ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

ती असं का वागली?

स्त्री, पुरुषाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जवळ येऊ देते. अनेकदा तिच्या स्वैर वागण्यातून पुरुष भलतेच अर्थ काढून मोकळा होतो. वास्तविक वर्तुळबाह्य पुरुषाशी स्त्रीचं लाघवी बोलणं, मधाळ हसणं हे सोयीपुरतं, गरजेपुरतं असतं. ती गरज संपली की, स्त्री वर्तुळबाह्य पुरुषाला लगेच ’जागा’ दाखवून देते.



’ती असं का वागली?’

हा त्याचा प्रश्‍न माझ्या मनात बरेच दिवस घोळत होता. त्रास देत होता. सखे, दु:ख त्रासदायक असतं. पण, त्या दु:खाचं कारण न समजणं त्याहूनही जास्त त्रासदायक असतं. झालं असं की माझ्या मित्राने त्याच्या मैत्रिणीचं एक काम करून दिलं. तिनच त्याला ते सांगितलं होतं. त्या कामासंदर्भातच त्यानं तिला बोलावलं. पण ती आली नाही. सवड नसेल, असं म्हणून तो गप्प बसला. परंतु, असं चार पाच वेळा घडलं, तेव्हा त्याला त्याचं दु:ख झालं. यथावकाश त्या कामातल्या अडचणी दूर सारून त्यानं कामही करून दिलं. त्याने परहस्ते ते काम पाठवूनही दिलं. तिने मेसेज पाठवून त्याचे धन्यवाद मानले. केलेल्या कामाचे पैसेही देण्याबद्दल सांगितलं. काम करणे, कामाबद्दलच्या पैशांची देवाणघेवाण हा व्यवहार होता. त्याला दु:ख झालं ते तिच्या न येण्याचं. त्यानं मला त्या दु:खावर शेरही ऐकवला;

हो गया हिसाब पाई पाई का बाकी न आना रह गया

न रही उम्मीदें जिंदगीसे बस तेरा न आना रह गया

त्यानं ’आना‘ हा एकच शब्द ’आणे‘ आणि ’येणे’ या अर्थाने वापरणं मला आवडलं. त्यामागचं दु:ख जाणवलं. ’ती असं का वागली?’ हा त्याचा प्रश्‍न खूप त्रास देऊन गेला. आपल्याला माहीत असलेलं दु:खाचं कारण इतरांच्या अनुभवास आलेलं असलं तरीही त्रास देऊन जातं. 

सखे, तू सुद्धा अशी जेव्हा रुसून जातेस तेव्हा मला त्रास होतो. कधी कधी येतेस बोलावल्यावर. पण, इतक्या लवकर निघून जातेस, की असं वाटतं न आली असतीस तरी चाललं असतं. तुझं येऊन लवकर निघून जाणं, तुझ्या न येण्यापेक्षाही जास्त त्रास देतं. बघ, आला ना राग? खरं सांगितलं की माणसाला राग येतो. लटकं सांगितलं की लगेच पटतं. तुझा राग घालवण्यासाठी एक गझल ऐकवतो. ’ले चला जान मेरी’ ही गझल लाइव्ह ऐकण्यात खूप मजा आहे. यातल्या अनेक जागा  

गुलाम अली अशा काही खुलवतात की दु:खही सुख देऊन जातं. हीच गझल मी अबिदा परवीन यांच्या आवाजातही ऐकली आहे. पण, ती ध्वनिमुद्रित होती. 

सखे, किती रागावशील? ही गझल ऐक. फणकार्‍याने मान वळवल्यानंतर तुझ्या बटा वार्‍यावर अधिकच उडू लागतात. त्या इतक्या अस्वस्थ का आहेत? डोळे न वळवताही डोळ्यांच्या कोपर्‍यातून नको ना पाहूस. बहुतेक, तू हृदय तोडलेल्या कुठल्यातरी प्रियकराच्या आठवणीने त्या बटा व्याकूळ झाल्या असाव्यात. कित्ती हा राग? तू रागावून पाहिलंस आणि डोळ्यासमोर वीज चमकली बघ माझ्या. अगं गंमत केली तुझी. तुझ्या केसांच्या बटा प्रियकराच्या आठवणीने नाहीत तर वार्‍यामुळे अस्वस्थ आहेत, हे मला पक्कं माहीत आहे. सोड ना हा रुसवा हे रागावणं. 

