आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ जुलै, २०२२

जीवन क्या है...

सखे, एखादी गोष्ट आपल्याला आत्यंतिक आवडावी, ती मिळावी यासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असावं. पण, ती त्या वेळेस मिळू नये. वेळ निघून गेल्यावर जेव्हा ती मिळावी, तेव्हा तिचं अप्रूप निघून गेलेलं असावं. तेव्हाची आसक्ती खरी म्हणावी की, आजची अनासक्ती खरी म्हणावी? की, दोनही खोटीच? हा संभ्रम, ही जी अवस्था आहे ना, ती माझी गेले दोन दिवस आहे. बरं झालं तू आलीस. कुणाला तरी हे सांगायचंच होतं. अन्यथा वेडा झालो असतो.

‘ऐक सखे, म्हणत मला प्रचंड ऐकवणार्‍या बर्व्यांची ही अवस्था? कसा दिसतो आहेस बघ! सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा, देणारा तू, आज असा गोंधळलेला? पाहवत नाही.’

माझ्या आई! प्रश्न मलाही पडतातच. मी कुणी स्थितप्रज्ञ योगी नव्हे. मलाही दु:ख, वेदना, सुख, न सुटलेले प्रश्न आहेतच की. पोहणार्‍या माणसाला, तो बुडत असलेला पाहून फक्त आठवण करून द्यायची असते की, ‘त्याला पोहता येतं’. त्यावेळेला त्याचे पोहण्याचे क्लास घेत बसायचं नसतं. तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी शोधतो, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तू शोध.

‘ठीक आहे. त्या सुकून गेलेल्या कॉफीच्या मगमधली शिल्लक कॉफी सांगतेय, तिला गार होऊन गेल्याला आता बराच वेळ झालाय. रिकाम्या कपाचेही घुटके नकळत घेणारा तू, एकवेळ मला विसरशील, कॉफी विसरणार नाहीस. जाऊ दे! मस्तपैकी कॉफी करून देते. मग ऐकव काय झालंय ते.’

ठीक आहे सखे, कॉफी करता करता तू जगजित सिंग यांच्या आवाजातलं ‘जीवन क्या है, चलता फिरता एक खिलौना है’ हे सुंदर गीत ऐक. 

‘अरे हे तर तुझ्या त्या खूप आवडत्या ‘सैलाब’ सिरियलमधलं ना?’

हो सखे! परवाच त्या सिरियलचे सगळे एपिसोड एका मित्राने आणून दिले. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायची मला ती. अगदी पहिल्या एपिसोडपासून माझ्या मनाचा कब्जा घेतला होता या सिरियलने. अप्रतिम मांडणी, अप्रतिम पटकथा, अप्रतिम संवाद...

‘आणि अप्रतिम हसणारी रेणुका शहाणे...’

तेवढं बरं लक्षात राहिलं तुझ्या. जाऊ दे! हो, तिच्यासकट सगळंच आवडायचं मला. एकही एपिसोड चुकवायचा नाही असं पहिला एपिसोड पाहिला तेव्हाच ठरवलं होतं. पण, तेव्हा आमच्याकडे टीव्ही होता पण डिश नव्हता. शेजारी राहणार्‍या जिवलग मित्राकडे त्यावेळचा तो मोठ्ठा डिश एन्टेना आणि टीव्ही होता. मी न चुकवता जाऊ लागलो. सिरियल सुरू झाली की, माझं लक्ष कुठेच नसायचं. काही इतर ऐकूही यायचं नाही. पण, जाहिराती लागल्या की, त्यावरच्या टिप्पण्या ऐकू यायच्या. 

