही तीच मुलगी ना जिचं स्मितहास्य तुला फार आवडायचं?’

हो. त्यानंतर मी ती सिरीयल पाहायला पुन्हा कधीच गेलो नाही. इतर प्रसंगी खूपवेळा गेलो. अक्षरश: दर दिवशी गेलो. पण, ज्या दिवशी ती सिरियल लागायची तो दिवस, ती वेळ सोडून गेलो. परवा, एका मित्राने त्याच ‘सैलाब’ सिरियलचे सर्व एपिसोड आणून दिले. ‘दहावा एपिसोड मिळाला नाही’, असेही त्याने सांगितले. पण, तो गेल्यापासून मी एकही एपिसोड पाहिला नाही. 

गतकालातील सुख माणसाला त्याच्या नंतरच्या आयुष्यात दु:ख देतं. ते सुख खरं की, आजचं त्याचंच दु:ख खरं, असं कायम वाटत राहतं. जे पाहण्यासाठी एवढा प्रचंड आटापिटा केला, ते पाहण्याची आज इच्छाच होत नाही. तेव्हा ते उपलब्ध नव्हतं आणि आज सहज उपलब्ध आहे. तरीही ते का नकोसं वाटावं? कुठलं खरं असावं? दोन्ही गोष्टी खर्‍या, प्रामाणिक की, दोन्ही मृगजळासारख्या फक्त भासल्या? 

त्या  एपिसोडमध्ये रोहित शिवानीला सांगतो, 

‘मी एका मृगजळाच्या मागे वेड्यासारखा धावलो. आज ते समोर आलं तेव्हा स्वत:ला थांबवू शकलो नाही.’

त्यावर शिवानी म्हणते,

‘होतं असं रोहित. सुखाशी पुन्हा झालेली भेट दु:ख देते. मनावर ताबा ठेवणं कठीण होतं. मन सुखदु:खाच्या मागे वेड्या घोड्यासारखं मिळेल त्या दिशेने धावत राहतं. आयुष्य तसं असत नाही. त्याला नियम असतात.’

सखे, आयुष्यात आपल्याला  हवं ते, हवं तेव्हा, हवं तेवढं कधीच मिळत नाही. ते मिळावं हे जसं आयुष्य आहे, तसंच ते मिळू नये हेसुद्धा आयुष्यच आहे. 

हा प्रसंग असलेला एपिसोड त्या सिरियलचा मी पाहिलेला शेवटचा एपिसोड होता आणि त्यात शेवटी जे गाणं होतं, तेच तू आत्ता ऐकलंस.

‘जीवन क्या है....’

शनिवार, २५ जून, २०२२

अजी कुछ तो बोलिए...

पाठीमागून घाव घालणार्‍या माणसालाही, ज्याच्यावर घाव घातला आहे, तो ओरडला नाही की त्रास होतो.
सखे, आठवतंय तू एकदा विचारलं होतस मला, रडणं हे दुबळेपणाचे लक्षण नव्हे का? रडत रडत जन्माला येणार्‍या माणसाला समज आल्यानंतर तेच रडणं अप्रशस्त वाटू लागतं. पण तुला सांगू, जसं दिलखुलासपणे हसायला सामर्थ्य लागतं तसंच साचलेल्या दु:खाला वाट करून द्यायलाही प्रचंड सामर्थ्य लागतं. रडणं हा दुबळेपणा नाही. फक्त पापण्यांच्या आड अश्रू किती संयमाने साचले आहेत, त्यावर दु:खाचं सामर्थ्य ठरतं.  

‘आपलं दु:ख इतरांना सांगितल्याने मन हलकं होतं, असं म्हणतात ते चुकीचं आहे का मग?’ 

सखे, प्रत्येक व्यक्तीचं आपल्या दु:खावर प्रचंड प्रेम असतं. दु:ख कुरवाळण्यासारखं सुख नसतं. समदु:खी माणसांचं दु:ख समान असतं, त्यातली तीव्रता नाही. म्हणूनच प्रत्येकाला आपलं दु:ख मोठं वाटतं. आपण जेवढे आपल्या दु:खाने दु:खी होतो, तेवढे इतरांच्या दु:खाने होत नाही. दु:खाची तुलना होते, जाणीव होत नाही. १९२४ साली याच दिवशी जन्मलेला मदनमोहन चुन्नीलाल कोहली हा अवलिया केवळ आपल्या संगीताच्या जोरावर त्याचं दु:ख आपलं करून टाकतो.  या जादूगाराने संगीत दिलेलं ‘यूं हसरतों के दाग’ हे अदालत(१९५८) या चित्रपटातील नर्गिसवर चित्रित झालेलं अप्रतिम आणि माझं खूप आवडतं गीत मुद्दाम ऐक. तुला जाणवेल की, हे दु:ख चित्रपटातील निर्मलेचं नाही, गीत लिहिणार्‍या राजेन्द्र कृष्ण दुग्गल यांचं नाही, लतादीदीचं नाही. हे दु:ख मदनमोहनचं आहे. आपल्या दु:खाची यथार्थ जाणीव केवळ सुरावटीतून करून देण्याचे जगावेगळं सामर्थ्य लाभलेला मदनमोहन हा बहुधा एकमेव संगीतकार असावा. 

सखे, प्रेमात आपण मारलेल्या आपल्या इच्छा पुढे येणार्‍या एकलेपणात छळतात. इच्छेमधला ओलावा निघून गेला की त्याचे डाग होतात. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते दिसू नये म्हणून प्रेमानेच ते धुवावेही लागतात, अगदी कितीही ‘अच्छे’ असले तरीही. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला हे दु:ख समजतच नाही. म्हणून आपण आपल्यालाच ते सांगायचं आणि आपणच ते ऐकायचं. वक्ता, श्रोता दोनही आपणच.

सखे, घर सोडून सुखाच्या शोधात निघावं. सुख काही शेवटपर्यंत सापडत नाही. वाटेत उभी असलेली दु:खं मग आपल्यासोबत प्रवासाला निघतात. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अश्रू आणि दु:खच साथ देतात. बाकी सुखांचे काय? ती येतात, निघून जातात. पडद्यावर हे कडवं जेव्हा येतं, तेव्हा प्राण येताना दिसतो. तोही पान ठेवलेल्या तबकाच्या आरशात. 

सखे, फूल सुकलं तरीही ते फूलच असतं. त्याचा काटा नाही होत. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला ते समजतं का? त्याला त्याची किंमत आहे का? तुझ्या तोंडीही हे वाक्य मी बर्‍याचदा ऐकले आहे, ‘त्याला काही माझं पडलेलंच नाही’. त्याला काय वाटतं यावरून आपलं प्रेमाचे मूल्य ठरवणार्‍या तमाम प्रेमिकांनी या गीतातील दुसरे कडवे अवश्य ध्यानात ठेवावे. आपल्याला समजून घेतलं जात नाही हा दोष आपला नाही. आपण जसे आहोत, तसे आहोत. तो किंवा ती आपल्याला काय समजते, ते त्या व्यक्तीवर सोडून द्यावे. सुकलेल्या फुलाला काट्यामध्ये कुणी तोलत असेल तर तो दोष फुलाचा कसा? असे करण्यात त्या व्यक्तीला सुख मिळत असेल तर ते सुखही मान्य असणे, ही प्रेमाची उत्कट अवस्था आहे.

सखे, मदनमोहनला आयुष्यात खूप अवहेलना सहन करावी लागली. जाणूनबुजून त्याची गळचेपी करण्यात आली. त्याच्या पासंगालाही न पुरणार्‍या संगीतकारांनी त्याला संपवला. आपलं नाणं बावनकशी असून चालत नाही. ते वाजवून दाखवावं लागतं. गाण्याशिवाय इतर काही वाजवणं हा या संगीतकाराचा पिंडच नव्हता. संगीतकारांच्या गळेकापू स्पर्धेत हा सुरांचा राजा गप्प राहिला. 

पाठीमागून घाव घालणार्‍या माणसालाही, ज्याच्यावर घाव घातला आहे, तो ओरडला नाही की त्रास होतो.

मदनमोहनचं हे गप्प राहणं अनेकांना मानवलं नाही. ते विचारू लागले,  ‘अहो गप्प का? बोला ना काही तरी!‘ मदनमोहनने स्वत:ला मदिरेत बुडवून टाकले. त्यातच त्याचा शेवट झाला. कमालीचा एकलेपणा आणि कमालीचे मदिरासेवन, त्याला हवा असलेला मृत्यू देऊन गेले.