सखे, मला माहिती आहे तुला उत्सुकता त्या मित्राची ती मैत्रीण असं का वागली, हे जाणून घेण्याची. कारणं अनेक असू शकतात. देता येण्यासारखी आणि देता न येण्यासारखीही. तू नाही का, यायचं तुझ्या मनात असलं की केव्हाही, कधीही बिनधास्त येतेस. नसेल यायचं, तर मग हजारो कारणं. पटणारी, न पटणारी. ती का आली नाही, हे तिचं तिलाच ठाऊक. 

सखे, माणसाला माणसं हवी असतात. बरेचदा ती काही कारणपरत्वे असतात. एखादी गरज, एखादे कार्य होईपुरतीच त्यांची आवश्यकता असते. त्यापेक्षा अधिक ती नको असतात. प्रत्येक माणूस स्वत:भोवती अनेक वर्तुळं आखून घेत असतो. अगदी आतल्या वर्तुळात तो स्वत:लाच ठेवत असतो. इतर कुणीही त्याला नकोसं असतं. यालाच साहेबाच्या भाषेत ’प्रायव्हेट स्पेस’ म्हणतात. यानंतरच्या वर्तुळात अगदी जवळची नाती आईवडील, नवराबायको, मुलं येतात. त्यानंतरच्या वर्तुळात मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, सगे सोयरे असतात. त्याही बाहेरील वर्तुळात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असणारे सहयोगी असतात. अशी असंख्य वर्तुळे बदलत्या प्राधान्यक्रमाने असतात. ही वर्तुळे अंतर ठेवण्यासाठी, दाखवून देण्यासाठी असतात. 

सखे, मला आवडलेली गाणी अनेकांना मेल करण्याची सवय आहे. काही माणसं प्रतिसाद देतात. आपल्याला आवडलेल्या जागा, त्या गाण्याबद्दलचे अनुभवही शेअर करतात. सुरुवातीला प्रतिसाद आला नाही की, मला प्रचंड त्रास व्हायचा. एरव्ही इतरांशी प्रचंड बोलकी असणारी माणसं आपल्याशी दुर्मुखलेली का वागतात? असा प्रश्‍न पडायचा. आपल्याबद्दल त्यांच्या मनात काही गैरसमज तर नाही ना, हा विचार छळून जायचा. मी गाणी पाठवण्यामागे त्यांनी भलताच हेतू चिकटवला नसेल ना, असही वाटायचं. मित्राला सांगितलेल्या विनोदावर तो पोटशूळ असल्यासारखा चेहरा करायचा. तोच विनोद त्याला दुसर्‍या कुणी ऐकवला की, पोट धरून हसायचा. विनोद वाईट नसतो, सांगणाराही चुकीचा नसतो. फक्त तो हव्या असलेल्या वर्तुळातला नसतो. चौकोनी कुटुंबात ही आखलेली वर्तुळे स्पष्ट दिसतात. त्यावर उभारलेल्या अदृश्य परंतु अभेद्य भिंती प्रचंड छळतात. नवरा बायकोमध्येही ही वैयक्तिक वर्तुळे असतात. त्या जागेमध्ये नवर्‍यानं किंवा बायकोनं किती आत शिरायचं याचे वज्रलेपित ठोकताळे असतात. आपल्या माणसाला जपण्याऐवजी ही ‘प्रायव्हेट स्पेस’ जपली जाते. 

सखे, स्त्री, पुरुषाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जवळ येऊ देते. अनेकदा तिच्या स्वैर वागण्यातून पुरुष भलतेच अर्थ काढून मोकळा होतो. वास्तविक वर्तुळबाह्य पुरुषाशी स्त्रीचं लाघवी बोलणं, मधाळ हसणं हे सोयीपुरतं, गरजेपुरतं असतं. ती गरज संपली की, स्त्री वर्तुळबाह्य पुरुषाला लगेच ’जागा’ दाखवून देते. 

