सुरेश भट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुरेश भट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

सजण दारी उभा...

‘बर्वे, तुम्हाला मी सांगितलं होतं मला कवितेचं इंटरप्रिटेशन तुमच्याकडून ऐकायला आवडतं. तुम्ही मला ते ऐकवणारही होतात. कुठल्या जन्मी?’

सखे, असा एकदम हल्ला नकोस ना चढवू. मान्य आहे मी आळशी आहे, सुख म्हणजे झोप, असं माझं साधं सोपं गणित आहे. त्यामुळे अनेक गोष्टी राहून जातात. माझं तुला ऐकवणं होत नाही आणि तू मला लेख देत नाहीस. 

‘मी लिहित नाही म्हटलंय का? पण, मला सुचतच नाही.’

लिहित राहा म्हणजे सुचत जाईल. तुझ्याकडे लिहिण्याचं सामर्थ्य आहे म्हणून तुझ्यामागे लागतो. एवढा त्या परमेश्‍वराच्या मागे लागलो असतो, तर एव्हाना तोच होऊन गेलो असतो. तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणून नको लिहूस. ते सांगणं आवश्यक आहे म्हणून लिही. जाऊ दे! मी सांगायचं आणि तू अजिबात कानामनावर घ्यायचं नाही हे नेहमीचंच झालं आहे. 

‘रागावू नका हो. मी लिहीन. पंधरवड्यातून एक लेख तरी लिहून देत जाईन.’

देवच पावला म्हणायचा! बाकी देव पावला आणि खरोखरंच समोर येऊन उभा राहिला तर काय अवस्था होईल, हे आपल्या विचार करण्यापलीकडलं आहे. संत आणि कवी यांना हे नेमकं जमतं. वास्तवतेच्या निखार्‍यात धगधगणारं समाजमन आणि प्रियकर प्रेयसीचं कोवळं शृंगारिक मन ज्या एकाच लेखणीतून तितक्याच नेमकेपणानं उतरतं, ती समर्थ लेखणी सुरेश भटांची. त्यांचीच ‘सजण दारी उभा’ कविता तू ऐक. हे गाणं भारती आचरेकर, आर्या आंबेकर आणि सलिल कुलकर्णींच्या आवाजात ऐकलं आहे. ‘भटां’च्या काव्याला प्रत्यक्ष ‘देवां’नी संगीत दिलं आहे, पण ते ऐकण्याचं भाग्य नाही मिळालं. ज्या कवितेने अनेकांना वेड लावलं आहे ते एकदा नव्हे अनेकदा ऐक.

‘अनेकदा का? एकदा वाचल्यावर अर्थ समजतोच की’

नाही सखे! एकच कविता आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर वाचावी. प्रत्येकवेळी तिचा कोणतातरी नवीन पैलू समोर येतो. आपण वाचताना शब्द वाचतो, अनुभवास आलेला अर्थ त्याच्याशी जोडतो. नवा अनुभव कवितेचा वेगळा अर्थ सांगून जातो. म्हणून कविता अनेकदा वाचावी. आता हीच कविता घे! काय वाटतं तुला वाचल्यानंतर?

‘हे काय! साधा सरळ अर्थ आहे. प्रेयसी प्रियकराची वाट पाहत होती. वाट पाहण्यातच तिचं सगळं काम राहून गेलं. मग, तो अचानक आला. तिला काय करावं तेच सुचेना. या सगळ्यात होणारी तिच्या मनाची घालमेल भटांनी टिपली आहे. तीही अप्रतिम!’

सखे, हा एक अर्थ आहे. तो नाही अशातला भाग नाही. त्याही पलीकडे एक खोल अर्थ त्यात दडला आहे. तो थोडासा आध्यात्मिक आहे. 

‘उगाच काहीतरी! तुम्हांला आध्यात्म आवडतं आणि त्याहीपुढे जाऊन आलेल्या गेलेल्याला ते ऐकवण्याचीही खाज आहे म्हणून तुम्ही त्याच्यातून तसे अर्थ काढता. प्रियकर अचानक दारात उभा राहिल्यावर प्रेयसीचा उडणारा गडबडगोंधळ एवढाच काय तो भटांना सांगायचा आहे. बाकी काही नाही.’

सखे, ओढून ताणून अर्थ लावणे आणि अन्वयार्थ काढणे यात फरक आहे. एखादा शब्द तसाच आणि तिथेच का योजला आहे, यावर कवितेचा नेमका अर्थ ठरतो. प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन म्हणूनच वेगळं असतं. कविला तेच सांगायचं आहे, असा दावा करण्यात अर्थ नसतो. ‘सांगणार्‍याला काय वाटतं?’ ते त्याला त्याच्या पद्धतीने सांगायचं असतं. ते बरोबर की, चूक हे ऐकणार्‍याने ठरवावं. जाऊ दे! 

