प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १० मे, २०२२

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता...

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता

सखे, तू उदास असलीस, खिन्न असलीस की मला त्रास होतो. का कोण जाणे, पण तू नेहमी प्रसन्न असावंस असच वाटतं. तुझ्या मनातली प्रसन्नता चेहर्‍यावर झळकते, तेव्हा त्या निर्व्याज स्मितहास्याच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ नये असं वाटतं. अपूर्णत्व मनाला खिन्नता आणतं. ही खिन्नता घालवण्याची प्रत्येकाची साधनं वेगवेगळी असतात. तुला भेटलो की मनाची मरगळ नाहीशी होते. धकाधकीचं आयुष्य सहन करण्याची ताकद मिळते. 

‘सगळ्यांची आयुष्यं अपूर्णच असतात का रे? कुणीच पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही का?’

सखे, सगळ्यांचं आयुष्य अपूर्ण असतं. आपल्या सगळ्या आकांक्षा, इच्छा पूर्ण होतातच असं नाही. ‘मागणं’ आणि ‘मिळणं’ यातलं अंतर जेवढं जास्त, तेवढं जगणं जास्त त्रासदायक. सगळ्यांना सगळं नाही मिळत. आयुष्याच्या याच अपूर्णत्वावर निदा फाजलींची ‘कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता’ ही अप्रतिम गझल आहे, ती तू ऐक. मूळ गझल त्यांच्या ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील आहे. १९८१साली आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटासाठी त्यात थोडासा बदल केला गेला. भूपेंद्र सिंग यांचा आवाज आहे आणि संगीत खय्याम यांचं. यातला एक शेर जेव्हा ऐकला तेव्हापासून आत्तापर्यंत तो विसरलो नाही. 

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता 
कहीं ज़मीं तो कहीं आसमां नही मिलता 

सखे, मुकम्मल याचा अर्थ पुरेसा किंवा पूर्ण. प्रत्येकाचं स्वत:च असं विश्व असतं. त्याच्या स्वत:च्या भावना, इच्छा, अपेक्षा असतात. कधी स्वत:कडून तर कधी इतरांच्याकडून त्या पूर्ण व्हाव्या असं त्याला वाटत असतं. पण त्या होत नाहीत. एका अपेक्षेची पूर्तता दुसर्‍या अपेक्षेला जन्म देते. म्हणूनच तृप्ती ही फार दुर्मीळ गोष्ट आहे. जसा माणूस विचाररहित असू शकत नाही, तसाच तो इच्छारहितही असू शकत नाही. इच्छा, अपेक्षा कधीच थांबत नाहीत. आपण कुठं थांबायचं, हे समजलं की अपेक्षांचं ओझं होत नाही, इच्छा त्रास देत नाहीत.

जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है
ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नही मिलता 

सखे, मूळ शेर ‘जिसे भी देखिये वो अपने आपमे ही गुम है’ या ऐवजी ‘ये क्या अज़ाब है सब अपने आप में गुम हैं’ असा आहे. ‘अज़ाब’ याचा अर्थ दु:ख किंवा शिक्षा. आपल्याला असंख्य माणसं आयुष्यात भेटतात. ज्याला बघावं तो आपल्याच विश्वात गर्क असतो. प्रत्येकजण दुसर्‍याला ऐकवत असतो. जिंकणं, हरणं, सुख, दु:ख या भोवती गुरफटलेलं स्वत:चं आयुष्य इतरांसमोर उलगडत राहतो. ऐकवणारी माणसं खूप आहेत. उणीव ऐकणार्‍या माणसांची आहे. फारशी जवळीक नसणारी माणसं आपल्याशी खूप बोलतात. दु:ख, आपल्याच माणसांना आपल्याशी बोलावसं वाटत नाही याचं आहे. ज्यांच्या सुखाने आपण सुखी होतो, ज्यांच्या दु:खात आपण दु:खी होतो, त्यांना आपल्याशी बोलायला वेळ नसतो. गुजगोष्टी करणारी असंख्य माणसं अवतीभवती सतत वावरत असतात. ज्यांच्याशी हितगुज करावं अशी माणसं आपल्यापासून लांब असतात. त्यांचं लांब असणं छळत नाही, त्यांचं हितगुज न करणं प्रचंड त्रास देतं. 

बुझा सका है भला कौन वक्त के शोले
ये ऐसी आग है जिस में धुँआ नही मिलता 

सखे, मनावर झालेल्या जखमा, त्यांना वेळ दिला की भरतात. निदान तसं आपल्याला वाटतं तरी. दु:खाला कवटाळत बसण्यापेक्षा त्याला विस्मृतीत ढकलणं जास्त सोयीचं असतं. आपण विसरू म्हटलं तरी काही गोष्टी विसरता येत नाहीत. प्रसंगाप्रमाणे त्यांची आठवण नको त्या वेळी होतेच. त्यांचं चिंतन चिंता वाढवीत जातं. मेल्यावर जाळते ती चिता आणि जिवंतपणी जाळते ती चिंता. हा अनुस्वाराचा फरक आपल्यामध्ये किती जाळ घेऊन वावरतो हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आठवणींच्या या वणव्याला ज्वाळाही नसतात आणि धूरही येत नाही.