'प्रत्येक खेपेला स्त्रीच्या असं वर्तुळं आखून वागण्यामागे गरज किंवा स्वार्थच असतो, असं तुला म्हणायचं आहे का?'

सखे, तू अशी लगेच पर्सनली घेऊन भांडू नकोस ना. तिला तिच्या सुरक्षिततेसाठी तसं वागणं अपरिहार्य असतं, हे मान्यच आहे. त्याबद्दल वादच नाही. पण, जशी प्रत्येक स्त्री स्वार्थी नसते, त्याप्रमाणेच प्रत्येक पुरुष ’त्याच’ अर्थाने स्त्रीकडे पाहतो, असा पूर्वग्रह बाळगणेही चुकीचेच नाही का? त्याचा त्रास संवेदनशील माणसाला होतो. 

'म्हणजे तू असं म्हणतोस की, स्त्रीने वर्तुळे आखणे ही स्त्रीचीच चूक आहे? समजा तिने अशी वर्तुळे आखलीच नाहीत तर त्याचा गैरफायदा पुरुष घेणारच नाही याची काय गॅरंटी? तू एक पुरुष आहेस, म्हणून तुझा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तसाच आहे. एकदा स्त्रीच्या दृष्टिकोनातून स्त्रीकडे पाहा. म्हणजे मग कळेल.'

अरे देवा! तुझा माझ्याशी भांडायचा मूड आहे का? सखे, तू म्हणतेस तसेही असेल कदाचित. मी पुरुष असल्याने स्त्रीच्या भावना मला कळत नसाव्यात. मी जे म्हणतोय त्याचं तू सार्वत्रिकरण नको करूस. सगळ्याच स्त्रिया व सगळेच पुरुष तसेच असतात असे म्हणणे योग्य नाही. सर्वस्व बहाल करून बसलेल्या स्त्रीला जसा प्रतारणेचा त्रास होतो, त्याहीपेक्षा जास्त त्रास, स्त्रीने ही वर्तुळे आखून वापर करून घेतल्यामुळे एखाद्या पुरुषाला होतो. 

सखे, या वर्तुळांचा त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण त्या व्यक्तीमध्ये भावनेने गुंतलेले असतो. निखळ मैत्री हवी  असलेली माझ्यासारखी माणसं, या वर्तुळांकित वागण्याने प्रचंड दुखावली जातात. आपुलकीच्या आडून साधला जाणारा स्वार्थ छळतो. आपला वापर झालाय ही भावना बोचते. सेवा पुरवणे, विक्री करणे हा ज्यांच्या व्यापाराचा भाग असतो, त्यांना या आपुलकीशी काही देणंघेणं नसतं.  समोरच्याने कितीही सलगी, आपुलकी दाखवली तरीही आपला फायदा व्यापारी सोडत नाही. आखलेली वर्तुळं स्वत:च्या स्वार्थासाठी  भेदून पुढे होणारी माणसं, दुसरा माणूस त्या वर्तुळात येऊ लागला की जागी होऊन त्याला ’जागा’ दाखवतात. अशा ’वापरून’ घेणार्‍या माणसांपेक्षा ’व्यापारी’ खूप चांगला. 

सखे, मित्राला त्रास झाला कारण त्यानं निखळ मैत्रीची अपेक्षा ठेवली. तिच्या येण्याची अपेक्षा ठेवली. त्याला बोचणी आहे, ती तिच्या न  येण्यापेक्षाही, तिने न येऊन दाखवून दिलेल्या, तिच्या आयुष्यातल्या  त्याच्या स्थानाबद्दलची आहे. ज्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात खूप स्थान देतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्यासाठी जागाच नसल्याचं ते दु:ख आहे.  आपल्या भावना अव्यक्त, निरपेक्ष ठेवाव्या. त्या व्यक्त केल्या किंवा समोरच्या व्यक्तीकडून भावना समजण्याच्या अपेक्षा ठेवल्या की, एक प्रश्‍न आपल्याला कायम छळतो;

’ती असं का वागली?’

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

ती रात्र कुसुंबी बहराची...
