सखे, ‘दुबळी कुडी’, ‘प्राणपूजा’ या कवितेत आलेल्या शब्दांचा विचार कर. शेवटचं कडवं तर माझं सगळ्यांत आवडतं कडवं. त्यामागची भावना प्रेमापलीकडलं काहीतरी सांगते. 

‘हं...! तुम्हीच सांगा!!’

सखे, शब्द, स्वर यातून अर्थ पोहोचला पाहिजे. त्याहीपलीकडे जाऊन भावना पोहोचली पाहिजे. आता बघ! प्रियकर अचानक आल्यामुळे प्रेयसीला प्रश्‍न पडलाय घर कधी आवरू आणि स्वत:ला कधी सावरू. आवरावं तेव्हा लागतं जेव्हा पसारा झालेला असतो आणि सावरावं तेव्हा लागतं जेव्हा तोल गेलेला असतो. जशी ही अवस्था प्रेयसीची होते, तशीच ती जिवाचीही होते. शरीर हे जिवाला राहायला मिळालेलं तात्पुरतं घर आहे. हे घर सोडायच्या वेळेला जिवाला शिव करण्यासाठी शिव (तत्त्व) येतो. पण, जीव मृत्यूचा उंबरठा ओलांडून पुन्हा दुसर्‍या घरात जाणं पसंत करतो. शिव होत नाही. शिव होण्यासाठी लागणारी तयारी केलेलीच नसते. काम क्रोधाने शरीरात केलेला पसारा आवरायला आणि ‘वेळ थोडा राहिलाय’ या धक्क्यातून सावरायला वेळ मिळत नाही. 

सखे, प्रेयसी स्वत:ला आपण कशी दिसायला हवी असा विचार करते तेव्हा आरशात ‘पाहते’. त्याला मी कशी दिसायला हवी, तशी होण्यासाठी ती स्वत:ला ‘निरखून पाहते’. परमेश्‍वराला हवं तसं आपण कधी वागतो? आपण आपल्याला हवं तसंच वागतो. प्रियकर जिला स्वत:ला भेटायला आलाय ती शृंगार करताना स्वत:ला दुबळी का म्हणेल? तिथेही शब्द ‘देह’ असा नाही, ‘कुडी’ असा आहे. समर्पणाचा भाव असल्याशिवाय दुबळेपणाची जाणीव होत नाही. मला मी कशी दिसायला हवी यापेक्षाही त्याला मी कशी दिसायला हवी, त्याप्रमाणे तिला सजायचं आहे. 

सखे, साज, शृंगार करण्यासाठी तरी तिच्याकडे अलंकार कुठे आहेत? तिनं प्रचंड सोसलं आहे. पदरी खूप आसवं आहेत. तीच माळायचं ती ठरवते. पण, माळताना त्यातली थोडीच माळते. अजून खूप आसवं शिल्लक आहेत. जी काही माळली आहेत ती त्याच्याच विरहात गाळलेली आहेत. आपल्याला झालेलं दु:ख, आपण होता होईल तेवढं मोठं करून दाखवत असतो. दु:खाने दु:खी होण्याएवढं सुख, सुखाने सुखी होण्यातही नसतं. त्यासाठी नसलेली आसवेही आपण खूप गाळत असतो. प्रेयसीला दु:खाचं प्रदर्शन नाही घडवायचं, फक्त जाणीव करून द्यायची आहे. म्हणून प्रेयसी प्रियकराच्या विरहात झालेलं दु:खही, त्याला दु:ख होऊ नये म्हणून लपवते. आसवेही ती ‘माळते’, गाळत नाही. 

सखे, शब्द अर्थप्रवाही असतात. म्हणूनच ते कसेही वापरता येत नाहीत. ते जपून वापरावे लागतात. आपण जेव्हा पूजा ही कृती सांगतो तेव्हा ‘घातली’, ‘केली’, ‘उरकली’ असे शब्द वापरतो. इथे भटसाहेबांनी वापरलेला शब्द आहे ‘बांधली’. तीसुद्धा ‘प्राणपूजा’! आपल्यासाठी परमेश्‍वराची पूजा झाली की, ती घातली, केली किंवा उरकली जाते. परमेश्‍वरासाठी परमेश्‍वराची पूजा ही कायम ‘बांधली’ जाते. हे कसं तरी करणं नाही. हे सृजन आहे, ही निर्मिती आहे. 