आता मित्र म्हटलं की, रुसवे-फुगवे असायचेच. नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण, जोराचं भांडण झालं होतं. मी पुन्हा दारावर पाय ठेवणार नाही, असं सांगून वगैरे बाहेर पडलो असेन बहुधा. घरच्या सगळ्यांना वाटलं होतं की, मी काही आता त्यांच्या घरी पुन्हा पाऊल ठेवणार नाही. पण, त्याला खात्री असावी. मलाही एकेक पायरी चढत जाणं खूप कठीण गेलं. प्रत्येक पायरी ही स्वत:च्या अगतिकतेची चीड आणणारी होती. तरीही मी गेलो, कारण मला ती सीरिअल पाहायची होती. शेवटच्या पायरीवर मला पाहताच मित्र हसला. त्याच्या हसण्यात माझ्या अगतिकतेचा उपहास होता. मी गेलोच नसतो तर कदाचित माझ्या ठाम राहण्याचा त्याला अभिमान वाटला असता. त्याच्या त्या हसण्यामुळे मला रेणुका शहाणेच्या स्मितहास्याचा का कोण जाणे आनंद झाला नाही. कशाचाच झाला नाही. 

तो भाग संपताच मी खाली उतरलो. कुणीतरी माझी वाट पाहत उभे होते. 

‘माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशी मला लग्न करायचं आहे. तू तिच्या प्रेमात आहेस का?’

जिच्यावर माझे प्रेम होते, तिच्याबद्दलच तो विचारत होता. अभावितपणे तोंडातून ‘नाही’, असा शब्द निघून गेला. केवळ मलाच माहीत असलेली ही गोष्ट त्याला कशी समजली, हा विचारही डोक्यात आला नाही.  

‘ही तीच मुलगी ना जिचं स्मितहास्य तुला फार आवडायचं?’

हो. त्यानंतर मी ती सिरीयल पाहायला पुन्हा कधीच गेलो नाही. इतर प्रसंगी खूपवेळा गेलो. अक्षरश: दर दिवशी गेलो. पण, ज्या दिवशी ती सिरियल लागायची तो दिवस, ती वेळ सोडून गेलो. परवा, एका मित्राने त्याच ‘सैलाब’ सिरियलचे सर्व एपिसोड आणून दिले. ‘दहावा एपिसोड मिळाला नाही’, असेही त्याने सांगितले. पण, तो गेल्यापासून मी एकही एपिसोड पाहिला नाही. 

गतकालातील सुख माणसाला त्याच्या नंतरच्या आयुष्यात दु:ख देतं. ते सुख खरं की, आजचं त्याचंच दु:ख खरं, असं कायम वाटत राहतं. जे पाहण्यासाठी एवढा प्रचंड आटापिटा केला, ते पाहण्याची आज इच्छाच होत नाही. तेव्हा ते उपलब्ध नव्हतं आणि आज सहज उपलब्ध आहे. तरीही ते का नकोसं वाटावं? कुठलं खरं असावं? दोन्ही गोष्टी खर्‍या, प्रामाणिक की, दोन्ही मृगजळासारख्या फक्त भासल्या? 

त्या  एपिसोडमध्ये रोहित शिवानीला सांगतो, 

‘मी एका मृगजळाच्या मागे वेड्यासारखा धावलो. आज ते समोर आलं तेव्हा स्वत:ला थांबवू शकलो नाही.’

त्यावर शिवानी म्हणते,

‘होतं असं रोहित. सुखाशी पुन्हा झालेली भेट दु:ख देते. मनावर ताबा ठेवणं कठीण होतं. मन सुखदु:खाच्या मागे वेड्या घोड्यासारखं मिळेल त्या दिशेने धावत राहतं. आयुष्य तसं असत नाही. त्याला नियम असतात.’

सखे, आयुष्यात आपल्याला  हवं ते, हवं तेव्हा, हवं तेवढं कधीच मिळत नाही. ते मिळावं हे जसं आयुष्य आहे, तसंच ते मिळू नये हेसुद्धा आयुष्यच आहे. 

हा प्रसंग असलेला एपिसोड त्या सिरियलचा मी पाहिलेला शेवटचा एपिसोड होता आणि त्यात शेवटी जे गाणं होतं, तेच तू आत्ता ऐकलंस.