राजेंद्रकृष्णांनी लिहिलेल्या या गीतातल्या शेवटच्या दोन कडव्यांतले शेवटचे ‘तोलिये’ आणि ‘बोलिये’ हे शब्द जेव्हा मदनमोहनचं दु:ख घेऊन लताच्या गळ्यातून बाहेर पडतात ना सखे, तेव्हा काळीज चिरून जातात. लता हे दु:ख ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालते. गाणं थांबतं. स्वर विरून जातात. राहतं ते मदनमोहनचं साचलेलं दु:ख. खरं तर ते दु:ख त्याचं असं उरतच नाही. ते आपलं होतं. आपण नि:शब्द होतो आणि सुकून गेलेल्या आपल्याच इच्छांचे डाग आपल्याला म्हणतात,

‘अजी अजी कुछ तो बोलिए...’


शुक्रवार, ३ जून, २०२२

हात छोड दिया...

इतर लोक आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्याचं वैषम्य वाटत नाही. आपलीच माणसं आपल्याशी परक्यासारखी वागतात त्याचा त्रास होतो. आपलेपणातील हे परकेपण छळतं. वस्तू हातात न देणं छळत नाही. ती टेबलवर ठेवणं छळतं. वाढत चाललेलं अंतर, दुरावा दाखवून देणं छळतं.

‘आपण घेण्यासाठी हात पुढे करावा आणि देण्यासाठी पुढे झालेल्या हाताने वस्तू आपल्या हातात न देता टेबलवर ठेवावी, तेव्हा जसं वाटेल ना, तसं वाटतंय रे...’

सखे, तू कधी कधी दु:ख इतक्या नेमक्या शब्दात व्यक्त करतेस की, ते तुझं न राहता माझं होऊन जातं. दु:ख दु:खात मिसळलं की, ‘काय झालं?’ असं विचारण्याची आवश्यकता राहत नाही. तपशिलाची माहिती विचारणार्‍या प्रश्नांची टरफले गळून पडतात. वेदना शिल्लक राहते. 

‘मला आणि तुलाही माहिती आहे मी कुणाबद्दल बोलतेय. तुला काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाही. पण, इतकं कळतं की, मला काय म्हणायचं आहे, हे तुला नेमकं समजतं. त्याच्या वागण्याचा त्रास होतोय रे. तो नव्हता असा. आम्ही दोघेही एकमेकांना आतबाहेर ओळखतो. तरीही तो ओळखच नसल्यासारखा का वागतो? का बदलला तो? माझं काही चुकतंय का? मी आणखी काय केलं की, तो पूर्वीसारखा वागेल? सगळे प्रश्न भुंग्यासारखे छळत राहतात.’

सखे प्रश्नांचा फार त्रास करून घेऊ नये आपण. ते त्रास देऊ लागले की, मस्त गझल ऐकावी. मला गझल का आवडते माहितीये, कारण ती माझ्यासारखी नाही. मी जास्तीत जास्त शब्दांत कमीत कमी सांगतो. गझल कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगून जाते. तुझा मूड ठीक होईल आणि कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरेही मिळून जातील. कतील शिफाई यांची ‘किया है प्यार जिसे हमने जिंदगी की तरह’ ही जगजित सिंग यांच्या आवाजातील गझल ऐक. 

‘तू खपल्या नको ना काढूस. माझीही अत्यंत आवडती गझल आहे. त्यालाही प्रचंड आवडायची. तुला माहिती आहे, त्याला व मला गझल, सिनेमा, गाणी, कविता एकमेकांना शेअर करायला आवडतं. त्याहीपेक्षा एकमेकांची त्याबद्दलची मतं ऐकायला तर त्याहून जास्त आवडतं. आता आवडायचं असं म्हणावं लागेल. तो तुझ्यासारखाच खूप बारीक बारीक जागा सांगायचा. प्रत्येक शेर उलगडून सांगायचा. आता जागा असतो, पण मोबाइलमध्ये तोंड खुपसण्यासाठी. सगळी आवडच संपली आहे त्याची.’

सखे, यातला पहिला शेर आपल्याला खेचून घेतो, तो शेवटपर्यंत सोडत नाही. एखादी गझल आपल्याला आवडते कारण शायराने त्यात आपली वेदना नेमक्या शब्दांत मांडलेली असते म्हणून. एरव्ही यातना देणारे आपले दु:ख इतके छान वाटते की, आपल्या तोंडून सहज, ‘वाह क्या बात है!’ अशी दाद नकळत निघते. आपली वेदना आपलीच दाद घेऊन जाते. 

सखे, आपलं आयुष्य आपल्या ओळखीचं असतं. त्यात जे घडतं, बिघडतं ते आपल्या ओळखीचं असतं. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यावर प्रेम करतो. ते आपलं असतं. असंच आपल्या आयुष्यासारखं आपण कुणावर तरी प्रेम करावं आणि त्यानं ओळखही दाखवू नये, याचं दु:ख प्रचंड असतं. आश्ना म्हणजे ओळखीचा, मित्र, प्रियकर. आता तुझ्याबाबतीत या सगळ्या पायर्‍या पार करून इथवर पोहोचलेला तुझा नवरा. त्याचं परक्यासारखं वागणं, तुला असह्य होत आहे, यात शंकाच नाही. तारीकी म्हणजे काळोख, रात्र. पण इथे, दुर्लक्ष करणे, बेफिकिरी असा त्याचा दुसरा अर्थही एकदम लागू होतो. तो लपेल, तो दिसणार नाही. त्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे लपणार नाही. ते दिसेल. नाहीच दिसले तर तो दाखवून देईल. आपल्या या दु:खाची त्याला जाणीवही नसणं कायम जाणवत राहील. 

सखे, या नंतरचं कडवं खूप लक्षपूर्वक ऐक. हा ऑडिओ २००६साली टॉरोन्टो येथे झालेल्या लाइव्ह कार्यक्रमातील आहे. या कडव्याची पहिली ओळ म्हणून जगजित सिंग एक तान घेतात. त्यानंतर ‘हाथ छोड दिया’ म्हणताना एक जागा घेतात. एकदम लाजवाब. आपल्या प्रिय व्यक्तीचा हात हातातून निसटत आहे, आपण काहीही करू शकत नाही, ही अगतिक अवस्था त्या दोन शब्दांतून जगजित सिंग व्यक्त करतात त्याला तोड नाही. त्या सुरातून परित्यक्त झालेलं दु:ख थेट काळजात उतरतं. एका क्षणासाठी गाणारा, ऐकणारा नाहीसे होतात. राहते ते फक्त कारुण्य. आपण भानावर येतो ते त्यानंतरच्या ओळी आपल्याला छेदून वास्तवात घेऊन येतात म्हणून. मुरव्वत म्हणजे संकोच, भीड, चांगुलपणा, सौम्य वागणूक, मन राखणे अशा अर्थाने घेतला जातो. दिल-लगी म्हणजे करमणूक, मनोरंजन. आपलं मन राखणं हे त्याचं मनोरंजन होतं. तो आपलं मन राखतोय, हे त्याचं आपल्यावरचं प्रेम आहे हा भ्रम होता. तो त्याचा मन रमवण्याचा उद्योग होता. जवळ न येण्याच्या दु:खापेक्षाही त्याचं हळूहळू दूर जाणं जास्त वेदना देणारं आहे. ज्याची प्रत्येक वेदना आपण आपली मानली त्याचं आपलं नसणं जास्त वेदनादायी आहे. 

‘तुला माहिती आहे आता मोबाइलमधून चेहरा वर करून पाहतही नाही. त्याला काही ऐकावसं वाटत नाही आणि काही सांगावसंही वाटत नाही. त्याला ट्विस्ट एन्ड असलेले सिनेमा खूप आवडतात. मी त्यातला ट्विस्ट उलगडून सांगितला की, त्याला ते खूप आवडायचं.एन्सेंडिस (एंसादी) या फ्रेंच सिनेमातील प्युअर मेथमेटिक्स, कोलात्झ कॉन्जेक्चर आणि त्यातील सायमनने आपली बहीण जेनीला ‘वन प्लस वन, डज इट मेक वन?’ विचारलेला हा प्रश्न, यावरून आम्ही प्रचंड खल केला होता. मी त्या सिनेमातील त्याला कळालेलं  मर्म सांगेपर्यंत त्याच्या जिवात जीव नव्हता. आमच्यात वादही झाला होता. आताशा तो वाद टाळतो. तो वाद टाळतो याचं दु:ख करू की, तो संवाद टाळतो याचं दु:ख करू तेच कळेनासं झालंय.’

