प्रणय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रणय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

पहाटे पहाटे मला जाग आली...

ज्या स्त्रिया नवरा आपलं ऐकत नाही अशी तक्रार करतात त्यांनी नवर्‍याला मुठीत ठेवणं आधी बंद करावं. नवरा मुठीत कितीसा मावेल? त्याऐवजी मिठीत संपूर्णच मावेल ना! आपल्या माणसावर अधिकार गाजवणं त्याला दूर लोटतं आणि प्रेम गाजवणं जास्त जवळ आणतं. तस्मात, नवरा मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवावा.  https://aiksakhe.blogspot.com/2021/09/blog-post.html



सखे, पहाटे पहाटे आपल्याला जाग कशी यावी, हे आपल्या हातात नसतं. काल भल्या पहाटे सात वाजता बायकोने गदागदा हलवून जागं केलं. मी डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती काहीतरी बोलत होती. तारस्वरामुळे शब्दही कानी पडत होते. पण, अर्थ कळत नव्हता, संगती लागत नव्हती.

’अहो, उठा. आंघोळी करून घ्या पटापट. पाणी आठ वाजता जाणार आहे. टाकीला पाणी चढत नाही. नळाला येतं तेवढ्यातच सगळी कामं उरकून घ्या. अहो, चला उठा पटापट.‘

तिच्या तोंडाचा पट्टा पटापटा सुरूच होता. अर्ध ऐकू जात होतं, ऐकू गेलेल्यातलं अर्धच समजत होतं, अशा "अलौकिक" अवस्थेत मी होतो. त्यामुळे साहजिकच मी फक्त कूस बदलली आणि पुन्हा झोपी गेलो. स्वयंपाकघरात गेलेली बायको पुन्हा कानाकडे येऊन ओरडू लागली. 

’अहो झोपताय काय कुंभकर्णासारखे! आधीच पाण्याचा दुष्काळ. त्यात तुम्ही घसाघसा पाणी ओतून संपवता. पाणी वाचवण्याचं तुमच्या मनातही कधी येत नाही. मीच मेलीनं एकटीनं काय काय म्हणून सांभाळायचं, कुठं कुठं लक्ष द्यायचं? संसाराचं तुम्हांला काही पडलं .................... ‘

स्वयंपाकघरातून विळीवर नारळ खवण्याचा तालावर संसाराचं खवट गाणं सुरू झालं आणि माझ्या डोक्याचा नारळ व झोपेचं खोबरं करून गेलं. मी उठून बसलो. पाणी वाचवण्याचं मनात येत नाही असं सांगताना, पाणी आणि वेळ वाचावा या सद्हेतूने कित्येकवेळा आम्ही दोघांनी एकत्र केलेल्या आंघोळी मात्र हिला आठवल्या नाहीत. मला मात्र या आठवणी बसल्या बसल्या न्हाववून गेल्या. त्या सुखद आठवणीत मी पुन्हा झोपी गेलो, बायको पुन्हा कडाडली. तेव्हापासून आमच्या घरात अबोली फुलली आहेत.

सखे, माणसाला पहाटे अशी जाग यावी की दिवस चांगला जावा. दिवस रमणीय होण्यासाठी रात्रही रमणीयच असावी लागते. पहाट होऊच नये असे वाटायला लावणारी रात्र, नंतर येणारा दिवस सोनेरी करून जाते. तुझ्यासोबत जागवलेल्या अनेक रात्रींमुळे माझे अनेक दिवस सोनेरी झाले आहेत. अगं लाजतेस काय अशी? खरंच तर आहे. सुरेश भटांनी ’पहाटे पहाटे मला जाग आली’ हे गीत माझ्यासाठीच लिहिलं आहे असं मला कायम वाटतं. आपलाच अनुभव, आपलीच भावना गीतातून कवीने मांडली आहे, एवढेच नव्हे तर हे गीत माझ्यासाठीच लिहिले आहे, असे प्रत्येकाला वाटणे हे कवीचे सामर्थ्य असते. सुरेश भटांकडे हे सामर्थ्य अतोनात आहे आणि हे सामर्थ्य नेमकेपणाने वापरण्याचं कौशल्यही. अशी भावलेली गाणी प्रत्येक सहृदय माणूस आपल्या पद्धतीने गातो. तालात, सुरात आपण ते गात नाही याची जाणीव असतानाही गातो. आपणच ते गायलं आहे असं प्रत्येकाला वाटायला लावणं हे गायकाचं सामर्थ्य आहे. हे गीत तू ऐक. आपण जागवलेली प्रत्येक रात्र, प्रत्येक पहाट तुला झोपू देणार नाही.

सखे, येऊच नये असे वाटणारी पहाट तुझ्या मिठीतून दूर होण्याने येते. जागं करून जाते. गच्च असली तरी ती रेशमाची असते. करकचून आवळणं एरव्ही त्रासदायक असतं. पण, तुझी मिठी सुटल्यानंतर त्रासदायक होते. बेधुंद प्रणयानंतर आलेली झोप मिठीची मिठास वाढवते. निद्रा आणि जागृती यांची परमोच्च स्थिती व अनुभूती एकच असते. तुझ्या मिठीतली गाढ निद्रा ही माझ्यासाठी जागृतीची अलौकिक परमोच्च अवस्थाच असते. तू मिठी सैल केल्यानंतर मी लौकिकार्थाने जागा होतो. मिठी सैल झाल्यामुळे अग्रेही विलग होतात. दूर झाल्याने त्यांचं न ’टोचणं’ दुखतं. एरव्ही छातीवर रुतलेली असताना ही अग्रे टोकाचे सुख देऊन जातात. तू रागावलीस ना, की माझ्या ओठावर ’नच सुंदरी करू कोपा’ हे नाट्यगीत सहज येतं. तुला राग आणणार्‍या माझ्यासारख्या महतपाप्याला, तू काय दंड  द्यावास, हे दुसर्‍या कडव्यातल्या ’टोचुनी दुखवी मजला‘च्या आधीच्या ओळीत कृष्णानेच सांगितले आहे. असा दंड, अशी शिक्षा आजन्म भोगायला मिळण्यासारखं भाग्य दुसरं नाही.

