ऐक सखे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऐक सखे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

जो नही मिला उसे भूल जा....

‘आता हे वर्ष संपत आले. नवीन वर्ष येईल. पण सगळे तसेच आहे. काही फरक पडला नाही. कॅलेंडर बदलते, तारखा बदलतात. परिस्थिती तशीच राहते. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यातील दरी वाढतच आहे. तत्त्वज्ञांनी फक्त जगाचे अनेक प्रकारे विवेचन केले, पण हे जुने जग बदलण्याचा कुणीच प्रयत्न करत नाहीत’

सखे, बरी आहेस ना? तुला माझ्यापेक्षा मार्क्स जास्त मिळाले होते हे ठीक आहे, पण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सांगायला आलीस आणि हे काय ऐकवत आहेस?

‘तोच संकल्प आहे. काय नाही मिळाले यापेक्षाही काय मिळाले याचा विचार मी पहिल्यांदा करेन, हाच संकल्प आहे. प्रगतीसाठी ‘नाही’ विरुद्ध ‘आहे’ याचा संघर्ष होणे अटळ आहे. मला कायम जे नाही मिळाले तेच पहिल्यांदा आठवते’. 

सखे, तो संघर्ष वगैरे जाऊ दे. त्यामुळे प्रगती वगैरे होते की अधोगती होते, तेही जाऊ दे. आपल्यामध्ये भांडणे मात्र निश्चितच होतात. या दोन्ही गोष्टी सुखात किंवा दु:खात ढकलतात. समाधानाने जगू देत नाहीत. 

‘कितीही तत्त्वज्ञ वगैरे असलास तरी ती गोमंतकीय असल्यामुळे ‘सुशेगाद’ आहेस. जग बदलण्यासाठी तुला काहीच करायचे नाही’.

सखे, तत्त्वज्ञ वगैरे म्हणून शिव्या नको घालूस. मी सामान्य माणूस आहे. ‘सुशेगाद’ म्हणजे तुला वाटते तसे आळशी, कृती न करणे नव्हे; ‘सुशेगाद’ म्हणजे समाधानी असणे.

‘समाधान म्हणजे मनाची समजूत घालणे. नाही मिळाले ना सोडून दे असे म्हणणे. प्रयत्न न करणे’. 

सखे, तुला माझे म्हणणे कधी पटले आहे, जे आज पटेल. त्यामुळे, हे भांडण, वादविवाद सोड आणि मस्तपैकी अमजद इस्लाम अमजद यांची ‘कहाँ आ के रुकने थे रास्ते’ ही गझल ऐक. तोवर मी कॉफी करतो. हृदयाची सतार छेडत येणारा उस्ताद शुजात खान यांचा स्वर ऐक. 

सखे, आपण ‘मिळाले’ आणि ‘मिळाले नाही’, यात फार अडकतो. दु:खात बुडतो आणि सुखात वाहवत जातो. ‘आहे रे’ला ‘नाही रे’च्या विरुद्ध ठेवल्यामुळे आपण कायम संघर्ष करण्यात सगळी शक्ती घालवतो. त्यातून मागणी आणि तक्रार करू लागतो. वास्तविक, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. 

‘तुझे नेहमी काहीतरी वेगळे, विचित्र असते. पूरक कसे असेल, विरुद्धच तर आहे’.

सखे, सगळ्यांजवळ असते किंवा सगळ्यांजवळ नसते तर आहे आणि नाही याला काही अर्थच उरत नाही. गरीब आहे म्हणून कुणीतरी श्रीमंत आहे. सगळेच श्रीमंत असते तर गरिबीला अर्थ उरला नसता आणि सगळेच गरीब असते तर श्रीमंतीला अर्थ उरला नसता. कमी जास्त हे असायचेच. विषमता हा संघर्षाचा पाया नाही तर एकत्र येण्याचा मार्ग आहे. कामगार विरुद्ध नोकर असा संघर्ष निर्माण केल्याने, संपूर्ण आशिया खंडात एकेकाळी प्रथम स्थानावर असलेला पश्चिम बंगाल, आज भिकेकंगाल आहे. हे मालक विरुद्ध नोकर करण्याचं लोण कुटुंबातही पोहोचलं. बायकोचे नवर्‍याला ‘मालक’ म्हणणेही खटकू लागले. ‘मालक म्हणायला बायको काय नोकर आहे का?’ असले प्रश्न विचारले जाऊ लागले. नवरा मालक असेल तर बायको मालकीण असते, हे लक्षांत आले नाही. त्यामुळे, नवरा विरुद्ध बायको असा नाते-संघर्ष निर्माण झाला. स्त्री विरुद्ध पुरुष या प्रकारात सगळी नाती भरडली. स्त्री व पुरुष विरुद्ध नाहीत, ते एकमेकांना पूरक आहेत. 