सखे, कतील शिफाई यांचा;

कभी न सोचा था हम ने ’क़तील’ उस के लिए 
करेगा हम पे सितम वो भी हर किसी की तरह

हा शेर जगजित सिंग यांच्या या व्हर्जनमध्ये नाही. इतर लोक आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्याचं वैषम्य वाटत नाही. आपलीच माणसं आपल्याशी परक्यासारखी वागतात त्याचा त्रास होतो. आपलेपणातील हे परकेपण छळतं. वस्तू हातात न देणं छळत नाही. ती टेबलवर ठेवणं छळतं. वाढत चाललेलं अंतर, दुरावा दाखवून देणं छळतं. तुला त्रास होतोय तो नेमका या गोष्टीचा. 

सखे, त्यावरचा उपाय मला नको विचारूस. तो माझ्याकडेही नाही. तसा तो कुणाचकडे नसतो. नवरा बायकोतील नातं स्थिरावणं कधी कधी दूर जाण्यासारखं भासतं. लग्नाच्या सुरुवातीला असलेल्या प्राथमिकता कालांतराने बदलतात. आपण आपल्या रूटीनमध्ये अडकत जातो. पत्नी माता होऊन संसारात गुरफटते. पती एककल्ली किंवा बाहेरख्याली होतो. सप्तपदीमधील शेवटचं वचन हे ‘सखा सप्तपदी भव’ आहे याचा आपल्याला विसर पडतो. मित्र-मैत्रीण, प्रियकर प्रेयसी, नवरा-बायको यापेक्षाही सखा-सखी यातील सख्यत्व फार महत्त्वाचं आहे, हे उलगडेपर्यंत हे खूप जवळ येऊन दूर होत जाण्याचं दु:ख भोगावं लागतं. तुझ्या माझ्यात सख्यत्व आहे, ते आपण दोघेही नवरा-बायको नाही, म्हणून आहे. तुमच्या नात्याकडे नवरा बायको या दृष्टिकोनातून पाहूच नकोस. तू त्याची सखी हो आणि त्याला तुझा सखा होऊ दे. मग दोघांचेही हात आवळलेही जाणार नाहीत आणि सुटणारही नाहीत.

‘तू म्हणतोस तसंच होईल की, नाही माहीत नाही. पण, तुला दु:ख समजतं. तुला ते आपलंसं करणं जमतं. तुझ्याकडे असलेल्या गाण्यांचा संग्रहही प्रचंड आहे व तू तो मला ऐकवत असतोस. म्हणूनच तर मी तुझ्याकडे येते.’

हो सखे, अशीच येत राहा, ऐकत राहा!

मंगळवार, १० मे, २०२२

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता...

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता

सखे, तू उदास असलीस, खिन्न असलीस की मला त्रास होतो. का कोण जाणे, पण तू नेहमी प्रसन्न असावंस असच वाटतं. तुझ्या मनातली प्रसन्नता चेहर्‍यावर झळकते, तेव्हा त्या निर्व्याज स्मितहास्याच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ नये असं वाटतं. अपूर्णत्व मनाला खिन्नता आणतं. ही खिन्नता घालवण्याची प्रत्येकाची साधनं वेगवेगळी असतात. तुला भेटलो की मनाची मरगळ नाहीशी होते. धकाधकीचं आयुष्य सहन करण्याची ताकद मिळते. 

‘सगळ्यांची आयुष्यं अपूर्णच असतात का रे? कुणीच पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही का?’

सखे, सगळ्यांचं आयुष्य अपूर्ण असतं. आपल्या सगळ्या आकांक्षा, इच्छा पूर्ण होतातच असं नाही. ‘मागणं’ आणि ‘मिळणं’ यातलं अंतर जेवढं जास्त, तेवढं जगणं जास्त त्रासदायक. सगळ्यांना सगळं नाही मिळत. आयुष्याच्या याच अपूर्णत्वावर निदा फाजलींची ‘कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता’ ही अप्रतिम गझल आहे, ती तू ऐक. मूळ गझल त्यांच्या ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील आहे. १९८१साली आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटासाठी त्यात थोडासा बदल केला गेला. भूपेंद्र सिंग यांचा आवाज आहे आणि संगीत खय्याम यांचं. यातला एक शेर जेव्हा ऐकला तेव्हापासून आत्तापर्यंत तो विसरलो नाही. 

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता 
कहीं ज़मीं तो कहीं आसमां नही मिलता 

सखे, मुकम्मल याचा अर्थ पुरेसा किंवा पूर्ण. प्रत्येकाचं स्वत:च असं विश्व असतं. त्याच्या स्वत:च्या भावना, इच्छा, अपेक्षा असतात. कधी स्वत:कडून तर कधी इतरांच्याकडून त्या पूर्ण व्हाव्या असं त्याला वाटत असतं. पण त्या होत नाहीत. एका अपेक्षेची पूर्तता दुसर्‍या अपेक्षेला जन्म देते. म्हणूनच तृप्ती ही फार दुर्मीळ गोष्ट आहे. जसा माणूस विचाररहित असू शकत नाही, तसाच तो इच्छारहितही असू शकत नाही. इच्छा, अपेक्षा कधीच थांबत नाहीत. आपण कुठं थांबायचं, हे समजलं की अपेक्षांचं ओझं होत नाही, इच्छा त्रास देत नाहीत.

जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है
ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नही मिलता 

सखे, मूळ शेर ‘जिसे भी देखिये वो अपने आपमे ही गुम है’ या ऐवजी ‘ये क्या अज़ाब है सब अपने आप में गुम हैं’ असा आहे. ‘अज़ाब’ याचा अर्थ दु:ख किंवा शिक्षा. आपल्याला असंख्य माणसं आयुष्यात भेटतात. ज्याला बघावं तो आपल्याच विश्वात गर्क असतो. प्रत्येकजण दुसर्‍याला ऐकवत असतो. जिंकणं, हरणं, सुख, दु:ख या भोवती गुरफटलेलं स्वत:चं आयुष्य इतरांसमोर उलगडत राहतो. ऐकवणारी माणसं खूप आहेत. उणीव ऐकणार्‍या माणसांची आहे. फारशी जवळीक नसणारी माणसं आपल्याशी खूप बोलतात. दु:ख, आपल्याच माणसांना आपल्याशी बोलावसं वाटत नाही याचं आहे. ज्यांच्या सुखाने आपण सुखी होतो, ज्यांच्या दु:खात आपण दु:खी होतो, त्यांना आपल्याशी बोलायला वेळ नसतो. गुजगोष्टी करणारी असंख्य माणसं अवतीभवती सतत वावरत असतात. ज्यांच्याशी हितगुज करावं अशी माणसं आपल्यापासून लांब असतात. त्यांचं लांब असणं छळत नाही, त्यांचं हितगुज न करणं प्रचंड त्रास देतं. 

बुझा सका है भला कौन वक्त के शोले
ये ऐसी आग है जिस में धुँआ नही मिलता 

सखे, मनावर झालेल्या जखमा, त्यांना वेळ दिला की भरतात. निदान तसं आपल्याला वाटतं तरी. दु:खाला कवटाळत बसण्यापेक्षा त्याला विस्मृतीत ढकलणं जास्त सोयीचं असतं. आपण विसरू म्हटलं तरी काही गोष्टी विसरता येत नाहीत. प्रसंगाप्रमाणे त्यांची आठवण नको त्या वेळी होतेच. त्यांचं चिंतन चिंता वाढवीत जातं. मेल्यावर जाळते ती चिता आणि जिवंतपणी जाळते ती चिंता. हा अनुस्वाराचा फरक आपल्यामध्ये किती जाळ घेऊन वावरतो हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आठवणींच्या या वणव्याला ज्वाळाही नसतात आणि धूरही येत नाही.