तेरे जहाँ में ऐसा नही के प्यार न हो
जहा उम्मीद हो इसकी वहाँ नही मिलता 

सखे, हाच तो शेर जो ऐकताक्षणीच आवडला होता. वेदना नेमक्या शब्दात मांडली की, तिचं काव्य होतं, हे या शेरामुळे पटतं. ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील गझलेत हा शेर ‘तमाम शहर में ऐसा नही ख़ुलूस न हो, जहाँ उमीद हो सकी वहाँ नही मिलता’ असा आहे. ‘ख़ुलूस’ याचा अर्थ प्रामाणिकपणा, ओढ किंवा सत्य असाही होतो. पण, हा चित्रपटातील गझलेसाठी बदलून लिहिलेला शेर जास्त भावला. 

सखे, प्रेम हे निसर्गाने, परमेश्वराने जिवाला जगण्यासाठी दिलेली भेट आहे. आपण श्वास घेणं हे जसं आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे, तसंच प्रेम हे आपण जगत असल्याचं लक्षण आहे. म्हणूनच ते सर्वांठायी आहे. प्रेम नाही असं एकही स्थान निसर्गात नाही. तरीही आपल्यासाठी म्हणून आपण या अमर्याद प्रेमाला मर्यादित स्वरूपात पाहतो. एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. ते तिथूनच मिळावं अशी अपेक्षा बाळगतो. खास करून एखाद्या व्यक्तीकडून. प्रेमाच्या बाबतीत, ते मिळावं यापेक्षाही ते कुठून मिळावं या गोष्टीवर आपण ठाम राहतो. तिथून ते नाही मिळालं की आपण दु:खी होतो. 

सखे, हा विचार तुला कदाचित पटणार नाही, तरीही ऐक. प्रेम आपल्याला जिथून हवं असतं तिथून ते मिळावं यामध्ये जशी प्रेमाची सार्थकता आहे, तशीच सार्थकता ते मिळू नये यातही आहे. 

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

यूँही नहीं दिल लुभाता कोई...


सखे, तू मला का आवडतेस, हे नाही सांगता येत. तू अनेकदा ’मी तुला इतकी का आवडते’ हा प्रश्न विचारून मला भंडावून सोडतेस. नेमकं असं एकच कारण नाही. फक्त ते कारण मला माहिती नाही. या जगात काहीच अकारण घडत नाही. एखाद्या घटनेमागचं कारण आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपण आपल्यापरिने त्याची संगती लावण्याचा प्रयास करीत असतो. आपल्या आयुष्यात आपण जेवढ्या माणसांना भेटतो, ते अचानक, योगायोगाने वगैरे नव्हे तर ऋणानुबंधांच्यामुळे भेटतो. म्हणूनच एखादा माणूस आपल्याला इतरांपेक्षा अधिक का आवडतो हे तर्कानं पटवता येत नाही. बस तो आवडतो, या पलीकडे आपल्याला काही सांगता येत नाही. 

सखे, तू बुद्धिप्रामाण्यवादी आहेस. त्यामुळं तर्कानं न पटवता येणं तुला पटणार नाही. बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर काही अनाकलनीय असतच नाही हा तुझा ठाम ग्रह आहे. त्यावरून आपली अनेकदा भांडणेही झाली आहेत. वादग्रस्त मुद्दे विसंवाद घडवतात. ’असं असू शकेल’ असं मान्यच नसणं, कुठेही श्रद्धा नसणं म्हणजे विज्ञाननिष्ठ असणं असा तुझा दृढ समज आहे. अरे देवा! तुझा कोमल चेहरा रागाने करपू लागला आहे, यथेच्छ, तुडुंब भांडणाची नांदी तुझ्या चेहर्‍यावर दिसू लागली आहे. तेव्हा शांत हो माझ्या आई!

’मी तुझी आई नाही.’

माहिती आहे. रागावू नकोस. प्रेम नाही, निदान रागावू तरी नकोस. सोड ना, किती रागावशील? चल मी तुला किशोर कुमारचं मस्त गाणं ऐकवतो. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं ’तेरा मुझ से है पहले का नाता कोई’ हे गाणं तू ऐक.  पंचमदांचं मस्त मनमोहक संगीत आहे. मस्तपैकी अशी खुर्चीत बैस. कॉफी घे, गाणं ऐक. तुझा मूडही ठीक होईल. 

’हे बरं जमतं तुला. माझा राग कसा घालवायचा, त्यासाठी कोणती कळ फिरवायची हे तुला चांगलंच माहिती आहे. तुम्हा पुरुषांना बायकांना पटवण्यासाठी ही अशी अतर्क्य गाणी बरी ऐनवेळी सुचतात. मॅन विल बी मॅन हेच खरं.’

सखे, आता मी म्हणू का, तुम्हा बायकांचा पुरुषांकडे पाहण्याचा हा परंपरागत, अतर्क्य दृष्टिकोन आहे? पुरुष स्त्रीकडे ’त्याच’ एका कारणासाठी आकर्षित होतो, तिच्याशी लाडीगोडी करतो, जवळीक साधायचा प्रयत्न करतो, असं स्त्रियांना नेहमी वाटतं. स्वत:च्या प्रमाणबद्ध सौंदर्याची प्रमाणाबाहेर जाणीव झालेली असेल, तर मग प्रत्येक पुरुष आपल्याकडे ’त्याच’ नजरेने पाहतो असा दृष्टिकोन तयार होतो. 