आपल्या नवर्‍याचा कायम सर्वांसमक्ष पाणउतारा करणार्‍या बायकोने कधीतरी तो किती राबतो याचा विचार करून पाहावा. बायकोने केलेल्या स्वयंपाकाचे शेवटचे कौतुक आपण कधी केले होते हे नवर्‍याने एकदा आठवून पाहावे. नवर्‍याच्या उणीवा काढल्याने बायको चांगली ठरत नाही आणि बायकोच्या उणीवा काढल्याने नवरा श्रेष्ठ ठरत नाही. जिथे उणीव आहे तिथे दोघांपैकी कुणीही उभे राहत नाही, असाच त्याचा अर्थ होतो. 

सखे, आपल्याला नसण्याची तक्रार तेव्हाच करता येते जेव्हा आपण असण्याबद्दल कृतज्ञ असतो. आहे ते टिकवण्यासाठी आणि नाही ते मिळवण्यासाठी धावताना कधी तरी थांबून आपण त्याचा विचार करतो का? प्रत्येक गोष्ट आपण घट्ट धरून बसतो व त्यात अडकतो. बनारसच्या व्यापार्‍यांना माकडे फार त्रास देतात. म्हणून ते व्यापारी अरुंद तोंडाच्या भांड्यात खाद्यपदार्थ घालून बाहेर ठेवतात. माकड त्यात हात घालून मुठीत जे असेल ते घेते, पण हात अडकतो. मुठीत घट्ट धरून ठेवलेले सोडल्याशिवाय हात बाहेर येत नाही. आपलेही तसेच आहे. जे मिळाले व जे मिळाले नाही, त्यांना जोवर आपण घट्ट धरून बसतो तोवर आपली सुटका होत नाही. आपण अडकत जातो. जी परिस्थिती आहे ती स्वीकारत पुढे जाणे हाच योग्य मार्ग आहे. आम्ही परिस्थितीला स्वीकारत नाही हा आमचा दोष आहे, परिस्थितीचा नाही. 

सखे, म्हणूनच ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्हींच्या भानगडीत पडू नकोस. अगदीच जमत नसेल तर, अमजद इस्लाम अमजद या गझलेत म्हणतात तसे, ‘जो मिल गया उसे याद रख, जो नही मिला उसे भूल जा’ असे तरी वागून पाहा. एका शब्दात सांगायचे तर ‘सुशेगाद’ राहा!



मंगळवार, १० मे, २०२२

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता...

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता

सखे, तू उदास असलीस, खिन्न असलीस की मला त्रास होतो. का कोण जाणे, पण तू नेहमी प्रसन्न असावंस असच वाटतं. तुझ्या मनातली प्रसन्नता चेहर्‍यावर झळकते, तेव्हा त्या निर्व्याज स्मितहास्याच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ नये असं वाटतं. अपूर्णत्व मनाला खिन्नता आणतं. ही खिन्नता घालवण्याची प्रत्येकाची साधनं वेगवेगळी असतात. तुला भेटलो की मनाची मरगळ नाहीशी होते. धकाधकीचं आयुष्य सहन करण्याची ताकद मिळते. 

‘सगळ्यांची आयुष्यं अपूर्णच असतात का रे? कुणीच पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही का?’

सखे, सगळ्यांचं आयुष्य अपूर्ण असतं. आपल्या सगळ्या आकांक्षा, इच्छा पूर्ण होतातच असं नाही. ‘मागणं’ आणि ‘मिळणं’ यातलं अंतर जेवढं जास्त, तेवढं जगणं जास्त त्रासदायक. सगळ्यांना सगळं नाही मिळत. आयुष्याच्या याच अपूर्णत्वावर निदा फाजलींची ‘कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता’ ही अप्रतिम गझल आहे, ती तू ऐक. मूळ गझल त्यांच्या ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील आहे. १९८१साली आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटासाठी त्यात थोडासा बदल केला गेला. भूपेंद्र सिंग यांचा आवाज आहे आणि संगीत खय्याम यांचं. यातला एक शेर जेव्हा ऐकला तेव्हापासून आत्तापर्यंत तो विसरलो नाही. 