तेरे जहाँ में ऐसा नही के प्यार न हो
जहा उम्मीद हो इसकी वहाँ नही मिलता 

सखे, हाच तो शेर जो ऐकताक्षणीच आवडला होता. वेदना नेमक्या शब्दात मांडली की, तिचं काव्य होतं, हे या शेरामुळे पटतं. ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील गझलेत हा शेर ‘तमाम शहर में ऐसा नही ख़ुलूस न हो, जहाँ उमीद हो सकी वहाँ नही मिलता’ असा आहे. ‘ख़ुलूस’ याचा अर्थ प्रामाणिकपणा, ओढ किंवा सत्य असाही होतो. पण, हा चित्रपटातील गझलेसाठी बदलून लिहिलेला शेर जास्त भावला. 

सखे, प्रेम हे निसर्गाने, परमेश्वराने जिवाला जगण्यासाठी दिलेली भेट आहे. आपण श्वास घेणं हे जसं आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे, तसंच प्रेम हे आपण जगत असल्याचं लक्षण आहे. म्हणूनच ते सर्वांठायी आहे. प्रेम नाही असं एकही स्थान निसर्गात नाही. तरीही आपल्यासाठी म्हणून आपण या अमर्याद प्रेमाला मर्यादित स्वरूपात पाहतो. एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. ते तिथूनच मिळावं अशी अपेक्षा बाळगतो. खास करून एखाद्या व्यक्तीकडून. प्रेमाच्या बाबतीत, ते मिळावं यापेक्षाही ते कुठून मिळावं या गोष्टीवर आपण ठाम राहतो. तिथून ते नाही मिळालं की आपण दु:खी होतो. 

सखे, हा विचार तुला कदाचित पटणार नाही, तरीही ऐक. प्रेम आपल्याला जिथून हवं असतं तिथून ते मिळावं यामध्ये जशी प्रेमाची सार्थकता आहे, तशीच सार्थकता ते मिळू नये यातही आहे. 

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

तो राजहंस एक...

आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...

‘मी काय करू सांग ना रे?’

सखे, तू असा ओठांचा चंबू करून प्रश्न विचारला की, मला एक प्रश्न पडतो. तुझ्या ओठांनी टाकलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ की, तू विचारलेल्या?

‘चावटपणा पुरे झाला. तू मला सखी म्हणतोयस खरा, पण आपल्या वयातील अंतर पाहिले आहेस का? यावर ते गेल्या खेपेला ऐकवलंस तसं, ‘ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो’ या ओळी  असलेलं गीत नको ऐकवूस.’

सखे, तुझं वयात येणं खरं तर माझ्यासाठी अडचणीचं झालं आहे. आधी तू किती छान मोकळेपणी बोलायचीस. त्या संवादाला आधीच ठरवलेल्या अर्थाचे कंगोरे नसायचे. जाऊ दे. भांडण होईल आपलं. काय झालं ते सांग.

‘ही दहावी म्हणजे माझ्यासाठी डोकेदुखी झाली आहे. ‘पुढे काय करणार तू?’ हा प्रश्न मला सगळ्या नातेवाइकांनी विचारून झालाय. मला काय करायचं आहे, हे सांगितलं तर ते कसं चुकीचं आहे, हेच प्रत्येकजण ऐकवतो. बरं, ‘नाही ठरवलं अजून’, असं म्हटलं तर प्रत्येका जास्तच चेव येतो. मोबाइलमध्ये गुरफटलेल्या पिढीपासून ते ‘आमच्यावेळी हे असं नव्हतं’ इथपर्यंत सगळे विषय येऊन जातात. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. आता मी आर्टस्ला जायचं ठरवलं तर केवढा गहजब घरात! एका नातेवाइकांनी तर अशा काही तुच्छतेने पाहिलं की, बेचाळीस पिढ्या नरकातच गेल्याचा भास झाला.  मला इंग्रजी हा विषय घेऊन आर्टस् करायचे आहे, तर आईबाबांना वाटते मी एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंग करावे. आता मला सांग मी करू तरी काय?’

सखे, ही शेकडा नव्वद घरांतल्या मुलांची समस्या आहे. आईवडिलांच्या अपेक्षा, नातेवाइकांचे सल्ले यातून गोंधळलेली मुलं हे घराघरांतील चित्र आहे. याला एकच एक कारण जबाबदार आहे, असं म्हणता येणार नाही. शिक्षणव्यवस्थेपासून ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीपर्यंत सर्व गोष्टी याला जबाबदार आहेत. त्या सगळ्या घोळात तू नको पडूस. तू छानपैकी एक गीत ऐक. गदिमांनी लिहिलं आहे आणि खळेकाकांनी स्वरबद्ध केलेलं ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..’ हे अप्रतिम गीत ऐक. आशाताईंनी गायलेल्या या गीतातील शेवटच्या कडव्याचा शेवट जिथे होतो, तिथून पुन्हा ध्रुवपद येत नाही. एकदा ते अढळपद प्राप्त झालं की, ध्रुवपदावर यायचंही नसतं.

सखे, आपण सर्वांना सर्व शिक्षण या चक्रात अडकलो आहोत. यात उपजत आपल्याजवळ काय आहे, याचा शोध घेण्याची व्यवस्था नाही. हे उपजत गुण वेळेत शोधले तर कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्याचा मार्ग निश्चित होतो. एखादे मूल गणितात हुशार असेल तर त्याला इंग्रजी व इतिहास या विषयांत कमी पडलेले गुण त्याची एकूण मार्कांची टक्केवारी खाली आणतात. केवळ गणित हाच विषय घेऊन त्याला पुढे जाता येईल अशी व्यवस्था आपल्याकडे नाही. इतर विषयांत जरी त्याला काठावर मार्क पडले तरी जेवढे गणितात पडले आहेत, तेवढी त्याची एकूण टक्केवारी धरली जात नाही. याचा सर्वांत मोठा दोष म्हणजे पडलेल्या गुणांवरून गुणवत्ता ठरवली जाते.

ज्या दिशेने आपल्याला जायचे आहे, तेवढे मार्क मिळवण्यासाठी आपण धडपडतो. अन्यथा, जेवढी आपली टक्केवारी आहे त्यानुसार आपला मार्ग निवडणे हा पर्याय शिल्लक राहतो. ‘शिक्षणाची कुठलीच शाखा दुय्यम नसते’ असं कायम म्हणणारी माणसं कला शाखेत जाणार्‍या मुलांकडे तुच्छतेने पाहतात. अमुक इतके मार्क पडले तर विज्ञान, अमुक इतके पडले तर कॉमर्स, अमुक इतके पडले तर इंजिनिअरिंग अशी गुणांप्रमाणे केलेली गुणवत्तेमधील उच्चनीचता या समानताप्रेमी विचारवंतांना खटकत नाही. 

सखे, आपली दिशा काय असावी, हे आपल्याला पडलेले ‘मार्क्स’ ठरवतात आणि समाजाची दिशा काय असावी, हे ‘मार्क्सवादी’ ठरवतात यासारखे दुर्दैव दुसरे नाही! 

सखे, आपले नातेवाईक आप्तही विद्येच्या या शाखांकडे पोटापाण्याच्या व्यवस्थेपलीकडे जाऊन पाहत नाहीत. ‘कुठे गेल्यावर अधिक स्कोप आहे?’ हा विचार पालकांच्या मनात येणे चुकीचे नाही. आपल्या मुलांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता लाभावी, पुढील आयुष्य किमान पैशाच्या दृष्टीने तरी ‘सेफ झोन’मध्ये असावं असं वाटण्यात काहीच गैर नाही. 

‘त्यांचे चूक नाही, याचा अर्थ माझं चुकतंय असं तुला म्हणायचं आहे का?’

सखे, कायम चूक विरुद्ध बरोबर असा संघर्ष नसतो. आईबाबा बरोबर म्हणजे तू चूक आणि तू बरोबर म्हणजे ते चूक असं नसतं. दोघेही आपापल्या विचारांच्या कक्षेत बरोबर आहात. फक्त ते सिद्ध करण्याची जबाबदारी दोघांचीही आहे. 

‘म्हणजे तू म्हणतोयस की, आय हॅव टू प्रूव्ह देम राँग.’

