सखे, आपण अनेक वाक्यं फारच सहज उच्चारत असतो. त्याच्यामागे असलेल्या अर्थाशी आपण प्रामाणिक असतोच असं नाही. अनेकदा तो अर्थ आपल्याला माहीतही नसतो. तरीही आपण अर्थाशिवाय वाक्य उच्चारतो आणि अर्थाशिवाय ऐकतो. आश्चर्य वाटलं ना. आता प्रेमाचंच बघ ना! म्हणताना म्हणतो आपण, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ खरंच असतं का आपलं प्रेम? की आपण सवयीनं म्हणायचं म्हणून म्हणतो? तुझ्या चेहराच सांगतोय तुला नाही पटलं. ठीक आहे. एक गोष्ट सांगतो, ती ऐक..
फार फार वर्षांपूर्वी एक तरुण एका तरुणीला भेटला. पहिल्या भेटीतच ती त्याला आवडली. ती दिसायला सुंदर होती, तो नव्हता. नंतर पुढे भेटी वाढत गेल्या. त्यांचं जुळलं, यथावकाश लग्नही झालं. मुलंही झाली. प्रत्येकाच्या संसारात अडचणी येतात, सुखाचे क्षण येतात, दु:खाचे क्षण येतात तसेच त्यांच्याही आयुष्यात आले. कुठलाही क्षण स्थिरावला नाही, कायमचा झाला नाही. एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे दोन वाक्यं.
तो म्हणायचा आय लव्ह यू
ती म्हणायची आय डोन्ट
सखे, आपण थोडं मागे जाऊ. अगदी सुरुवातीला जेव्हा ती दोघं भेटली तेव्हा. ती नोकरी करायची. त्याचा फिरस्तीचा व्यवसाय होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण, अनेक आडकाठ्या होत्या. त्याच्या नातलगांनी, ‘तुला आणखी कोण मुलगी देणार?’, ‘म्हशीबरोबर लग्न कर’ अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे लग्न करणे ही त्याच्यासाठी फारच महत्त्वाची गोष्ट झाली होती. तिला ती करत असलेली नोकरी सोडायची नव्हती. तिला सांगून येत असलेली स्थळं, लग्नानंतर नोकरी केलेली चालणार नाही अशी अट घालणारी होती. ती दोघंही त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून भेटली. गप्पा झाल्या. लग्नानंतरही नोकरी करण्यास त्याची काहीच हरकत नव्हती. त्यामुळे तिच्यासाठी एक मार्ग मोकळा झाला होता. ती तयार झाली. त्यालाही तिचं तयार होणं हवंच होतं. कारण;
त्याची ती गरज होती
तिच्यासाठी सोय होती
सखे, त्यांचा संसार सुरू झाला. सुखाचा होता का? माहीत नाही. पण, बहुधा दु:खी नसावा. कारण तो टिकला. त्याला आयुष्यात कुठलीच गोष्ट साधी सरळ मिळाली नव्हती. म्हणजे बघ ना, समजा एखाद्याला दोन अधिक दोन चार एवढं साधं सरळ गणित सुटतं. त्याच्याबाबतीत एक अधिक दोन वजा एक अधिक दोन असं करत करत कसंबसं चार हे उत्तर यायचं. उत्तरही तेव्हा सापडायचं जेव्हा प्रश्न निरर्थक झालेला असायचा. तिचं सगळी गणितं व्यवस्थित सुटायची. पण, हे व्यवस्थित सुटणंच तिला नको असायचं. आयुष्य सरळ आणि सोपं झालं तर जगण्यात अर्थच उरणार नाही असं तिला वाटायचं.
त्याला सुख मिळत नव्हतं
तिला सुख पचत नव्हतं
सखे, परस्पर विरोधी स्वभावामुळे त्यांची कायम भांडणं व्हायची. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ सुखाचा गेला असं कधी झालंच नाही. पण, तरीही तो तिला आय लव्ह यू म्हणायचा आणि ती त्याला आय डोन्ट. आता मला सांग, त्या त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ होता का? असलाच तर त्यांना तो माहिती होता का?
‘तू मला असे विक्रम वेताळ टाइप प्रश्न नको विचारूस. हे बरं आहे, कथा सांगायची आणि शेवटी प्रश्न विचारायचे. नशीब माझं, चुकीचं उत्तर दिलंस तर डोक्याची शंभर शकले होतील म्हणाला नाहीस.’
सखे, रागावतेस काय अशी? बरं मीच देतो उत्तर. मग तर झालं? शब्द हे अर्थ, भावना पोहोचवण्याचं माध्यम असतात. आपल्याला जे सांगायचं आहे, ते नेमकेपणाने पोहोचवण्याचं काम शब्दांचं. पण, शब्द त्याच गोष्टीचा प्रत्यय देतात ज्याला आकार आहे आणि ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे.
‘झालं, तुझं अगम्य तत्त्वज्ञान सुरू झालं. काही कळत नाही. तू बोलतोस ते.’
सखे, मी साखर हा शब्द उच्चारला तर तुला साखर म्हणजे काय ते कळेल. तू आणूनही दाखवशील. पण, समजा मी म्हणालो, ‘साखर गोड आहे’, तर गोड असणं म्हणजे काय, हे तू सांगू शकशील? जे निर्गुण आणि निराकार आहे, ते शब्दातून व्यक्त करता येत नाही, ही शब्दाची मर्यादा आहे. प्रेम हे निर्गुण निराकार आहे. ते शब्दांतून प्रत्ययाला येत नाही. मग, आपण जे एकसारखं 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' म्हणतो, त्याला अर्थ काय असतो?
‘मला काही कळालं नाही. कळणारही नाही. तुझी फिलॉसॉफी तुझ्याजवळच ठेव. तो आय लव्ह यू म्हणायचा आणि ती आय डोन्ट म्हणायची, त्याचं काय ते सांग.’
तो खोटं बोलत होता
ती खरं बोलत होती

प्रेम हे आंधळं असत...प्रेम म्हणजे फक्त दिखावू प्रेम असू नये..प्रेम म्हणजे एक विश्वास..एक साथ..एक चांगल्या विचारांचा जोडीदार असावा जो एक मेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो तो...प्रेम हे संबंधा पुरते असू नये...तर ते एक मेकांच्या साथीने...शेवट पर्यंत टिकवून ठेवले पाहिजे...शेवटच्या क्षणापर्यंत हे प्रेम जी जोडी टिकवते तीच जोडी संसारात यशस्वी होते...बर्वे जी उत्तम ल3ख
उत्तर द्याहटवाchaan aahe.prem karne hi mansachi sarvochch bhavana.mag te konavarahi asu shakte.aani te kadhi shabdadware kadhi dolyatun,kadhi sparshatun ase anek madhyamatun vyakt hote.
उत्तर द्याहटवाप्रेम हे आपोआप सहवासाने होते. Love at first site वगैरे करणारे खूप वेगळे असतात किंवा प्रत्यक्षात खोटे बोलतात. लेख वेगळा आणि विचार करायला लावणारा आहे. प्रेमाचा अर्थ आपण लावू तसा होतो.
उत्तर द्याहटवा