सखे, शेवटच्या कडव्यातला ‘पुन्हा’ हा शब्द उच्चारताना, ‘दारावर आधी थाप वाजली होती’ हे स्वरातून सांगणे हे गायकाचं कसब. दारावर वाजलेली थाप ही जन्मजन्मांतरी ऐकलेली आहे, हे प्रेयसीच्याबाबतीत कितीही काव्यात्म असलं तरी जीवाच्याबाबतीत ते सत्य आहे. ही ओळख पटण्याचा तो क्षण इतका अचूक टिपला आहे की, शब्दच थांबतात. आपलंच हृदय आपणच कसं हृदयी धरायचं, हा प्रेयसीला पडलेला प्रश्‍न खरं तर जिवाला पडलेला प्रश्‍न आहे. आपणच ब्रह्म आहोत याची जिवाला ‘जीव’ जाताना झालेली जाणीव आणि तरीही ‘आपण जीव आहोत’ असं वाटणं ही संभ्रमावस्थाच विचित्र. ती तडफड, ती तगमग यात भटांनी नेमकी सांगितली आहे. अद्वैताचा अनुभव आल्यानंतरही जाणिवेने द्वैत स्वीकारणार्‍या ज्ञानेश्‍वरांच्या विरहिणीची ही व्यथा आहे. आपण एकच आहोत, तर मग तो न्यायला का आलाय आणि मी त्याची वाट का पाहते? हे वेगळेपण का आहे? आपण एकच आहोत तर त्याला कसं पाहू? असे असंख्य गोंधळात टाकणारे प्रश्‍न प्रेयसीला पडतात. 

सखे, आपण ब्रह्म आहोत ही जाणीव झाल्यानंतरही जिवाला मिळालेलं तात्पुरतं घर सोडवत नाही. त्यात तो गुंतलेला असतो. त्याचा मोह सुटत नाही. कितीही मोह असला, तरी ते नष्ट होणारं असतं, म्हणून त्याचा त्याग करावाच लागतो. पण, जीव दुसरं घर निवडतो.  तेही नष्ट होणारंच असतं. ते घर सोडताना पुन्हा शिव दारावर थाप मारतो. थाप ओळखीची असते, जन्मजन्मांतरी ऐकलेली असते. तरीही दार उघडताना पुन्हा तोच गोंधळ, तीच संभ्रमावस्था. जीव शिव किंवा ब्रह्म होईपर्यंत हे चक्र सुरूच राहतं. ‘मी आहे’ या स्वत:च्या अस्तित्वाच्या जाणिवेने सुरू झालेला प्रवास, ‘मी ब्रह्म आहे’ या जाणिवेनंतर, ‘ब्रह्मच आहे’ या शुद्ध जाणिवेत संपतो. या प्रवासातील स्थित्यंतरात होणारी घालमेल, तगमग, तडफड जशी जिवाची होत असते तशीच प्रेयसीचीही होत असते. हा समान धागा पकडून संतांनी आणि कवींनी अध्यात्म सोपं करून आपल्याला कळेल अशा भाषेत मधुराभक्तीच्या माध्यमातून पोहोचवलं आहे. जे ज्ञानमार्गाने समजतं तेच भक्तिमार्गानेही समजतं. मार्ग वेगवेगळे असले, तरीही गंतव्य एकच!

‘हे लिहिताना असा, एवढा विचार भटसाहेबांनी केला असेल?’

सखे, एखादी गोष्ट प्रत्यक्षात येते तो क्षणच आपल्या ओळखीचा असतो. त्याआधी त्यामागे त्याच्या निर्मितीची सुरू असलेली अखंड प्रक्रिया आपल्यासाठी अज्ञातच राहते. कवितेची रचना होतेवेळी एवढा सगळा विचार कवी करतो आणि मग काव्य रचतो, असं आपण समजतो ते याचमुळे. कवीच्या बाबतीत, विचारांच्या निरंतर प्रक्रियेचं प्रकटीकरण एके क्षणी होण्याला काव्य म्हटलं जातं. आपल्याला हे कसं सुचलं याचं आश्‍चर्य कवीला वाटत असतं आणि ते नेमकेपणानं सांगता येत नाही. एकाच कवितेचे अनेक पैलू आपल्याही कालांतराने प्रत्ययाला येतात. म्हणूनच सखे, खूप ऐक, खूप वाच आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सातत्याने लिही! 

‘लिहिते बर्वे! खरंच लिहिते!!’