नाही सखे, ते चुकत आहेत हे तुला नाही सिद्ध करायचं. तुला हे सिद्ध करायचं आहे की, तू बरोबर आहेस. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण, त्यासाठी तुला आधी स्वत:ला ओळखलं पाहिजे. बुद्धी ही एक ऊर्जा आहे. आपण तिला ज्या दिशेने वळवू त्या दिशेने ती वळते. आपल्याच मनाला घातलेले भीतीचे बांध आपल्याला ऊर्जेला वळवण्यापासून रोखतात. तुला इंग्रजी विषय घेऊन आर्टस् का करायचं आहे, याचा पक्का व पूर्ण विचार तू कर. आत्तापर्यंत तू किमान जेवढे टक्के मिळवीत आली आहेस, ते ९५ टक्के मार्क मिळव आणि  मग तू आर्टस्ला जा. कमी मार्क मिळाले म्हणून आर्टस्चा पर्याय नाइलाजाने निवडावा लागला, असे म्हणायला जागा ठेवू नकोस. त्यावरही तुझा निर्णय कसा चुकीचा आहे, हे इतरांच्या अनुभवाने तुला सांगण्याचा प्रयत्न होईलच. तो अजिबात मनावर घेऊ नकोस. ठामपणे वाटचाल करीत राहा. 

सखे, सर्वांत आधी आपल्याला ज्या दिशेने, ज्या शाखेला जायचे आहे, त्यात उपजत गती आहे का, याचा विचार कर. केवळ तुझी मैत्रीण किंवा मित्र आर्टस् करतात म्हणून तू जाऊ नकोस. आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, ‘मी काय करू?’ हे मला विचारावं लागणार नाही. तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...


रविवार, ६ मार्च, २०२२

देवबाप्पा बघतोय....

देवाचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व आपण लहानपणीच घालवून बसलो आहोत. आपल्या मुलांच्या बालपणातूनही देव नाहीसा करत चाललो आहोत. ‘देवबाप्पा बघतोय’ ही केवळ भीती नाही, ‘देवबाप्पा बघतोय’ हा विश्वासही आहे, हेच आपण विसरतो. तो आहे, याची भीतीही असायला हवी आणि तो आहे, हा विश्वासही आवश्यक आहे.










देव म्हणजे काय रे? तो खरोखरच असतो का?’


सखे, तुला हे असं कधीपासून होतंय? काल परवापर्यंत विज्ञाननिष्ठ वगैरे होतीस ना तू? कपाळावर कुंकू लावायलाही लाज वाटायची तुला. आज अचानक एवढी जिज्ञासा?


‘खवचटपणा बंद कर. तू प्रश्न न विचारता उत्तर देणार आहेस का?’


सखे, मी उत्तर देईन गं. पण, तुला ते बोअरिंग फिलॉसॉफी वगैरे वाटणार असेल तर मग कठीणच आहे.


‘देतोसच तू बोअरिंग, न कळणारे अवघड शब्द वापरून बोजड भाषेतील लेक्चरे. अनेकदा पटत नाहीत मला. पण, तू गाणी ऐकायला सांगतोस ते जाम आवडतं. तू सोप्या शब्दांत सांग ना.’


सखे, तुला पुरुषसूक्तातला पहिलीच ऋचा ऐकवतो. 

ॐ स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः । स॒ह॒स्रा॒क्षः स॒हस्र॑पात् ।

स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वा । अत्य॑तिष्ठद्दशाङ्गु॒लम् ॥


आता त्याच अर्थाची मोरोपंतांची आर्याही ऐक

भूजल तेज समीरख रवि शशि काष्ठादिकीं असे भरला।

स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला ॥ 

संस्कृतातील ऋचेचा अर्थ तुला कळणार नाही. मोरोपंतांच्या मराठीतल्या आर्येचा अर्थही कळणे कठीणच जाईल. न कळण्यासाठी दोष ऋचेच्या कर्त्यांना द्यायचा, आर्या रचणार्‍या मोरोपंतांना द्यायचा की, तो अर्थ शोधण्याची तसदी न घेणार्‍या आपणाकडे घ्यायचा याचा विचार ज्याचा त्याने करावा. शब्दार्थ शोधण्याचा रस्ता आपण ‘क्रॉस’ करणे सोपे की, ‘ओलांडणे’ सोपे हे ज्याचे त्याने ठरवावे. ‘ओलांडणे’ समजत नसेल आणि ‘क्रॉस करणे’ समजत असेल तर दोष रस्त्याचा कसा?


‘बर्वेबुवा पुरे आता. देतोस माझ्या प्रश्नाचे उत्तर की, जाऊ?’


सखे, तू रागावल्यानंतर फारच सुंदर दिसत असलीस तरी रागावू नकोस आणि निघूनही जाऊ नकोस. दोष माझ्या सांगण्यात आहे, हे मी अमान्य करत नाही. जसं जमेल तसं सांगतो. तरीही तू ऐकतेस, मला सहन करतेस हेच  मोठं आहे. 

देव ही मानवनिर्मित संकल्पना नाही. माणसाच्या संकल्पनेतून देवाची निर्मिती झाली नाही. माणूस नव्हता तेव्हाही देव होता आणि नसेल तेव्हाही देवच असेल. विश्वातच असलेल्या रचनेला माणसाने आपल्याला समजावे म्हणून किंवा समजेल अशा एका  संकल्पनेत बसवले, ज्याचे नाव ‘देव’. एका अर्थाने मर्यादित केले. ज्या रचनेला आकार नाही, त्याला साकार केले. पण, समजण्यास सोपे केले. या वैश्विक रचनेला समजण्याचे दोन मार्ग आहेत. एक ज्ञान आणि दुसरा भक्ती. ज्यांच्याजवळ ज्ञान आहे, त्यांनी ती रचना ज्ञानाने समजून घ्यावी आणि ज्यांच्याजवळ भक्ती आहे, त्यांनी ती भक्तीने समजून घ्यावी. 


‘ज्ञानाने जे समजेल ते ज्ञान नसलेल्यालाही भक्ती केल्याने समजेल, हे पटत नाही. ज्ञान हा बुद्धीचा भाग आहे आणि भक्ती श्रद्धेचा प्रांत आहे. विज्ञान देव मानीतच नाही. मग, विज्ञाननिष्ठ, ज्ञानवंत आणि भक्त यांना देव कसा समजेल?’ 


सखे, हाच प्रश्न उद्धवाने (महाभारतकालीन) कृष्णाला विचारला होता, जेव्हा कृष्णाने त्याला देव समजण्यासाठी गोपींच्याकडे जायला सांगितले. कृष्ण सांगतो म्हणून उद्धव गोपींच्याकडे जाऊन राहिला. ज्या निर्गुण, निराकाराला  उद्धवाने ज्ञानाच्या माध्यमातून जाणले होते त्याच देवाला निरक्षर, अशिक्षित गोपी भरवत होत्या, त्याच्यासोबत खेळत होत्या, भांडत होत्या, त्याच्यावर प्रेमही करत होत्या. सर्व मानवी भावनांमधून आणि नात्यांमधून त्यांना विश्वाची रचना समजली होती. ज्ञानाच्या विरुद्ध भक्ती नाही. अहंकारविरहित ज्ञान म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे, टिळा, गंध, उपासना नव्हे. ज्ञान वजा अहंकार म्हणजे भक्ती. भक्त, ज्ञानी असण्यापेक्षाही ज्ञानी, भक्त असणे फार महत्त्वाचे आहे. आपण आजकाल सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत नाही. आपण ज्ञानी आहोत, सश्रद्ध व भक्त नाही. म्हणूनच, आपल्याला देव समजत नाही.

सखे, देव हा शब्दच मुळात दिव् या धातूपासून तयार झाला. ‘दिव्’ म्हणजे प्रकाशणे, चकाकणे.  देव याचे इतर संस्कृतीमध्ये समानार्थी शब्द पाहिले तर आश्चर्य वाटतं. संस्कृत ’देव’, प्राचीन नॉर्स ’तिवार’ लॅटिन ’देयूस’, लिथुनिअन ’दिवास’, इराणी ’दिअ’, केस्टिक- ’दिओस’, गॅलिक ’दिओग्नत’.  निसर्गपूजक सर्व संस्कृतींमध्ये हे देवासाठी एकसमान शब्द काय सांगतात? संपूर्ण जगात निसर्गपूजक व विश्वरचना जाणणार्‍या संस्कृतींचे सहअस्तित्व होते. प्रेषितांच्या पंथांनी जगभरातील या संस्कृती संपवल्या. उंच पिकांतून डोलणारा आणि बाळमुखातून बोलणारा देव केवळ प्रेषितांच्या माध्यमातून सांगू लागला आणि आपल्यापासून दूर गेला. इतका दूर की त्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका वाटू लागली. त्याची भीतीही गेली आणि त्याच्यावरचा विश्वासही नष्ट झाला. त्याला समजणे कठीण, दुरापास्त झाले.