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता 
कहीं ज़मीं तो कहीं आसमां नही मिलता 

सखे, मुकम्मल याचा अर्थ पुरेसा किंवा पूर्ण. प्रत्येकाचं स्वत:च असं विश्व असतं. त्याच्या स्वत:च्या भावना, इच्छा, अपेक्षा असतात. कधी स्वत:कडून तर कधी इतरांच्याकडून त्या पूर्ण व्हाव्या असं त्याला वाटत असतं. पण त्या होत नाहीत. एका अपेक्षेची पूर्तता दुसर्‍या अपेक्षेला जन्म देते. म्हणूनच तृप्ती ही फार दुर्मीळ गोष्ट आहे. जसा माणूस विचाररहित असू शकत नाही, तसाच तो इच्छारहितही असू शकत नाही. इच्छा, अपेक्षा कधीच थांबत नाहीत. आपण कुठं थांबायचं, हे समजलं की अपेक्षांचं ओझं होत नाही, इच्छा त्रास देत नाहीत.

जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है
ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नही मिलता 

सखे, मूळ शेर ‘जिसे भी देखिये वो अपने आपमे ही गुम है’ या ऐवजी ‘ये क्या अज़ाब है सब अपने आप में गुम हैं’ असा आहे. ‘अज़ाब’ याचा अर्थ दु:ख किंवा शिक्षा. आपल्याला असंख्य माणसं आयुष्यात भेटतात. ज्याला बघावं तो आपल्याच विश्वात गर्क असतो. प्रत्येकजण दुसर्‍याला ऐकवत असतो. जिंकणं, हरणं, सुख, दु:ख या भोवती गुरफटलेलं स्वत:चं आयुष्य इतरांसमोर उलगडत राहतो. ऐकवणारी माणसं खूप आहेत. उणीव ऐकणार्‍या माणसांची आहे. फारशी जवळीक नसणारी माणसं आपल्याशी खूप बोलतात. दु:ख, आपल्याच माणसांना आपल्याशी बोलावसं वाटत नाही याचं आहे. ज्यांच्या सुखाने आपण सुखी होतो, ज्यांच्या दु:खात आपण दु:खी होतो, त्यांना आपल्याशी बोलायला वेळ नसतो. गुजगोष्टी करणारी असंख्य माणसं अवतीभवती सतत वावरत असतात. ज्यांच्याशी हितगुज करावं अशी माणसं आपल्यापासून लांब असतात. त्यांचं लांब असणं छळत नाही, त्यांचं हितगुज न करणं प्रचंड त्रास देतं. 

बुझा सका है भला कौन वक्त के शोले
ये ऐसी आग है जिस में धुँआ नही मिलता 

सखे, मनावर झालेल्या जखमा, त्यांना वेळ दिला की भरतात. निदान तसं आपल्याला वाटतं तरी. दु:खाला कवटाळत बसण्यापेक्षा त्याला विस्मृतीत ढकलणं जास्त सोयीचं असतं. आपण विसरू म्हटलं तरी काही गोष्टी विसरता येत नाहीत. प्रसंगाप्रमाणे त्यांची आठवण नको त्या वेळी होतेच. त्यांचं चिंतन चिंता वाढवीत जातं. मेल्यावर जाळते ती चिता आणि जिवंतपणी जाळते ती चिंता. हा अनुस्वाराचा फरक आपल्यामध्ये किती जाळ घेऊन वावरतो हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आठवणींच्या या वणव्याला ज्वाळाही नसतात आणि धूरही येत नाही.

तेरे जहाँ में ऐसा नही के प्यार न हो
जहा उम्मीद हो इसकी वहाँ नही मिलता 

सखे, हाच तो शेर जो ऐकताक्षणीच आवडला होता. वेदना नेमक्या शब्दात मांडली की, तिचं काव्य होतं, हे या शेरामुळे पटतं. ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील गझलेत हा शेर ‘तमाम शहर में ऐसा नही ख़ुलूस न हो, जहाँ उमीद हो सकी वहाँ नही मिलता’ असा आहे. ‘ख़ुलूस’ याचा अर्थ प्रामाणिकपणा, ओढ किंवा सत्य असाही होतो. पण, हा चित्रपटातील गझलेसाठी बदलून लिहिलेला शेर जास्त भावला. 