’पुरुष ज्या पद्धतीने स्त्रीकडे पाहतात आणि त्या पाहण्याचा त्या स्त्रीला किती त्रास होतो, हे तू स्त्री असतास तर तुला कळालं असतं.’

मान्य आहे. बहुतांशी पुरुषांचा दृष्टिकोन तसा असतो. पण त्यामुळे संपर्कात येणारा पुरुष तसाच असतो असं म्हणणं कितपत योग्य आहे? स्त्रीवर तिच्या देहापलीकडे जाऊन प्रेम करणार्‍या पुरुषावर हा अन्याय नाही का? अमृत मासिकामध्ये एक गोष्ट आली होती. एक नवरा आपल्या बायकोला वाचवा म्हणून डॉक्टरच्या पाया पडत असतो. ’डाक्टरसाब कैसा भी करके जोरू को बचाओ. गरीब हूं लेकीन पाई पाई चुकाउंगा. पांव पडता हूं साहब’. पाया पडणारा, गयावया करणारा माणूस दिसायला हॅन्डसम असतो. त्याची मरणासन्न बायको कुरूप असते. त्याला अजिबात शोभणारी नसते. डॉक्टरला आश्चर्य वाटतं. डॉक्टर त्याला म्हणतो, ’वाईट वाटून घेऊ नकोस. पण, तुझी बायको गेली तर तू सुटशील. एखादी सुंदर स्त्री तुझ्यावर सहज भाळेल. मग तू हिला वाचवण्यासाठी एवढा आटापिटा का करतोस?’ तेव्हा तो माणूस म्हणतो, ’साब, इसे मेरी आंखोसे देखो’. 

एखाद्याचं सगळ्या गोष्टी अनुकूल असताना नाकारणं आणि सगळ्या गोष्टी प्रतिकूल असतानाही स्वीकारणं, बुद्धिप्रामाण्याने पटवता येणार नाही. हे अनेक जन्मांचे ऋणानुबंध, पूर्वी कुठेतरी ओळख असणं, नातं असणं मान्य करावं लागतं. 

’म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की, पुनर्जन्म असतो. पुनर्जन्म वगैरे असं काही खरंच असतं का?’  

सखे, पुनर्जन्म असतो. नसते ती स्मृती. जन्म, मृत्यू आणि पुन्हा जन्म या शृंखलेला जोडणारी स्मृती नसते. वेगळ्या अर्थाने सांगायचे तर, स्मरण नसणे हेच मरण. तू संगणकातली एखादी संचिका (फाईल) नाहीशी (डिलीट) करतेस तेव्हा नेमकं काय होतं? त्या संचिकेचे हेडर आणि फूटर वेगळे होतात, त्यातली माहिती तशीच राहते. हेच हेडर व फूटर पुन्हा जुळवता आले तर नाहीशी केलेली संचिका परत मिळवता येते. कमी अधिक फरकानं तसंच पुनर्जन्माचं असतं. 

सखे, एखाद्याला एखादी गोष्ट चटकन समजते, करताही येते. त्याच्याहीपेक्षा हुशार गणलेल्याला त्याच गोष्टीचे लवकर आकलन होत नाही, असं का? मला आंबा प्रचंड आवडतो, माझ्या धीरज म्हांबरे नावाच्या मित्राला अजिबात आवडत नाही. असं का? मन, मेंदू, बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, दोघांनाही असते. तरी मग असं का होतं? क्रिया प्रतिक्रियांच्या प्रक्रियेतून ज्याचा जिथपर्यंत अभ्यास झालेला असतो, तिथून पुढे तो जात असतो. आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचं, विचारांचं मुद्रण आपल्या गुणसूत्रांवर होत असतं. मेल्यानंतर आपण काहीच घेऊन जात नाही असं नाही. मिळवलेलं ज्ञान,  अभ्यास, आवड निवड, विचार आपण घेऊन जात असतो.  

सखे, हीच आवड निवड, ज्ञान घेऊन आपणच पुन्हा जन्माला येतो. मागील पानावरून पुढे प्रवास सुरू होतो.  हे मागचं पुढे घेऊन जाणं म्हणजे संचित.  संचित वासनेला प्रेरित करतं, वासना बुद्धीला, बुद्धी मनाला, मन इंद्रियांना प्रेरित करतं आणि पुन्हा कार्य घडतं. 

आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन इतरांपेक्षा सहज का होतं, एखादी गोष्ट का आवडते, त्यामागे ही कारणपरंपरा असू शकते. तू मला का आवडतेस, हे नेमकं सांगता येत नसलं तरी, काही तरी ऋणानुबंध आहेत एवढं निश्चित...

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

तुला जर द्यायचे आहे...