सखे, उपनिषदांमध्ये एक कथा आहे. शिष्य गुरूला विचारतो 'देव, ज्ञान म्हणजे काय?' गुरू सूर्याकडे बोट दाखवतो. रात्र होते. शिष्य विचारतो, 'आता ज्ञान म्हणजे काय?' गुरू चंद्राकडे बोट दाखवतो. अमावास्येच्या रात्री शिष्य पुन्हा तोच प्रश्न विचारतो. गुरू मिणमिणत्या दिव्याकडे बोट दाखवतो. थोड्यावेळाने वार्‍याचा झोत येतो आणि दिवा विझतो. शिष्य विचारतो, 'गुरुजी सूर्य दाखवून झाला, चंद्र दाखवून झाला शेवटी दिवाही दाखवलात. आता दिवा विझला. अंधार झाला आहे. आता कुणाकडे बोट दाखवणार?' गुरू त्याला विचारतात, 'वत्सा, अंधार आहे हे कशामुळे समजलं? अंधार आहे हे ज्याच्यामुळे समजलं तेच आत्मज्ञान, तेच ब्रह्म, तोच देव.' हेच सूत्र गौतम बुद्धांनी ‘आत्मदीपो भव:’ म्हणत मांडले आहे. या वैश्विक जाणिवेलाच चैतन्य, ब्रह्म अशी अनेक नावे वेगवेगळ्या संदर्भात आहेत. ही वैश्विक जाणीव सर्वत्र आहे. 


‘देव देवळात आहे, तर तो सर्वत्र कसा असू शकेल आणि देव सर्वत्र आहे, तर त्याला देवळातच का बंदिस्त करायचे?’ 


सखे, आपण त्याला कसे पाहतो, समजतो त्यावर ते अवलंबून आहे. निर्गुण, निराकार चैतन्य सर्वत्र आहे. ते ब्रह्म एकच आहे. जेव्हा आपण त्याला सगुण साकार पाहतो, तेव्हा देव, देवस्थान याला महत्त्व येते. देवस्थानात आहे, म्हणजे तो इतरत्र नाही, असा त्याचा अर्थ नाही. तो निर्गुण निराकारही आहे आणि सगुण साकारही आहे. तो सर्वत्र आहे, मग देवळात का जावे, हा प्रश्न विचारणार्‍याने आधी स्वत:ला विचारावे, ‘तो सर्वत्र आहे, याची जाणीव मला झाली आहे, की फक्त तर्क मांडायचा म्हणून मांडतोय?’ खरोखरच ही जाणीव जर झाली असेल तर देवळाचे प्रयोजन त्याच्यापुरते राहत नाही. देवळाच्या असण्यानेही फरक पडत नाही आणि नसण्यानेही पडत नाही. फरक पडत नसल्याने देवाची मूर्ती फोडण्याची आणि देवळे पाडण्याचीही गरज उरत नाही. आपण बुतपरस्त (मूर्ती पूजा करणारे) नाही याचा अर्थ आपण बुतशिकन (मूर्ती तोडणारे) झालेच पाहिजे, असे नाही. ज्ञानवंतांनी श्रद्धावानांचा आदर राखावा आणि श्रद्धावानांनी ज्ञानवंतांचा. 

सखे, लहानपणी आई सांगायची, ‘वाईट बोलू नकोस, देवबाप्पा ऐकतोय. चुकीचं वागू नकोस, देवबाप्पा बघतोय...’ माझ्याही नकळत मी या मला पाहणार्‍या, ऐकणार्‍या देवबाप्पाला शोधायचो. तो दिसला नाही, पण तो आहे याची भीतीही वाटायची आणि धीरही वाटायचा. पुढे पुढे जास्त अक्कल आली तशी, देवबाप्पा वगैरे काही नसतो. उगाच आपल्याला भीती घालण्यासाठी सगळं सांगितलं जातं अशी भावना दृढ होत गेली. विज्ञानाचं वारं अंगावरून गेलं आणि आमच्या देवभक्तीला लकवा मारला. आयुष्याच्या संध्याकाळी आता पुन्हा देवाचा शोध सुरू केला तेव्हा तोच देव विज्ञान, ज्ञान आणि श्रद्धा यापलीकडे जाऊन स्वत:च्या डोक्यात मोरपीस खोवून बासरी वाजवत बसलेला आढळला. 

सखे, आपण विज्ञाननिष्ठ असणे म्हणजे देवपूजेला विरोध करणे किंवा हीन समजणे, असा भ्रम जाणीवपूर्वक तयार केला आहे. म्हणूनच आपण देवपूजा करणार्‍या शास्त्रज्ञाची, विज्ञाननिष्ठाची टिंगल उडवतो. विज्ञानाच्या अभ्यासकाने देव मानणे हे महापाप समजतो. विज्ञाननिष्ठ किंवा नास्तिक म्हणतात, 'देव असल्याचा पुरावा द्या मग आम्ही देव मानू. अन्यथा देव आहे, ही आस्तिकांची केवळ श्रद्धाच आहे. त्याला पुरावा नाही.' त्याच न्यायाने देव नसण्याचाही पुरावा नाही. म्हणजेच नास्तिकांनी देव नाही, असे म्हणणे हीसुद्धा नास्तिकांची श्रद्धाच आहे, त्याला पुरावा नाही.  

श्रद्धा आणि ज्ञान एकमेकांच्या विरुद्ध नाही, ते एकमेकांना पूरक असलेले आत्मविकासाचे टप्पे आहेत.  हे ओलांडल्यानंतर देव, ब्रह्म, चैतन्य, विश्वरचना याची प्रचिती येते. त्यामुळे, आपल्या मानण्यावर देवाचे अस्तित्व नाही. मानले तरी देव आहेच, नाही मानले तरी देव आहेच. हे देवाचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व आपण लहानपणीच घालवून बसलो आहोत. आपल्या मुलांच्या बालपणातूनही देव नाहीसा करत चाललो आहोत. ‘देवबाप्पा बघतोय’ ही केवळ भीती नाही, ‘देवबाप्पा बघतोय’ हा विश्वासही आहे, हेच आपण विसरतो. तो आहे, याची भीतीही असायला हवी आणि तो आहे, हा विश्वासही आवश्यक आहे. 

सखे, चल आपण त्यांच्या आयुष्यात देवबाप्पाला पुन्हा आणू. आपणही त्यांच्यासोबत लहान होऊ. म्हणजे मग त्यातील कुणीही मोठे झाल्यानंतर एक प्रश्न विचारणार नाहीत.


‘कुठला?’


‘देव म्हणजे काय रे? तो खरोखरच असतो का?’

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मानसीचा चित्रकार तो...




सखे, चित्र काढायला काय काय लागतं?

‘असा काय लहान मुलांना विचारल्यासारख प्रश्न मला विचारतोस? माझी फिरकी घ्यायची आहे का? चित्र काढायला पेन्सिल, कॅनव्हास आणि रंग लागतो.’

बस एवढंच?

‘हो! आणखी काय लागणार?’ 

सखे, चित्र म्हणजे काय? घाबरू नकोस. प्रश्नोत्तरांचा तास सुरू नाही करत. असे प्रश्न मला अनेकदा पडतात. अनेकांना विचारतोही. वेगवेगळी उत्तरे मिळतात. कुणी म्हणतं अनेक कलांपैकी एक कला आहे, तर कुणी म्हणतं कागदावर मारलेल्या रेघोट्या. ही केवळ उत्तरं नाहीत, हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. गणित आणि कला ही एकाच प्रवाहाची दोन टोकं आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गणितच असतं. हे गणित जमू लागलं की त्याची कला होते. गणित सोडवणं किचकट असतं, कलेचा आविष्कार मनमोहक असतो. गणितं सोडवणार्‍याला चित्रापलीकडे असलेली कला पाहता येते. गणितातच अडकून पडलेल्यांसाठी त्या रेघोट्याच असतात.