‘जीवन क्या है....’

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

आनेवाला पल जानेवाला है...


सखे, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा जगण्यासाठीच असतो. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो क्षण, त्या क्षणीच जगायचा असतो. तो येण्याआधी त्याला जगणे हे दिवास्वप्न आहे आणि तो निघून गेल्यानंतर आपल्यासाठी तो स्वप्न म्हणून आठवणीत राहतो. आधी आणि नंतर फक्त वंचनाच पदरी येते. त्याला त्या क्षणी जगणारे जगून जातात. 

’प्रत्येक क्षण जगला पाहिजे, हे समजलं. पण, आधीची आणि नंतर होणारी वंचना नाही समजली.’ 

सखे, आपण एकतर भूतकाळात रमतो किंवा भविष्यकाळात. भूतकाळातील घटना कितीही रमणीय असल्या तरी त्या घडून गेलेल्या असतात. भविष्यकाळ असा चांगला असेल, तसा चांगला असेल याच्या कल्पनासुद्धा रमणीय असतात. दोन्ही ठिकाणी मन रमतं. वास्तविक ते वर्तमानकाळात रमलं पाहिजे. ज्यांचं मन केवळ वर्तमानात असतं, त्यांचा गतकाळही संस्मरणीय असतो आणि येणारा काळही. 

’हे खरं आहे की, माणूस बहुतांशी भूतकाळातल्या चांगल्या आठवणींशी आणि भविष्यातील स्वप्नांत गुंग होऊन जातो. पण, असं का घडतं? वर्तमानात फार वेळ का राहता येत नाही?’

सखे, याचं उत्तर कदाचित माझ्याकडेही नाही. मी ते शोधतोय. गेलेले क्षण आणि येणारे क्षण हे फसवे समाधान देणारे असतात. त्यांना ओढून ताणून वर्तमानाशी जोडू लागलो की, आत्मवंचनेशिवाय हाती काहीच लागत नाही. आपण गृहीत धरून चालतो, ’जे आहे ते असंच राहणार आहे’. जे आज मिळत आहे, ते कायम असंच मिळत राहणार आहे. जे आहे ते जाईल, याचा विचारही मनात भीती निर्माण करून जातो. ’जाणं’ सूचित करणारी प्रत्येक गोष्ट माणूस अप्रिय किंवा वाईट ठरवत जातो.  मग तो नाश असो, र्‍हास असो, मृत्यू असो, सवयी घालवणारा नियम असो किंवा प्राण हरण करणारा यम असो. अगदी दक्षिण दिशाही आपण अपवित्र ठरवतो. येणारा क्षण असाच राहणार आहे, तो जाणार नाही, यासारखी दुसरी फसगत नाही. आपण असो किंवा क्षण असो, जाण्यासाठीच येतो. 

सखे, बघ तुझा चेहराही बदलला. चल. तुझा मूड ठीक करण्यासाठी एक छानसं गाणं ऐकवतो. गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. संगीत पंचमदांचं आणि आवाज किशोर कुमार यांचा. ’आनेवाला पल जानेवाला है’ हे गीत तू ऐकलं असशील, तरीही पुन्हा ऐक. खूप सुंदर शब्द आहेत. खूप चांगला विचार आहे. सामान्यत: आपले विचार हे एका मर्यादेपर्यंत जाणारे असतात. त्यापलीकडे जाणं आपल्याला जमत नाही. आपलं आयुष्य म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्राप्त झालेल्या क्षणांचा संचय असतो. आयुष्यात अनेक क्षण घालवणे आपल्याला माहीत असतं, पण एका क्षणात संपूर्ण आयुष्य सामावणं आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असतं. समुद्रात अनेक थेंब आहेत याची कल्पना असते. प्रत्येक थेंबात समुद्र असतो, ही आपल्या कल्पनेपलीकडली गोष्ट असते. 