"अरे, असा काय बघत बसला आहेस त्या वस्तूंकडे? अगदी आयुष्यभराचं नुकसान झाल्यासारखा! असं असूनही तुझा चेहरा तुझ्या नावासारखाच आहे. पण, असा जेव्हा तुझा चेहरा प्रसन्न असतो ना, तेव्हा खूप काही घडून गेलेलं असतं, तुझ्या हृदयात खूप खोल काहीतरी तुटलेलं असतंं. हा माझा आजवरचा अनुभव आहे. सांग ना काय झालं? "

सखे, ती येऊन गेली. ज्या ज्या भेटवस्तू तिला दिल्या होत्या त्या सगळ्या देऊन गेली. खरं तर नकोच होत्या मला त्या. त्या नको असलेल्या वस्तू परत दिल्याचं दु:ख नाही. नातं तोडल्यानंतर परत देण्यासारखं तिच्याजवळ एवढंच राहिलं होतं, याचंच दु:ख मला जास्त झालं. तिचा झाल्यानंतर मी माझ्यासाठी माझ्यापुरताही उरलो नव्हतो. तिच्याजवळ ती, तिची प्रायव्हेट स्पेस आणि मी दिलेल्या भेटी उरल्या होत्या. खांद्याला लावलेली बॅग टेबलवर घस्‌कन रिती करताना तिला त्या वस्तू आपटतील, फुटतील, त्यांना तडा जाईल असं जराही वाटलं नाही. जिथे माझ्या हृदयाला तडा देताना, जिला जराही काही वाटलं नव्हतं, तिला भेट दिलेल्या वस्तू परत देताना त्यांना तडा जाईल, याची फिकीर असण्याची अपेक्षा तरी मी का बाळगावी? तिच्यासाठी ज्या केवळ वस्तू होत्या, त्या माझ्यासाठी बहुमूल्य होत्या. त्यामागे असणार्‍या भावनेची मोजदाद तर कुठल्याच किमतीत होणारी नव्हती. 

सखे, आता तुला टेबलवर पडलेल्या वस्तू दिसत आहेत त्या वस्तू आणि मी कालपासून असेच आहोत. विखुरलेले आणि दिग्मूढ. असंख्य भेटकार्डे, आद्याक्षराचे पेन्डण्ट, टेडी बेअर, पैंजण आणि टेबलवर पर्स रिती करताना पडून फुटलेली रिकामी अत्तराची बाटली. या प्रत्येक वस्तूसोबत जोडलेले प्रत्येक क्षण मला यथेच्छ छळून गेले. तिला ती वस्तू विकत घेऊन देता यावी यासाठी स्वत:चं मारलेलं मन, न केलेले खर्च, अटोकाट केलेली काटकसर आणि सर्वांवर कडी करणारं तिच्या चेहर्‍यावरचं असमाधान. दिलेल्या वस्तूच्या किमतीवर देणार्‍याच्या प्रेमाचं मोल ती ठरवत होती. किंमत आणि मूल्य यातलं अंतर तिला जिथे समजत नव्हतं तिथे अमूल्य असणारं प्रेम तिच्या लेखी काय असेल याची कल्पनाही माझ्याने करवत नव्हती. 

’तुझ्यासारखा वेडा मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. जिला तुझं प्रेम कळत नव्हतं तिच्याशी संबंध तुटले, अर्थात तिनेच  तोडले, ते एका अर्थी चांगलंच झालं की. ज्यांना जीव लावणं म्हणजे काय हे समजत नाही त्यांच्यावर जीव लावावा तरी कशाला? एकतर्फी वाताहात करणारे संबंध टिकवून तरी  का ठेवावेत? इतर प्रत्येकजण तुझा वापर करून घेतो, तसा वापर करून घेण्यासाठी? तोही फुकट? यात तुला काय मिळालं? तुझा काय फायदा झाला?’ 

सखे, तिला विसरता येत नाही. तिला विसरणं शक्य नाही. माझ्या आयुष्यातून ती दूर गेली आहे, पण हृदयातून जात नाही त्याचं काय करू? तिच्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण भूतकाळात गेलाच नाही. तो माझ्यासोबत वर्तमानातच राहिला आहे. हे प्रेमही आहे आणि हा छळवादही. न संपणारा, न जाणारा. कदाचित जाईलही, पण मी गेल्यावर. जाऊ दे ना! चल तुझा मूड बदलण्यासाठी एक मस्त गीत ऐकवतो. अनिल कांबळेंनी लिहिलेलं, सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेलं ’तुला जर द्यायचे आहे जुने ते प्रहर दे माझे’  हे गीत ऐक.  याला संगीतबद्ध केलं आहे, डॉ. सलील कुलकर्णी यांनी. 