सखे, प्रेम हे निसर्गाने, परमेश्वराने जिवाला जगण्यासाठी दिलेली भेट आहे. आपण श्वास घेणं हे जसं आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे, तसंच प्रेम हे आपण जगत असल्याचं लक्षण आहे. म्हणूनच ते सर्वांठायी आहे. प्रेम नाही असं एकही स्थान निसर्गात नाही. तरीही आपल्यासाठी म्हणून आपण या अमर्याद प्रेमाला मर्यादित स्वरूपात पाहतो. एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. ते तिथूनच मिळावं अशी अपेक्षा बाळगतो. खास करून एखाद्या व्यक्तीकडून. प्रेमाच्या बाबतीत, ते मिळावं यापेक्षाही ते कुठून मिळावं या गोष्टीवर आपण ठाम राहतो. तिथून ते नाही मिळालं की आपण दु:खी होतो. 

सखे, हा विचार तुला कदाचित पटणार नाही, तरीही ऐक. प्रेम आपल्याला जिथून हवं असतं तिथून ते मिळावं यामध्ये जशी प्रेमाची सार्थकता आहे, तशीच सार्थकता ते मिळू नये यातही आहे. 

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

आनेवाला पल जानेवाला है...


सखे, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा जगण्यासाठीच असतो. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो क्षण, त्या क्षणीच जगायचा असतो. तो येण्याआधी त्याला जगणे हे दिवास्वप्न आहे आणि तो निघून गेल्यानंतर आपल्यासाठी तो स्वप्न म्हणून आठवणीत राहतो. आधी आणि नंतर फक्त वंचनाच पदरी येते. त्याला त्या क्षणी जगणारे जगून जातात. 

’प्रत्येक क्षण जगला पाहिजे, हे समजलं. पण, आधीची आणि नंतर होणारी वंचना नाही समजली.’ 

सखे, आपण एकतर भूतकाळात रमतो किंवा भविष्यकाळात. भूतकाळातील घटना कितीही रमणीय असल्या तरी त्या घडून गेलेल्या असतात. भविष्यकाळ असा चांगला असेल, तसा चांगला असेल याच्या कल्पनासुद्धा रमणीय असतात. दोन्ही ठिकाणी मन रमतं. वास्तविक ते वर्तमानकाळात रमलं पाहिजे. ज्यांचं मन केवळ वर्तमानात असतं, त्यांचा गतकाळही संस्मरणीय असतो आणि येणारा काळही. 

’हे खरं आहे की, माणूस बहुतांशी भूतकाळातल्या चांगल्या आठवणींशी आणि भविष्यातील स्वप्नांत गुंग होऊन जातो. पण, असं का घडतं? वर्तमानात फार वेळ का राहता येत नाही?’

सखे, याचं उत्तर कदाचित माझ्याकडेही नाही. मी ते शोधतोय. गेलेले क्षण आणि येणारे क्षण हे फसवे समाधान देणारे असतात. त्यांना ओढून ताणून वर्तमानाशी जोडू लागलो की, आत्मवंचनेशिवाय हाती काहीच लागत नाही. आपण गृहीत धरून चालतो, ’जे आहे ते असंच राहणार आहे’. जे आज मिळत आहे, ते कायम असंच मिळत राहणार आहे. जे आहे ते जाईल, याचा विचारही मनात भीती निर्माण करून जातो. ’जाणं’ सूचित करणारी प्रत्येक गोष्ट माणूस अप्रिय किंवा वाईट ठरवत जातो.  मग तो नाश असो, र्‍हास असो, मृत्यू असो, सवयी घालवणारा नियम असो किंवा प्राण हरण करणारा यम असो. अगदी दक्षिण दिशाही आपण अपवित्र ठरवतो. येणारा क्षण असाच राहणार आहे, तो जाणार नाही, यासारखी दुसरी फसगत नाही. आपण असो किंवा क्षण असो, जाण्यासाठीच येतो. 

सखे, बघ तुझा चेहराही बदलला. चल. तुझा मूड ठीक करण्यासाठी एक छानसं गाणं ऐकवतो. गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. संगीत पंचमदांचं आणि आवाज किशोर कुमार यांचा. ’आनेवाला पल जानेवाला है’ हे गीत तू ऐकलं असशील, तरीही पुन्हा ऐक. खूप सुंदर शब्द आहेत. खूप चांगला विचार आहे. सामान्यत: आपले विचार हे एका मर्यादेपर्यंत जाणारे असतात. त्यापलीकडे जाणं आपल्याला जमत नाही. आपलं आयुष्य म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्राप्त झालेल्या क्षणांचा संचय असतो. आयुष्यात अनेक क्षण घालवणे आपल्याला माहीत असतं, पण एका क्षणात संपूर्ण आयुष्य सामावणं आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असतं. समुद्रात अनेक थेंब आहेत याची कल्पना असते. प्रत्येक थेंबात समुद्र असतो, ही आपल्या कल्पनेपलीकडली गोष्ट असते. 