सखे, अनेक वर्षांपूर्वी दीनानाथ दलालांचे चित्रप्रदर्शन पाहायला सेंट्रल लायब्ररीत गेलो होतो. तेव्हा, प्रत्येक चित्रासमोर स्तब्ध झालो. माझ्यामागून चित्र पाहून जाणार्‍यांचे चेहरे, ’काय यडपटासारखा बघत राहिला आहे?’ असं न बोलताही बोलून जायचे. दलालांच्या चित्रातली रेषन रेष बोलकी असते. प्रत्येक रंग आपला वेगळाच रंग दाखवत असतात. आपण जे पाहतो ते चित्र नसतच. आपल्याच भावभावना आपण पाहत असतो. चित्रामध्ये दिसणारी ’ती’, दलालांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेली चित्रवती नसते, ती तर आपलीच सखी असते.  प्रत्येक चित्रामध्ये तू दिसू लागल्यानंतर मी वेड्यासारखा स्तब्ध होणार नाही तर आणखी काय होणार? 

‘पुरे हां! तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, हे दाखवायची एकही संधी सोडू नकोस.’

सखे, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही मी असाच स्तब्ध झालो होतो. तो क्षण आजही जसाच्या तसाच मनावर रेंगाळला आहे. पी. सावळारामांचं एक गीत ऐकलं की तो क्षणही मनमोहक होतो. ’मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो’ हे गीत तू नक्की ऐक. हे गीत लिहिलंय सावळ्या रामाची उपाधी लाभलेल्या निवृत्तीनाथानेे, त्याला संगीत दिलं आहे वसंत प्रभूंनी आणि मखमली गळ्यातून उतरवलं आहे हृदयाच्या नाथाने. असा त्रिवेणी संगम नियती नावाच्या विचित्रकारालाही क्वचितच जमतो. 

सखे, या गीतामध्ये एक गंमत आहे. सकाळ, संध्याकाळ आणि रात्र अशा तीन वेळा या गाण्यातून रेखाटल्या आहेत. रणरणती दुपार मात्र कवीने टाळली आहे. ही पोळून काढणारी दुपार कदाचित आयुष्याचा कॅनव्हास असावा ज्यावर हे तीन काळ आपले रंग, रूप दाखवून जातात. 

सखे, माझा एक चित्रकार मित्र आहे. अप्रतिम चित्रे काढतो. तो एकदा प्रेमात पडला. मग काय विचारता? प्रत्येक चित्र प्रेयसीचेच काढू लागला. ती कठड्यावर हात ठेवून उभी आहे आणि निसर्गसौंदर्य पाहते, हे चित्र त्यानं इतकं सुंदर काढलं होतं की, मलाही ते फार आवडलं. विचारलं त्याला, हा वेडेपणा का करतोस. तो म्हणाला, दुसरं काही सुचतंच नाही, तिच्याशिवाय कुंचल्यातून कुणीच कॅनव्हासवर साकारत नाही. त्याची प्रेयसी मात्र व्यवहारी निघाली. एका श्रीमंताशी लग्न ठरलं, तेव्हा बोलेनाशीच झाली. त्याचा फोनही घेईनाशी झाली. तो चित्र काढेल म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवर स्वत:चे फोटोही ठेवणे तिने बंद केले. त्याला भेटणे तिने बंद केले. ती त्याला टाळू लागली.  अर्थात पुढे जे व्हायचं तेच झालं. 

तिचं लग्न झाल्यानंतर सहज एकदा मित्राला भेटायला गेलो. त्याच्या प्रेयसीचं त्यानं काढलेलं जे चित्र मला आवडलं होतं तेच तो पुन्हा चितारत होता. तोच निसर्ग होता, तोच कठडाही होता. फक्त त्यात कठड्यावर हात ठेवून उभी असलेली प्रेयसी नव्हती. विचारलं त्याला, चित्रात ती का नाही? तो एवढंच म्हणाला, चित्रातून तिला दूर करणं सोपं होतं, मनातून कसं दूर करू? त्याच्या मनाच्या कॅनव्हासवरून तिच्या स्मरणाचं चांदणं काही केल्या सरतच नव्हतं. त्याच्या मानसीचा चित्रकार तिचंच चित्र काढत होता आणि माझा मित्र तिचं चित्र काढत नव्हता, कुठलंंच चित्र काढत नव्हता. ही अवस्था म्हणजेच त्या गाण्यात टाळलेली टळटळीत दुपार. 

सखे, तिची भेट त्याच्यासाठी पहाटेचे रंग भरणारी निळी मोहिनीच होती. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत विरह देणारी संध्याकाळही मोहकच होती. नक्षत्रांचा निळा चांदवा झरवणारी रात्रही स्वप्नवत होती. पण, ती सोडून गेल्यानंतर पुन्हा कधीच, काहीच रम्य राहिलं नाही. त्याला चित्र काढणं त्यानंतर जमलंच नाही कधी. का माहिती आहे? 

‘का?’

सखे, त्याच्याकडे कॅनव्हास होता, पेन्सिल होती, रंग होते. फक्त अंतरंग नव्हते.

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

ती असं का वागली?

स्त्री, पुरुषाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जवळ येऊ देते. अनेकदा तिच्या स्वैर वागण्यातून पुरुष भलतेच अर्थ काढून मोकळा होतो. वास्तविक वर्तुळबाह्य पुरुषाशी स्त्रीचं लाघवी बोलणं, मधाळ हसणं हे सोयीपुरतं, गरजेपुरतं असतं. ती गरज संपली की, स्त्री वर्तुळबाह्य पुरुषाला लगेच ’जागा’ दाखवून देते.



’ती असं का वागली?’

हा त्याचा प्रश्‍न माझ्या मनात बरेच दिवस घोळत होता. त्रास देत होता. सखे, दु:ख त्रासदायक असतं. पण, त्या दु:खाचं कारण न समजणं त्याहूनही जास्त त्रासदायक असतं. झालं असं की माझ्या मित्राने त्याच्या मैत्रिणीचं एक काम करून दिलं. तिनच त्याला ते सांगितलं होतं. त्या कामासंदर्भातच त्यानं तिला बोलावलं. पण ती आली नाही. सवड नसेल, असं म्हणून तो गप्प बसला. परंतु, असं चार पाच वेळा घडलं, तेव्हा त्याला त्याचं दु:ख झालं. यथावकाश त्या कामातल्या अडचणी दूर सारून त्यानं कामही करून दिलं. त्याने परहस्ते ते काम पाठवूनही दिलं. तिने मेसेज पाठवून त्याचे धन्यवाद मानले. केलेल्या कामाचे पैसेही देण्याबद्दल सांगितलं. काम करणे, कामाबद्दलच्या पैशांची देवाणघेवाण हा व्यवहार होता. त्याला दु:ख झालं ते तिच्या न येण्याचं. त्यानं मला त्या दु:खावर शेरही ऐकवला;

हो गया हिसाब पाई पाई का बाकी न आना रह गया

न रही उम्मीदें जिंदगीसे बस तेरा न आना रह गया

त्यानं ’आना‘ हा एकच शब्द ’आणे‘ आणि ’येणे’ या अर्थाने वापरणं मला आवडलं. त्यामागचं दु:ख जाणवलं. ’ती असं का वागली?’ हा त्याचा प्रश्‍न खूप त्रास देऊन गेला. आपल्याला माहीत असलेलं दु:खाचं कारण इतरांच्या अनुभवास आलेलं असलं तरीही त्रास देऊन जातं. 

सखे, तू सुद्धा अशी जेव्हा रुसून जातेस तेव्हा मला त्रास होतो. कधी कधी येतेस बोलावल्यावर. पण, इतक्या लवकर निघून जातेस, की असं वाटतं न आली असतीस तरी चाललं असतं. तुझं येऊन लवकर निघून जाणं, तुझ्या न येण्यापेक्षाही जास्त त्रास देतं. बघ, आला ना राग? खरं सांगितलं की माणसाला राग येतो. लटकं सांगितलं की लगेच पटतं. तुझा राग घालवण्यासाठी एक गझल ऐकवतो. ’ले चला जान मेरी’ ही गझल लाइव्ह ऐकण्यात खूप मजा आहे. यातल्या अनेक जागा  

गुलाम अली अशा काही खुलवतात की दु:खही सुख देऊन जातं. हीच गझल मी अबिदा परवीन यांच्या आवाजातही ऐकली आहे. पण, ती ध्वनिमुद्रित होती. 