सखे, तिच्यासोबतचे प्रत्येक प्रहर, प्रत्येक क्षण मला आठवत आहेत. आठवले असं म्हणणं ही कदाचित चुकीचं ठरेल. कारण त्यांना कधी विसरलोच नव्हतो. ती आणि मी सकाळी चालायला जायचो. धुकं कापत येणारी सूर्यकिरणे कॅमेर्‍यात कैद करायला तिला फार आवडायचं. ढगांना दूर करत, झाडांच्या आडून गवताच्या पातीवर ओथंबलेल्या दवबिंदूंचे चुंबन घेण्याकरता आसुसलेली सूर्याची किरणे आणि त्यामुळे धुक्याच्या कॅनव्हासवर तिरपे होणारे कवडसे, मला जसे आहेत तसेच पाहायला फार आवडत. तिला ते कधी एकदा कॅमेर्‍यात बंद करते, असे होऊन जायचे. निसर्गाच्या कॅनव्हासवर रेखाटलेले चित्र दरक्षणी बदलणारं, दर खेपेला वेगळं आणि नवं, ताजं वाटतं. तेच कॅमेर्‍यात कैद झाले की, प्रत्यक्षाहून उत्कट दिसतं. पण, ते चित्र फक्त उत्कट दिसतं, त्यात निसर्गाची उत्कटता नसते. म्हणूनच कितीही वेळा पाहिलं तरी तसंच दिसतं. तिला कुपीत बंद झालेलं अत्तर आवडायचं. मला तेच अत्तर फुलासोबतच हवं असायचं. तुला ही फुटलेली अत्तराची बाटली आहे ना, ती तिच्या आग्रहाखातर दिली होती. एकदा वाटून गेलं फुटलेली बाटली जोडावी. नंतर म्हटलं राहू दे. नाती आणि काचेची बाटली सारखीच असतात. फुटलेली बाटली आपण कितीही चांगल्या पद्धतीने चिकटवली, तरी ती चिकटवलेली बाटली, ’जोडली आहे’ यापेक्षाही ’फुटली होती’ याचीच जाणीव जास्त करून देते. 

सखे, तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नव्हे. ते समजण्याची गल्लत होती. तिने प्रेमाला महागड्या भेटवस्तूंशी आणि त्या देण्याशी जोडलं होतं. किमती भेटवस्तू दिल्या म्हणजे प्रेम आहे, नाहीतर नाही अशा काहीतरी विचित्र कल्पना तिच्या प्रेमाबद्दल आहेत. तिच्या पायांत पैंजण घातले तेव्हाही पाय हलवत सोन्याचे हवे म्हणून हट्ट धरून बसली होती. हा टॅडी बेअर दिला ना तेव्हा तिने आनंदाने  नाचली होती, जीन्सवर घातलेला एकमेव टॉप काढून, त्याला हाताने फिरवत फिरवत नाचली होती. तशीच मलाही घट्ट मिठीही मारली. आवरता नाही आलं गं स्वत:ला. ते अनावर होणं म्हणजे प्रेम नव्हे,   देहाचं मीलन म्हणजे प्रेम नव्हे, प्रणयोत्सुकता म्हणजे प्रेम नव्हे. प्रेमाच्या ओघात देहाचं समर्पण सामान्य गोष्ट आहे. पण, ते आणि त्याच्यासाठी जवळ येणं म्हणजे प्रेम नव्हे. तो शुद्ध चैतन्याचा महोत्सव आहे. ते देणं आहे, घेणं नाही. ही देणी परत करता येत नाहीत. उत्तररात्री रतिक्लांत होऊन विसावलेले देह पहाटे पुन्हा उमलताना अनावर होत गेलेले सुखाचे बहर तिला नाही परत करता येणार. संध्याकाळी दीपमाळेतला एक एक दिवा लागत असल्यापासून पहाट होता होता शेवटचा दिवा विझेपर्यंत तिची वाट पाहणं, ती नाही परत देऊ शकणार. ती काहीच परत नाही देऊ शकत म्हणून तिने भेटवस्तू परत दिल्या. तिच्याकडे देण्यासाठी फक्त वस्तू शिल्लक होत्या. माझ्याकडे वस्तूंशिवाय सगळं काही.

’एक विचारू? तिनं तुझा वापर करून घेतला. तिनं काय कमावलं माहीत नाही. तू सर्वस्व गमावलंस. तुला काय मिळालं? ’

सखे, प्रेमात घेणं - देणं, कमावणं - गमावणं, फायदा - नुकसान असं काही व्यवहारी नसतं गं. तरीही तुला पटेल असं उत्तर देतो. 

मी तिला गमावलं जिचं माझ्यावर प्रेमच नव्हतं. तिनं अशा माणसाला गमावलं, ज्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. 

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

पहाटे पहाटे मला जाग आली...

ज्या स्त्रिया नवरा आपलं ऐकत नाही अशी तक्रार करतात त्यांनी नवर्‍याला मुठीत ठेवणं आधी बंद करावं. नवरा मुठीत कितीसा मावेल? त्याऐवजी मिठीत संपूर्णच मावेल ना! आपल्या माणसावर अधिकार गाजवणं त्याला दूर लोटतं आणि प्रेम गाजवणं जास्त जवळ आणतं. तस्मात, नवरा मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवावा.  https://aiksakhe.blogspot.com/2021/09/blog-post.html



सखे, पहाटे पहाटे आपल्याला जाग कशी यावी, हे आपल्या हातात नसतं. काल भल्या पहाटे सात वाजता बायकोने गदागदा हलवून जागं केलं. मी डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती काहीतरी बोलत होती. तारस्वरामुळे शब्दही कानी पडत होते. पण, अर्थ कळत नव्हता, संगती लागत नव्हती.