सखे, एक विचार ऐकवतो.

मरणानंतरच्या यात्रेकडे नेतो तो यम आणि जिवंतपणी मरणयातना देतो तो संयम. 

वास्तविक पाहता संयम हा माणसामधला चांगला गुण आहे. पण सभोवतालची परिस्थितीच अशी विचित्र आहे की, माणसातले दुर्गुण त्याला पोषक ठरतात आणि सद्गुण मारक. या सगळ्याचा सर्वाधिक त्रास आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहणार्‍यांना होतो. गेलेले क्षण पुन्हा आणता येत नाहीत, आपण त्यावेळी तसे का वागलो हे ठरवता येत नाही. मागे वळून पाहताना, हे न ठरवता येणंच आयुष्यातले चांगले क्षण विस्कटून टाकतात. खूप कष्ट घेऊन काढलेली एखादी देखणी रांगोळी लहान मुलाने सहजपणे विस्कटून टाकावी ना, अगदी तसे.

विस्कटलेल्या रांगोळीतला प्रत्येक कण आपला रंग बाळगून असतो. तेच कण घेऊन त्याहीपेक्षा सुंदर रांगोळी पुन्हा रेखाटता येते. आयुष्याची राखरांगोळी करणारे क्षण कितीही मोहक असले तरी ते क्षण घेऊन विस्कटलेलं आयुष्य पुन्हा  रेखाटता येत नाही. 

सखे, जे घडून गेलं आहे त्या वृत्ताकडे निवृत्त मनाने पहावं. पण, हे फार कर्मकठीण असतं. आपलं मन त्यात गुंतलेलं असतं. आयुष्यातले चांगले क्षण सुखावून जातात आणि दु:खाचे क्षण दु:ख देऊन जातात. क्षण धरून ठेवता येत नाहीत. त्यातली क्षणभंगुरता कायम त्रास देत राहतेच. या न विसरता येण्यार्‍या क्षणांना आपल्या काव्यामध्ये नेमकेपणाने टिपणे  पाडगावकरांना छान जमते. आयुष्यातले जीवघेणे क्षण पाडगावकर अशा रितीने मांडतात की, ते क्षण पुन्हा जगणं शक्य होतं. त्यांचं काव्य अनुभव देत नाही तर अनुभूती देतं. अनुभव आणि अनुभूती यातला फरक सांगेन नंतर पण त्याआधी अरुण दातेंनी गायलेलं ’ती रात्र कुसुंबी बहराची’ हे गीत ऐक. खळेकाकांंनी अप्रतिम संगीत दिलं आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच ’स्पर्शाच्या’ हा शब्द जसा उच्चारला आहे तो डोळे मिटून ऐक, तुला सगळे स्पर्श जाणवू लागतील. मला तर हे गीत ज्या ज्या वेळी कानावर येतं त्या त्या वेळी तिच्यासोबत घालवलेले ते क्षण सजीव होतात. तिच्या मिठीतली मिठास जाणवू लागते. तिचा स्पर्श गात्रागात्रांतून विहरू लागतो. 

सखे, हे गीत जेव्हा पहिल्यांदाच ऐकलं तेव्हा त्यातल्या ’कुसुंबी’ या शब्दाचा अर्थ कळला नव्हता. अनेक कादंबर्‍यांतून डोकावलेला ’सांद्र’ हा शब्दही मला ’सांद्र’ करून गेला आहे. महाराष्ट्रामध्ये कुसुंबी नावाचं एक गाव आहे. कुसुंबी नावाचा एक वृक्षही असतो. केशरी आणि किरमिजी रंग एकत्र येऊन तयार होणार्‍या अत्यंत देखण्या रंगालाही  कुसुंबी म्हणतात. रंग या अर्थानं हा शब्द पाडगावकरांनी योजला असावा असं मला वाटतं. प्रत्येक रंगाला स्वत:ची वृत्ती असते. केशरी हा विरागी, विरक्त, त्यागी वृत्ती दर्शवतो. किरमिजी रंग उत्कट प्रणयार्तता प्रकट करतो. कमालीची आसक्ती आणि कमालीची अनासक्ती जेव्हा प्रणयाच्या पटलावर एकमेकांत मिसळतात, तेव्हा त्यातून जो जहरापेक्षाही अधिक खोलवर भिनणारा रंग तयार होतो. तो म्हणजे कुसुंबी. 