’तुझं आपलं काहीतरीच. कविकल्पना म्हणून ठीक आहे. पण, एका क्षणात कसं आयुष्य जगता येईल?’

सखे, येणारा क्षण हा शेवटचाच क्षण आहे या आर्ततेने तो क्षण जग. जे सबंध आयुष्य जिवंत राहून मिळालं नाही, ते हा एक क्षण जगण्यानं मिळून जाईल. अगदीच फिल्मी भाषेत सांगायचं तर, ’बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही.’ हे बघ. आता कशी हसलीस!  एका क्षणात सबंध आयुष्य जगता येईल, असा क्षणच आयुष्याचं सोनं करून जातो. आपल्या आयुष्याचं सोनं करून जाणारा तो क्षण नेमका त्यावेळी पकडता येत नाही, सांगता येत नाही आणि धरूनही ठेवता येत नाही. 

एकदा एका वाटसरूला एका निर्जन स्थळी एक म्हातारा दिसतो. म्हातार्‍याच्या पाठंगुळीला सोन्याच्या सळ्यांची मोळी असते. एका हातात लोखंडाचा लहानसा तुकडा घेऊन तो म्हातारा मिळेल तो दगड त्या तुकड्याला लावून पाहतो व फेकून देतो. त्याला वाकवत नसतं, चालवत नसतं. तरीही तो म्हातारा कसातरी कण्हत, कुढत पुन्हा पुन्हा दगड उचलून लोखंड्याच्या तुकड्याला लावून पाहत असतो व फेकून देत असतो. वाटसरूला मोठं आश्‍चर्य वाटतं. हा वयोवृद्ध माणूस पाठीवर सोन्याच्या सळ्यांची मोळी वागवीत, हातातल्या लोखंडाला दगड का लावतो? वाटसरू त्याला थांबवतो आणि विचारतो, ’आजोबा, तुम्ही हे काय करता आहात?’ 

’मी परीस शोधतोय’

’परीस म्हणजे तोच दगड ना जो लोखंडाला सोनं करतो तो? तुमच्या पाठीवर तर सोन्याची मोळी आहे. मग, एवढ्याशा लोखंडाच्या तुकड्याला सोनं करायच्या मागे का लागला आहात?’

म्हातारबुवा विषण्ण हसतो.

’मुला मी तरुणपणी पाठीवर लोखंडाचा भरा घेऊन बाहेर पडलो होतो. परिसाच्या शोधात. मिळेल तो दगड उचलायचो आणि पाठीवरच्या लोखंडाला लावायचो. लोखंडाचं सोनं झालं नाही हे पाहून निराशेने दगड टाकून द्यायचो. लोखंडाला दगड लावून तो टाकून द्यायची इतकी सवय झाली होती, की पाठीवरल्या लोखंडाचं सोनं कधी झालं हे कळलंच नाही.’

सखे, आपल्या वाट्याला येणारा क्षणही असाच कधीतरी आपल्या आयुष्याचं सोनं करून गेलेला असतो. त्याला धरून ठेवता येत नाही. येणारा क्षण जाणाराच असतो. मग तो दु:खाचा असो किंवा सुखाचा. येणारा प्रत्येक क्षण एक हुरहुर मात्र कायम देऊन जातो. क्षण दु:खाचे असतील तर सुखाची हुरहुर आणि क्षण सुखाचे असतील तर ते धरून ठेवता आले नाहीत, याची हुरहुर.

सखे, क्षण हे फुलपाखरासारखे असतात. आपण त्यांना चिमटीत धरायला जावं तर ते उडून जातात. जाताना आपल्या बोटांना रंग लावून जातात. निसटलेल्या फुलपाखरावर भाळायचं की बोटांना न कळत चिकटलेल्या रंगांना आपल्या अंतरंगात सांभाळायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. क्षणावर भाळणारी माणसं त्याच्यामागे पळतात. क्षण सांभाळणारी माणसं स्थिर असतात. कारण, त्यांना माहीत असतं, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा जगण्यासाठीच असतो.