’अहो, उठा. आंघोळी करून घ्या पटापट. पाणी आठ वाजता जाणार आहे. टाकीला पाणी चढत नाही. नळाला येतं तेवढ्यातच सगळी कामं उरकून घ्या. अहो, चला उठा पटापट.‘

तिच्या तोंडाचा पट्टा पटापटा सुरूच होता. अर्ध ऐकू जात होतं, ऐकू गेलेल्यातलं अर्धच समजत होतं, अशा "अलौकिक" अवस्थेत मी होतो. त्यामुळे साहजिकच मी फक्त कूस बदलली आणि पुन्हा झोपी गेलो. स्वयंपाकघरात गेलेली बायको पुन्हा कानाकडे येऊन ओरडू लागली. 

’अहो झोपताय काय कुंभकर्णासारखे! आधीच पाण्याचा दुष्काळ. त्यात तुम्ही घसाघसा पाणी ओतून संपवता. पाणी वाचवण्याचं तुमच्या मनातही कधी येत नाही. मीच मेलीनं एकटीनं काय काय म्हणून सांभाळायचं, कुठं कुठं लक्ष द्यायचं? संसाराचं तुम्हांला काही पडलं .................... ‘

स्वयंपाकघरातून विळीवर नारळ खवण्याचा तालावर संसाराचं खवट गाणं सुरू झालं आणि माझ्या डोक्याचा नारळ व झोपेचं खोबरं करून गेलं. मी उठून बसलो. पाणी वाचवण्याचं मनात येत नाही असं सांगताना, पाणी आणि वेळ वाचावा या सद्हेतूने कित्येकवेळा आम्ही दोघांनी एकत्र केलेल्या आंघोळी मात्र हिला आठवल्या नाहीत. मला मात्र या आठवणी बसल्या बसल्या न्हाववून गेल्या. त्या सुखद आठवणीत मी पुन्हा झोपी गेलो, बायको पुन्हा कडाडली. तेव्हापासून आमच्या घरात अबोली फुलली आहेत.

सखे, माणसाला पहाटे अशी जाग यावी की दिवस चांगला जावा. दिवस रमणीय होण्यासाठी रात्रही रमणीयच असावी लागते. पहाट होऊच नये असे वाटायला लावणारी रात्र, नंतर येणारा दिवस सोनेरी करून जाते. तुझ्यासोबत जागवलेल्या अनेक रात्रींमुळे माझे अनेक दिवस सोनेरी झाले आहेत. अगं लाजतेस काय अशी? खरंच तर आहे. सुरेश भटांनी ’पहाटे पहाटे मला जाग आली’ हे गीत माझ्यासाठीच लिहिलं आहे असं मला कायम वाटतं. आपलाच अनुभव, आपलीच भावना गीतातून कवीने मांडली आहे, एवढेच नव्हे तर हे गीत माझ्यासाठीच लिहिले आहे, असे प्रत्येकाला वाटणे हे कवीचे सामर्थ्य असते. सुरेश भटांकडे हे सामर्थ्य अतोनात आहे आणि हे सामर्थ्य नेमकेपणाने वापरण्याचं कौशल्यही. अशी भावलेली गाणी प्रत्येक सहृदय माणूस आपल्या पद्धतीने गातो. तालात, सुरात आपण ते गात नाही याची जाणीव असतानाही गातो. आपणच ते गायलं आहे असं प्रत्येकाला वाटायला लावणं हे गायकाचं सामर्थ्य आहे. हे गीत तू ऐक. आपण जागवलेली प्रत्येक रात्र, प्रत्येक पहाट तुला झोपू देणार नाही.

सखे, येऊच नये असे वाटणारी पहाट तुझ्या मिठीतून दूर होण्याने येते. जागं करून जाते. गच्च असली तरी ती रेशमाची असते. करकचून आवळणं एरव्ही त्रासदायक असतं. पण, तुझी मिठी सुटल्यानंतर त्रासदायक होते. बेधुंद प्रणयानंतर आलेली झोप मिठीची मिठास वाढवते. निद्रा आणि जागृती यांची परमोच्च स्थिती व अनुभूती एकच असते. तुझ्या मिठीतली गाढ निद्रा ही माझ्यासाठी जागृतीची अलौकिक परमोच्च अवस्थाच असते. तू मिठी सैल केल्यानंतर मी लौकिकार्थाने जागा होतो. मिठी सैल झाल्यामुळे अग्रेही विलग होतात. दूर झाल्याने त्यांचं न ’टोचणं’ दुखतं. एरव्ही छातीवर रुतलेली असताना ही अग्रे टोकाचे सुख देऊन जातात. तू रागावलीस ना, की माझ्या ओठावर ’नच सुंदरी करू कोपा’ हे नाट्यगीत सहज येतं. तुला राग आणणार्‍या माझ्यासारख्या महतपाप्याला, तू काय दंड  द्यावास, हे दुसर्‍या कडव्यातल्या ’टोचुनी दुखवी मजला‘च्या आधीच्या ओळीत कृष्णानेच सांगितले आहे. असा दंड, अशी शिक्षा आजन्म भोगायला मिळण्यासारखं भाग्य दुसरं नाही.

ज्या स्त्रिया नवरा आपलं ऐकत नाही अशी तक्रार करतात त्यांनी नवर्‍याला मुठीत ठेवणं आधी बंद करावं. नवरा मुठीत कितीसा मावेल? त्याऐवजी मिठीत संपूर्णच मावेल ना! आपल्या माणसावर अधिकार गाजवणं त्याला दूर लोटतं आणि प्रेम गाजवणं जास्त जवळ आणतं. तस्मात, नवरा मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवावा.