सखे, त्या रात्री ती मला भेटायला आली होती. कोणती दिव्ये तिने पार केली होती तीच जाणे. पण, तिची प्रणयार्तता तिच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होती. धावत येऊन तिने घातलेली मिठी, तिच्या हृदयातली धडधड माझ्या हृदयी कवळून गेली. तिला मिठीत घेण्यासाठी सरसावलेले बाहू, काही क्षण तसेच राहिले. तिच्या मिठीला जे सांगायचं होतं त्याची जाणीव हातांना झाल्यानंतर ते तिच्या पाठीवर जाण्याऐवजी खांद्यांवर स्थिरावले. बाहूपाशातून मुक्त करणं तिला अनपेक्षित असावं. तिच्या डोळ्यातही ते स्पष्ट जाणवलं. 

’हे मीलनाचे क्षण पुन्हा येणार नाहीत.’ हे तिने आपले डोळे माझ्या डोळ्यांत जडवून सांगितलं.  तिच्या आर्ततेच्या कहरातून सावरताना संयमाची पराकाष्ठा झाली. जे हवं होतं, ते वेळेआधीच मिळत होतं. अयाचित मिळत होतं, आपणहून मिळत होतं. संधी मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक माणूस सज्जनच असतो. संधी मिळाल्यानंतरही सज्जनत्व टिकून राहण्यासाठी पराकोटीचा संयम लागतो. 

’का? लग्न झालं नाही म्हणून?’ तिनं विचारलं. मी मानेनेच होकार दिला. काही क्षण असेच मुग्धतेत निघून गेले.

’फक्त लग्न झालं नाही म्हणून नव्हे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. तुझ्यासकट तुझ्या चारित्र्याला मी जबाबदार आहे म्हणून.’ बोलता बोलता माझा कंठ दाटून आला, डोळे पाणावले. तिलाही अश्रू आवरेनात. तिने पुन्हा मिठी मारली. तो वेग आणि आवेग एवढा जबरदस्त होता की, दोघेही गवतावर कोसळलो. आधी मारलेल्या मिठीत प्रणयार्तता होती, आता प्रेम ओसंडून वहात होतं. 

प्रत्येक मिठी वेगळी असते आणि तिची मिठासही. 

सखे, त्या ’अलौकिक’ अवस्थेतून सावरल्यावर माझ्या तोंडून सहज शीळ निघून गेली.  पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. तिच्या रूपसौंदर्याच्या खजिन्याचं रक्षण करण्यासाठी विधात्याने तिच्या गालावर तीळ बहाल केला होता. एरव्ही कृष्णवर्णीय असणारा सौंदर्यांचा राखणदार तीळ, चांदण्यात भिजून पिठूरला होता. त्या चंद्रालाही हेवा वाटावा असा चंद्र माझ्यासमोर होता. मी एकवार आकाशीच्या चंद्राकडे पाहिलं आणि मला त्याचं हसू आलं. गालावरच सुकलेल्या आसवांकडे पहात तिने विचारलं, 

’का रे हसलास?’

काही नाही गं. या चंद्राच्या संसारव्यथेने हसू आलं. हा चंद्र पुरुषासारखा पुरुष असूनही हे कविलोक त्याची उपमा सुंदर स्त्रीच्या चेहर्‍याला देतात. आधीच कायम तारकांच्या गराड्यात असणार्‍या चंद्राची बायको रोहिणी त्याच्यावर किती रागवत असेल, याची कल्पना करून हसू आलं. लग्न झाल्यानंतर  तू नाही ना रागावणार माझ्यावर? 

माझ्या प्रश्‍नावर का कोण जाणे ती गंभीर झाली. लगेच चेहरा बदलत खो खो हसत सुटली. क्षणात चेहरा पालटण्याचं सामर्थ्य स्त्रीच्या चेहर्‍यात ओतणार्‍या मदनाचा प्रहर आठवणीच्या साम्राज्यात जो झिंगला तो झिंगलाच. 