’तुझं आपलं काहीतरीच. कविकल्पना म्हणून ठीक आहे. पण, एका क्षणात कसं आयुष्य जगता येईल?’

सखे, येणारा क्षण हा शेवटचाच क्षण आहे या आर्ततेने तो क्षण जग. जे सबंध आयुष्य जिवंत राहून मिळालं नाही, ते हा एक क्षण जगण्यानं मिळून जाईल. अगदीच फिल्मी भाषेत सांगायचं तर, ’बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही.’ हे बघ. आता कशी हसलीस!  एका क्षणात सबंध आयुष्य जगता येईल, असा क्षणच आयुष्याचं सोनं करून जातो. आपल्या आयुष्याचं सोनं करून जाणारा तो क्षण नेमका त्यावेळी पकडता येत नाही, सांगता येत नाही आणि धरूनही ठेवता येत नाही. 

एकदा एका वाटसरूला एका निर्जन स्थळी एक म्हातारा दिसतो. म्हातार्‍याच्या पाठंगुळीला सोन्याच्या सळ्यांची मोळी असते. एका हातात लोखंडाचा लहानसा तुकडा घेऊन तो म्हातारा मिळेल तो दगड त्या तुकड्याला लावून पाहतो व फेकून देतो. त्याला वाकवत नसतं, चालवत नसतं. तरीही तो म्हातारा कसातरी कण्हत, कुढत पुन्हा पुन्हा दगड उचलून लोखंड्याच्या तुकड्याला लावून पाहत असतो व फेकून देत असतो. वाटसरूला मोठं आश्‍चर्य वाटतं. हा वयोवृद्ध माणूस पाठीवर सोन्याच्या सळ्यांची मोळी वागवीत, हातातल्या लोखंडाला दगड का लावतो? वाटसरू त्याला थांबवतो आणि विचारतो, ’आजोबा, तुम्ही हे काय करता आहात?’ 

’मी परीस शोधतोय’

’परीस म्हणजे तोच दगड ना जो लोखंडाला सोनं करतो तो? तुमच्या पाठीवर तर सोन्याची मोळी आहे. मग, एवढ्याशा लोखंडाच्या तुकड्याला सोनं करायच्या मागे का लागला आहात?’

म्हातारबुवा विषण्ण हसतो.

’मुला मी तरुणपणी पाठीवर लोखंडाचा भरा घेऊन बाहेर पडलो होतो. परिसाच्या शोधात. मिळेल तो दगड उचलायचो आणि पाठीवरच्या लोखंडाला लावायचो. लोखंडाचं सोनं झालं नाही हे पाहून निराशेने दगड टाकून द्यायचो. लोखंडाला दगड लावून तो टाकून द्यायची इतकी सवय झाली होती, की पाठीवरल्या लोखंडाचं सोनं कधी झालं हे कळलंच नाही.’

सखे, आपल्या वाट्याला येणारा क्षणही असाच कधीतरी आपल्या आयुष्याचं सोनं करून गेलेला असतो. त्याला धरून ठेवता येत नाही. येणारा क्षण जाणाराच असतो. मग तो दु:खाचा असो किंवा सुखाचा. येणारा प्रत्येक क्षण एक हुरहुर मात्र कायम देऊन जातो. क्षण दु:खाचे असतील तर सुखाची हुरहुर आणि क्षण सुखाचे असतील तर ते धरून ठेवता आले नाहीत, याची हुरहुर.

सखे, क्षण हे फुलपाखरासारखे असतात. आपण त्यांना चिमटीत धरायला जावं तर ते उडून जातात. जाताना आपल्या बोटांना रंग लावून जातात. निसटलेल्या फुलपाखरावर भाळायचं की बोटांना न कळत चिकटलेल्या रंगांना आपल्या अंतरंगात सांभाळायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. क्षणावर भाळणारी माणसं त्याच्यामागे पळतात. क्षण सांभाळणारी माणसं स्थिर असतात. कारण, त्यांना माहीत असतं, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा जगण्यासाठीच असतो.