सखे, इतर कुठलीही तात्पुरती धुंदी माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. प्रणयातली बेधुंदी माणसाला खर्‍या अर्थाने धुंदी म्हणजे काय असते हे समजावते. अख्खी रात्र कशी गेली हे आम्हांला दोघांनाही कधीच आठवलं नाही. आठवायचा प्रयत्न केला तरीही अंगावरील शहारे आणखीनच फुलून यायचे. अनावृत देहावरील शहारे म्हणजे शरीरविणा झंकारल्यानंतर जुळलेले सूर असतात. हे सूर जुळवण्यासाठी माझी बोटे फिरायची तेव्हा तुझा गुलाबी चेहरा आणि गाल, आणखीनच गुलाबी व्हायचे. मदनालाही जाळून टाकेल इतका तुझा देह तप्त व्हायचा. नको नको म्हणत तू आणखीनच जवळ ओढायचीस. उत्कट आर्ततेचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर, मन शांत व्हायचं, देह तप्तच असायचे. ती ग्लानी, ती क्लांतअवस्था आणखीनच तप्त व्हायची. यावर कुठेतरी वाचलेला शेर आठवला,

रतिक्लांत सखी माझ्यावर झोपली
वाटले जसे आग आगीवर झोपली

नेमकी हीच अवस्था असल्याने रात्र कधी सुरू झाली आणि कधी संपली हे पहाटेपर्यंत समजतच नसे. पहाट झाली तरी नभाला लाली काही चढत नसे.

सखे, तू उगाच घाई करतेस. किती कामं पडली आहेत, चहा करायचा आहे, आंघोळ, नाश्ता, ऑफिसला जायची तयारी, किती हे उठण्याचे बहाणे करशील. माझ्यासाठी हे महत्त्वाचे नाही. कामाचं रहाटगाडगं नेहमीचंच आहे. हे रेंगाळलेले क्षण आणखी लांबवण्यात जे सुख आहे, ते अलमदुनियेत कशातही नाही. तुला हा उल्लूपणा वाटेल. पण, तो तसा नाही. प्रणय म्हणजे दोन देहांची लगट आणि मल्लयुद्ध नाही. हा चैतन्याचा महोत्सव आहे. हे सुख दिल्याने मिळतं. हे सुख जितकं जास्त घेण्याचा प्रयत्न कराल, तितकं ते कमीच मिळेल. ओरबाडून तर ते मिळतच नाही. स्वत:च्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रणय हासुद्धा बलात्कारच असतो. त्यातून सुख मिळतच नाही. प्राप्त होतो ’मी घेतलं‘ हा अहंकार आणि ’ती माझी आहे’ हा अधिकार सिद्ध करण्याचा अट्टहास. 

सखे, प्रणयात देह हे साधन आहे, साध्य नाही. देहाने मिळवायचे आहे, देह मिळवायचा नाही. जे मिळवायचं आहे त्याला चैतन्य म्हणतात. समजा, आपण फोंड्याला आहोत आणि आपल्याला पणजीला जायचं आहे. फोंड्यातून वाहनाने आपण पणजीपर्यंत येतो. आपण वाहनातून उतरलोच नाही, तर पणजीत पोहोचूनही पोहोचत नाही. नेमकं तेच प्रणयाच्याबाबतीत होतं. देहातून चैतन्याकडे घेऊन जाणारा प्रवास म्हणजे प्रणय. म्हणूनच, कुठं जायचं हे माहीत नसलं की होते ती फक्त फरपट.  

सखे, या चैतन्याच्या महोत्सवात असंच भिजत राहूया. तुला शपथ आहे तुझ्या देहावरील मोजलेल्या तिळांची, तुला शपथ आहे त्या वेचल्या तारकांची, आमच्या समवेत प्रणयधुंद अवस्थेत जागणार्‍या शेजेवरील फुलांची. तू नाही म्हणू नकोस. या पहाटेला मिठी सोडवून घेऊ नकोस. या विवस्त्र देहावर पांघरूणही घेऊ नकोस. पांघरायचेच असेल तर मला लपेटून घे. प्रत्येक पहाट अशीच यावी. पहाटे पहाटे आपल्याला अशीच जाग यावी.


(चित्र सौजन्य इंटरनेट..)

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

‘आय लव्ह यू’, ‘आय डोन्ट’


सखे, आपण अनेक वाक्यं फारच सहज उच्चारत असतो. त्याच्यामागे असलेल्या अर्थाशी आपण प्रामाणिक असतोच असं नाही. अनेकदा तो अर्थ आपल्याला माहीतही नसतो. तरीही आपण अर्थाशिवाय वाक्य उच्चारतो आणि अर्थाशिवाय ऐकतो. आश्‍चर्य वाटलं ना. आता प्रेमाचंच बघ ना! म्हणताना म्हणतो आपण, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ खरंच असतं का आपलं प्रेम? की आपण सवयीनं म्हणायचं म्हणून म्हणतो? तुझ्या चेहराच सांगतोय तुला नाही पटलं. ठीक आहे. एक गोष्ट सांगतो, ती ऐक..