ज्या स्त्रिया नवरा आपलं ऐकत नाही अशी तक्रार करतात त्यांनी नवर्‍याला मुठीत ठेवणं आधी बंद करावं. नवरा मुठीत कितीसा मावेल? त्याऐवजी मिठीत संपूर्णच मावेल ना! आपल्या माणसावर अधिकार गाजवणं त्याला दूर लोटतं आणि प्रेम गाजवणं जास्त जवळ आणतं. तस्मात, नवरा मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवावा.

सखे, इतर कुठलीही तात्पुरती धुंदी माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. प्रणयातली बेधुंदी माणसाला खर्‍या अर्थाने धुंदी म्हणजे काय असते हे समजावते. अख्खी रात्र कशी गेली हे आम्हांला दोघांनाही कधीच आठवलं नाही. आठवायचा प्रयत्न केला तरीही अंगावरील शहारे आणखीनच फुलून यायचे. अनावृत देहावरील शहारे म्हणजे शरीरविणा झंकारल्यानंतर जुळलेले सूर असतात. हे सूर जुळवण्यासाठी माझी बोटे फिरायची तेव्हा तुझा गुलाबी चेहरा आणि गाल, आणखीनच गुलाबी व्हायचे. मदनालाही जाळून टाकेल इतका तुझा देह तप्त व्हायचा. नको नको म्हणत तू आणखीनच जवळ ओढायचीस. उत्कट आर्ततेचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर, मन शांत व्हायचं, देह तप्तच असायचे. ती ग्लानी, ती क्लांतअवस्था आणखीनच तप्त व्हायची. यावर कुठेतरी वाचलेला शेर आठवला,

रतिक्लांत सखी माझ्यावर झोपली
वाटले जसे आग आगीवर झोपली

नेमकी हीच अवस्था असल्याने रात्र कधी सुरू झाली आणि कधी संपली हे पहाटेपर्यंत समजतच नसे. पहाट झाली तरी नभाला लाली काही चढत नसे.

सखे, तू उगाच घाई करतेस. किती कामं पडली आहेत, चहा करायचा आहे, आंघोळ, नाश्ता, ऑफिसला जायची तयारी, किती हे उठण्याचे बहाणे करशील. माझ्यासाठी हे महत्त्वाचे नाही. कामाचं रहाटगाडगं नेहमीचंच आहे. हे रेंगाळलेले क्षण आणखी लांबवण्यात जे सुख आहे, ते अलमदुनियेत कशातही नाही. तुला हा उल्लूपणा वाटेल. पण, तो तसा नाही. प्रणय म्हणजे दोन देहांची लगट आणि मल्लयुद्ध नाही. हा चैतन्याचा महोत्सव आहे. हे सुख दिल्याने मिळतं. हे सुख जितकं जास्त घेण्याचा प्रयत्न कराल, तितकं ते कमीच मिळेल. ओरबाडून तर ते मिळतच नाही. स्वत:च्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रणय हासुद्धा बलात्कारच असतो. त्यातून सुख मिळतच नाही. प्राप्त होतो ’मी घेतलं‘ हा अहंकार आणि ’ती माझी आहे’ हा अधिकार सिद्ध करण्याचा अट्टहास. 

सखे, प्रणयात देह हे साधन आहे, साध्य नाही. देहाने मिळवायचे आहे, देह मिळवायचा नाही. जे मिळवायचं आहे त्याला चैतन्य म्हणतात. समजा, आपण फोंड्याला आहोत आणि आपल्याला पणजीला जायचं आहे. फोंड्यातून वाहनाने आपण पणजीपर्यंत येतो. आपण वाहनातून उतरलोच नाही, तर पणजीत पोहोचूनही पोहोचत नाही. नेमकं तेच प्रणयाच्याबाबतीत होतं. देहातून चैतन्याकडे घेऊन जाणारा प्रवास म्हणजे प्रणय. म्हणूनच, कुठं जायचं हे माहीत नसलं की होते ती फक्त फरपट.  

सखे, या चैतन्याच्या महोत्सवात असंच भिजत राहूया. तुला शपथ आहे तुझ्या देहावरील मोजलेल्या तिळांची, तुला शपथ आहे त्या वेचल्या तारकांची, आमच्या समवेत प्रणयधुंद अवस्थेत जागणार्‍या शेजेवरील फुलांची. तू नाही म्हणू नकोस. या पहाटेला मिठी सोडवून घेऊ नकोस. या विवस्त्र देहावर पांघरूणही घेऊ नकोस. पांघरायचेच असेल तर मला लपेटून घे. प्रत्येक पहाट अशीच यावी. पहाटे पहाटे आपल्याला अशीच जाग यावी.


(चित्र सौजन्य इंटरनेट..)