सखे, दोघांची हृदये प्रेमाच्या माधुर्यात बुडून गेली होती. हा प्रेमाचा गोडवा मोठा विलक्षण असतो. स्वत:बरोबर सर्व गोष्टींना तो मधात बुडवून काढतो. रातराणीच्या मोहक सुगंधालाही मधुर करून सोडतो, सारा आसमंत माधुर्याने भारावतो. ’मधुरधिपते: अखिलं मधुरं’ म्हणजे कोणती अवस्था आहे, हे समजण्यासाठी हृदये प्रेमाने ओतप्रोत भरलेली असणे आवश्यक आहे. आम्ही हातात हात घेऊन चांदणे सांडलेल्या वाटेवर हरवलो.  या वाटेवर पाहिलेली स्वप्नं धूसर होती.  याची जाणीव थोड्याच दिवसांनी झाली जेव्हा त्याच वाटेवरून गेलेली ती पुन्हा आली नाही तेव्हा. मीच कदाचित समजू शकलो नाही, तिची मीलनोत्सुकता विरहाच्या जाणिवेतूनच आली होती. पुन्हा कधीच भेटणार नाही याची पक्की खात्री होती म्हणून ती भेटण्यासाठी आली होती. ती जे द्यायला आली होती, ते शरीरसुख मला नको होतं का? याचं उत्तर माझ्याकडे आजही नाही. पण, ते घेणं मात्र माझ्याकडून घडलं नाही. 

सखे, जे घडलं ते बरोबर होतं की चुकीचं हे सापेक्ष आहे. त्या क्षणी जसा मी वागलो तसा पुन्हा वागेन की नाही, हे माझं मलाही सांगता येणार नाही. एवढच का, ते मला ठरवताही येत नाही. कधी कधी आपल्या दुर्गुणांपेक्षाही आपला पराभव आपल्यामधले चांगले गुणच करतात.  आयुष्यात घायाळ करणं जेवढं सौंदर्याला जमलं नाही, तेवढं घायाळ आणि त्याहूनही अधिक विदीर्ण मला माझ्या संयमाने केलं आहे. 

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

‘आय लव्ह यू’, ‘आय डोन्ट’


सखे, आपण अनेक वाक्यं फारच सहज उच्चारत असतो. त्याच्यामागे असलेल्या अर्थाशी आपण प्रामाणिक असतोच असं नाही. अनेकदा तो अर्थ आपल्याला माहीतही नसतो. तरीही आपण अर्थाशिवाय वाक्य उच्चारतो आणि अर्थाशिवाय ऐकतो. आश्‍चर्य वाटलं ना. आता प्रेमाचंच बघ ना! म्हणताना म्हणतो आपण, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ खरंच असतं का आपलं प्रेम? की आपण सवयीनं म्हणायचं म्हणून म्हणतो? तुझ्या चेहराच सांगतोय तुला नाही पटलं. ठीक आहे. एक गोष्ट सांगतो, ती ऐक..

फार फार वर्षांपूर्वी एक तरुण एका तरुणीला भेटला. पहिल्या भेटीतच ती त्याला आवडली. ती दिसायला सुंदर होती, तो नव्हता. नंतर पुढे भेटी वाढत गेल्या. त्यांचं जुळलं, यथावकाश लग्नही झालं. मुलंही झाली. प्रत्येकाच्या संसारात अडचणी येतात, सुखाचे क्षण येतात, दु:खाचे क्षण येतात तसेच त्यांच्याही आयुष्यात आले. कुठलाही क्षण स्थिरावला नाही, कायमचा झाला नाही. एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे दोन वाक्यं.  