सखे, किती रागावशील? ही गझल ऐक. फणकार्‍याने मान वळवल्यानंतर तुझ्या बटा वार्‍यावर अधिकच उडू लागतात. त्या इतक्या अस्वस्थ का आहेत? डोळे न वळवताही डोळ्यांच्या कोपर्‍यातून नको ना पाहूस. बहुतेक, तू हृदय तोडलेल्या कुठल्यातरी प्रियकराच्या आठवणीने त्या बटा व्याकूळ झाल्या असाव्यात. कित्ती हा राग? तू रागावून पाहिलंस आणि डोळ्यासमोर वीज चमकली बघ माझ्या. अगं गंमत केली तुझी. तुझ्या केसांच्या बटा प्रियकराच्या आठवणीने नाहीत तर वार्‍यामुळे अस्वस्थ आहेत, हे मला पक्कं माहीत आहे. सोड ना हा रुसवा हे रागावणं. 

सखे, मला माहिती आहे तुला उत्सुकता त्या मित्राची ती मैत्रीण असं का वागली, हे जाणून घेण्याची. कारणं अनेक असू शकतात. देता येण्यासारखी आणि देता न येण्यासारखीही. तू नाही का, यायचं तुझ्या मनात असलं की केव्हाही, कधीही बिनधास्त येतेस. नसेल यायचं, तर मग हजारो कारणं. पटणारी, न पटणारी. ती का आली नाही, हे तिचं तिलाच ठाऊक. 

सखे, माणसाला माणसं हवी असतात. बरेचदा ती काही कारणपरत्वे असतात. एखादी गरज, एखादे कार्य होईपुरतीच त्यांची आवश्यकता असते. त्यापेक्षा अधिक ती नको असतात. प्रत्येक माणूस स्वत:भोवती अनेक वर्तुळं आखून घेत असतो. अगदी आतल्या वर्तुळात तो स्वत:लाच ठेवत असतो. इतर कुणीही त्याला नकोसं असतं. यालाच साहेबाच्या भाषेत ’प्रायव्हेट स्पेस’ म्हणतात. यानंतरच्या वर्तुळात अगदी जवळची नाती आईवडील, नवराबायको, मुलं येतात. त्यानंतरच्या वर्तुळात मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, सगे सोयरे असतात. त्याही बाहेरील वर्तुळात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असणारे सहयोगी असतात. अशी असंख्य वर्तुळे बदलत्या प्राधान्यक्रमाने असतात. ही वर्तुळे अंतर ठेवण्यासाठी, दाखवून देण्यासाठी असतात. 

सखे, मला आवडलेली गाणी अनेकांना मेल करण्याची सवय आहे. काही माणसं प्रतिसाद देतात. आपल्याला आवडलेल्या जागा, त्या गाण्याबद्दलचे अनुभवही शेअर करतात. सुरुवातीला प्रतिसाद आला नाही की, मला प्रचंड त्रास व्हायचा. एरव्ही इतरांशी प्रचंड बोलकी असणारी माणसं आपल्याशी दुर्मुखलेली का वागतात? असा प्रश्‍न पडायचा. आपल्याबद्दल त्यांच्या मनात काही गैरसमज तर नाही ना, हा विचार छळून जायचा. मी गाणी पाठवण्यामागे त्यांनी भलताच हेतू चिकटवला नसेल ना, असही वाटायचं. मित्राला सांगितलेल्या विनोदावर तो पोटशूळ असल्यासारखा चेहरा करायचा. तोच विनोद त्याला दुसर्‍या कुणी ऐकवला की, पोट धरून हसायचा. विनोद वाईट नसतो, सांगणाराही चुकीचा नसतो. फक्त तो हव्या असलेल्या वर्तुळातला नसतो. चौकोनी कुटुंबात ही आखलेली वर्तुळे स्पष्ट दिसतात. त्यावर उभारलेल्या अदृश्य परंतु अभेद्य भिंती प्रचंड छळतात. नवरा बायकोमध्येही ही वैयक्तिक वर्तुळे असतात. त्या जागेमध्ये नवर्‍यानं किंवा बायकोनं किती आत शिरायचं याचे वज्रलेपित ठोकताळे असतात. आपल्या माणसाला जपण्याऐवजी ही ‘प्रायव्हेट स्पेस’ जपली जाते. 

सखे, स्त्री, पुरुषाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जवळ येऊ देते. अनेकदा तिच्या स्वैर वागण्यातून पुरुष भलतेच अर्थ काढून मोकळा होतो. वास्तविक वर्तुळबाह्य पुरुषाशी स्त्रीचं लाघवी बोलणं, मधाळ हसणं हे सोयीपुरतं, गरजेपुरतं असतं. ती गरज संपली की, स्त्री वर्तुळबाह्य पुरुषाला लगेच ’जागा’ दाखवून देते. 

'प्रत्येक खेपेला स्त्रीच्या असं वर्तुळं आखून वागण्यामागे गरज किंवा स्वार्थच असतो, असं तुला म्हणायचं आहे का?'

सखे, तू अशी लगेच पर्सनली घेऊन भांडू नकोस ना. तिला तिच्या सुरक्षिततेसाठी तसं वागणं अपरिहार्य असतं, हे मान्यच आहे. त्याबद्दल वादच नाही. पण, जशी प्रत्येक स्त्री स्वार्थी नसते, त्याप्रमाणेच प्रत्येक पुरुष ’त्याच’ अर्थाने स्त्रीकडे पाहतो, असा पूर्वग्रह बाळगणेही चुकीचेच नाही का? त्याचा त्रास संवेदनशील माणसाला होतो. 

'म्हणजे तू असं म्हणतोस की, स्त्रीने वर्तुळे आखणे ही स्त्रीचीच चूक आहे? समजा तिने अशी वर्तुळे आखलीच नाहीत तर त्याचा गैरफायदा पुरुष घेणारच नाही याची काय गॅरंटी? तू एक पुरुष आहेस, म्हणून तुझा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तसाच आहे. एकदा स्त्रीच्या दृष्टिकोनातून स्त्रीकडे पाहा. म्हणजे मग कळेल.'

अरे देवा! तुझा माझ्याशी भांडायचा मूड आहे का? सखे, तू म्हणतेस तसेही असेल कदाचित. मी पुरुष असल्याने स्त्रीच्या भावना मला कळत नसाव्यात. मी जे म्हणतोय त्याचं तू सार्वत्रिकरण नको करूस. सगळ्याच स्त्रिया व सगळेच पुरुष तसेच असतात असे म्हणणे योग्य नाही. सर्वस्व बहाल करून बसलेल्या स्त्रीला जसा प्रतारणेचा त्रास होतो, त्याहीपेक्षा जास्त त्रास, स्त्रीने ही वर्तुळे आखून वापर करून घेतल्यामुळे एखाद्या पुरुषाला होतो. 

सखे, या वर्तुळांचा त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण त्या व्यक्तीमध्ये भावनेने गुंतलेले असतो. निखळ मैत्री हवी  असलेली माझ्यासारखी माणसं, या वर्तुळांकित वागण्याने प्रचंड दुखावली जातात. आपुलकीच्या आडून साधला जाणारा स्वार्थ छळतो. आपला वापर झालाय ही भावना बोचते. सेवा पुरवणे, विक्री करणे हा ज्यांच्या व्यापाराचा भाग असतो, त्यांना या आपुलकीशी काही देणंघेणं नसतं.  समोरच्याने कितीही सलगी, आपुलकी दाखवली तरीही आपला फायदा व्यापारी सोडत नाही. आखलेली वर्तुळं स्वत:च्या स्वार्थासाठी  भेदून पुढे होणारी माणसं, दुसरा माणूस त्या वर्तुळात येऊ लागला की जागी होऊन त्याला ’जागा’ दाखवतात. अशा ’वापरून’ घेणार्‍या माणसांपेक्षा ’व्यापारी’ खूप चांगला. 

सखे, मित्राला त्रास झाला कारण त्यानं निखळ मैत्रीची अपेक्षा ठेवली. तिच्या येण्याची अपेक्षा ठेवली. त्याला बोचणी आहे, ती तिच्या न  येण्यापेक्षाही, तिने न येऊन दाखवून दिलेल्या, तिच्या आयुष्यातल्या  त्याच्या स्थानाबद्दलची आहे. ज्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात खूप स्थान देतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्यासाठी जागाच नसल्याचं ते दु:ख आहे.  आपल्या भावना अव्यक्त, निरपेक्ष ठेवाव्या. त्या व्यक्त केल्या किंवा समोरच्या व्यक्तीकडून भावना समजण्याच्या अपेक्षा ठेवल्या की, एक प्रश्‍न आपल्याला कायम छळतो;

’ती असं का वागली?’