फार फार वर्षांपूर्वी एक तरुण एका तरुणीला भेटला. पहिल्या भेटीतच ती त्याला आवडली. ती दिसायला सुंदर होती, तो नव्हता. नंतर पुढे भेटी वाढत गेल्या. त्यांचं जुळलं, यथावकाश लग्नही झालं. मुलंही झाली. प्रत्येकाच्या संसारात अडचणी येतात, सुखाचे क्षण येतात, दु:खाचे क्षण येतात तसेच त्यांच्याही आयुष्यात आले. कुठलाही क्षण स्थिरावला नाही, कायमचा झाला नाही. एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे दोन वाक्यं.  


तो म्हणायचा आय लव्ह यू

ती म्हणायची आय डोन्ट


सखे, आपण थोडं मागे जाऊ. अगदी सुरुवातीला जेव्हा ती दोघं भेटली तेव्हा. ती नोकरी करायची. त्याचा फिरस्तीचा व्यवसाय होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण, अनेक आडकाठ्या होत्या. त्याच्या नातलगांनी, ‘तुला आणखी कोण मुलगी देणार?’, ‘म्हशीबरोबर लग्न कर’ अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे लग्न करणे ही त्याच्यासाठी फारच महत्त्वाची गोष्ट झाली होती. तिला ती करत असलेली नोकरी सोडायची नव्हती. तिला सांगून येत असलेली स्थळं, लग्नानंतर नोकरी केलेली चालणार नाही अशी अट घालणारी होती. ती दोघंही त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून भेटली. गप्पा झाल्या. लग्नानंतरही नोकरी करण्यास त्याची काहीच हरकत नव्हती. त्यामुळे तिच्यासाठी एक मार्ग मोकळा झाला होता. ती तयार झाली. त्यालाही तिचं तयार होणं हवंच होतं. कारण; 


त्याची ती गरज होती

तिच्यासाठी सोय होती


सखे, त्यांचा संसार सुरू झाला. सुखाचा होता का? माहीत नाही. पण, बहुधा दु:खी नसावा. कारण तो टिकला. त्याला आयुष्यात कुठलीच गोष्ट साधी सरळ मिळाली नव्हती. म्हणजे बघ ना, समजा एखाद्याला दोन अधिक दोन चार एवढं साधं सरळ गणित सुटतं. त्याच्याबाबतीत एक अधिक दोन वजा एक अधिक दोन असं करत करत कसंबसं चार हे उत्तर यायचं. उत्तरही तेव्हा सापडायचं जेव्हा प्रश्‍न निरर्थक झालेला असायचा. तिचं सगळी गणितं व्यवस्थित सुटायची. पण, हे व्यवस्थित सुटणंच तिला नको असायचं. आयुष्य सरळ आणि सोपं झालं तर जगण्यात अर्थच उरणार नाही असं तिला वाटायचं. 


त्याला सुख मिळत नव्हतं

तिला सुख पचत नव्हतं


सखे, परस्पर विरोधी स्वभावामुळे त्यांची कायम भांडणं व्हायची. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ सुखाचा गेला असं कधी झालंच नाही. पण, तरीही तो तिला आय लव्ह यू म्हणायचा आणि ती त्याला आय डोन्ट. आता मला सांग, त्या त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ होता का? असलाच तर त्यांना तो माहिती होता का?

‘तू मला असे विक्रम वेताळ टाइप प्रश्‍न नको विचारूस. हे बरं आहे, कथा सांगायची आणि शेवटी प्रश्‍न विचारायचे. नशीब माझं, चुकीचं उत्तर दिलंस तर डोक्याची शंभर शकले होतील म्हणाला नाहीस.’

सखे, रागावतेस काय अशी? बरं मीच देतो उत्तर. मग तर झालं? शब्द हे अर्थ, भावना पोहोचवण्याचं माध्यम असतात. आपल्याला जे सांगायचं आहे, ते नेमकेपणाने पोहोचवण्याचं काम शब्दांचं. पण, शब्द त्याच गोष्टीचा प्रत्यय देतात ज्याला आकार आहे आणि ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. 

‘झालं, तुझं अगम्य तत्त्वज्ञान सुरू झालं. काही कळत नाही. तू बोलतोस ते.’

सखे, मी साखर हा शब्द उच्चारला तर तुला साखर म्हणजे काय ते कळेल. तू आणूनही दाखवशील. पण, समजा मी म्हणालो, ‘साखर गोड आहे’, तर गोड असणं म्हणजे काय, हे तू सांगू शकशील? जे निर्गुण आणि निराकार आहे, ते शब्दातून व्यक्त करता येत नाही, ही शब्दाची मर्यादा आहे. प्रेम हे निर्गुण निराकार आहे. ते शब्दांतून प्रत्ययाला येत नाही. मग, आपण जे एकसारखं 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' म्हणतो, त्याला अर्थ काय असतो?

‘मला काही कळालं नाही. कळणारही नाही. तुझी फिलॉसॉफी तुझ्याजवळच ठेव. तो आय लव्ह यू म्हणायचा आणि ती आय डोन्ट म्हणायची, त्याचं काय ते सांग.’


तो खोटं बोलत होता

ती खरं बोलत होती