तो म्हणायचा आय लव्ह यू

ती म्हणायची आय डोन्ट


सखे, आपण थोडं मागे जाऊ. अगदी सुरुवातीला जेव्हा ती दोघं भेटली तेव्हा. ती नोकरी करायची. त्याचा फिरस्तीचा व्यवसाय होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण, अनेक आडकाठ्या होत्या. त्याच्या नातलगांनी, ‘तुला आणखी कोण मुलगी देणार?’, ‘म्हशीबरोबर लग्न कर’ अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे लग्न करणे ही त्याच्यासाठी फारच महत्त्वाची गोष्ट झाली होती. तिला ती करत असलेली नोकरी सोडायची नव्हती. तिला सांगून येत असलेली स्थळं, लग्नानंतर नोकरी केलेली चालणार नाही अशी अट घालणारी होती. ती दोघंही त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून भेटली. गप्पा झाल्या. लग्नानंतरही नोकरी करण्यास त्याची काहीच हरकत नव्हती. त्यामुळे तिच्यासाठी एक मार्ग मोकळा झाला होता. ती तयार झाली. त्यालाही तिचं तयार होणं हवंच होतं. कारण; 


त्याची ती गरज होती

तिच्यासाठी सोय होती


सखे, त्यांचा संसार सुरू झाला. सुखाचा होता का? माहीत नाही. पण, बहुधा दु:खी नसावा. कारण तो टिकला. त्याला आयुष्यात कुठलीच गोष्ट साधी सरळ मिळाली नव्हती. म्हणजे बघ ना, समजा एखाद्याला दोन अधिक दोन चार एवढं साधं सरळ गणित सुटतं. त्याच्याबाबतीत एक अधिक दोन वजा एक अधिक दोन असं करत करत कसंबसं चार हे उत्तर यायचं. उत्तरही तेव्हा सापडायचं जेव्हा प्रश्‍न निरर्थक झालेला असायचा. तिचं सगळी गणितं व्यवस्थित सुटायची. पण, हे व्यवस्थित सुटणंच तिला नको असायचं. आयुष्य सरळ आणि सोपं झालं तर जगण्यात अर्थच उरणार नाही असं तिला वाटायचं. 


त्याला सुख मिळत नव्हतं

तिला सुख पचत नव्हतं


सखे, परस्पर विरोधी स्वभावामुळे त्यांची कायम भांडणं व्हायची. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ सुखाचा गेला असं कधी झालंच नाही. पण, तरीही तो तिला आय लव्ह यू म्हणायचा आणि ती त्याला आय डोन्ट. आता मला सांग, त्या त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ होता का? असलाच तर त्यांना तो माहिती होता का?

‘तू मला असे विक्रम वेताळ टाइप प्रश्‍न नको विचारूस. हे बरं आहे, कथा सांगायची आणि शेवटी प्रश्‍न विचारायचे. नशीब माझं, चुकीचं उत्तर दिलंस तर डोक्याची शंभर शकले होतील म्हणाला नाहीस.’

सखे, रागावतेस काय अशी? बरं मीच देतो उत्तर. मग तर झालं? शब्द हे अर्थ, भावना पोहोचवण्याचं माध्यम असतात. आपल्याला जे सांगायचं आहे, ते नेमकेपणाने पोहोचवण्याचं काम शब्दांचं. पण, शब्द त्याच गोष्टीचा प्रत्यय देतात ज्याला आकार आहे आणि ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. 

‘झालं, तुझं अगम्य तत्त्वज्ञान सुरू झालं. काही कळत नाही. तू बोलतोस ते.’

सखे, मी साखर हा शब्द उच्चारला तर तुला साखर म्हणजे काय ते कळेल. तू आणूनही दाखवशील. पण, समजा मी म्हणालो, ‘साखर गोड आहे’, तर गोड असणं म्हणजे काय, हे तू सांगू शकशील? जे निर्गुण आणि निराकार आहे, ते शब्दातून व्यक्त करता येत नाही, ही शब्दाची मर्यादा आहे. प्रेम हे निर्गुण निराकार आहे. ते शब्दांतून प्रत्ययाला येत नाही. मग, आपण जे एकसारखं 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' म्हणतो, त्याला अर्थ काय असतो?

‘मला काही कळालं नाही. कळणारही नाही. तुझी फिलॉसॉफी तुझ्याजवळच ठेव. तो आय लव्ह यू म्हणायचा आणि ती आय डोन्ट म्हणायची, त्याचं काय ते सांग.’


तो खोटं बोलत होता

ती खरं बोलत होती