रंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मानसीचा चित्रकार तो...




सखे, चित्र काढायला काय काय लागतं?

‘असा काय लहान मुलांना विचारल्यासारख प्रश्न मला विचारतोस? माझी फिरकी घ्यायची आहे का? चित्र काढायला पेन्सिल, कॅनव्हास आणि रंग लागतो.’

बस एवढंच?

‘हो! आणखी काय लागणार?’ 

सखे, चित्र म्हणजे काय? घाबरू नकोस. प्रश्नोत्तरांचा तास सुरू नाही करत. असे प्रश्न मला अनेकदा पडतात. अनेकांना विचारतोही. वेगवेगळी उत्तरे मिळतात. कुणी म्हणतं अनेक कलांपैकी एक कला आहे, तर कुणी म्हणतं कागदावर मारलेल्या रेघोट्या. ही केवळ उत्तरं नाहीत, हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. गणित आणि कला ही एकाच प्रवाहाची दोन टोकं आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गणितच असतं. हे गणित जमू लागलं की त्याची कला होते. गणित सोडवणं किचकट असतं, कलेचा आविष्कार मनमोहक असतो. गणितं सोडवणार्‍याला चित्रापलीकडे असलेली कला पाहता येते. गणितातच अडकून पडलेल्यांसाठी त्या रेघोट्याच असतात.

सखे, अनेक वर्षांपूर्वी दीनानाथ दलालांचे चित्रप्रदर्शन पाहायला सेंट्रल लायब्ररीत गेलो होतो. तेव्हा, प्रत्येक चित्रासमोर स्तब्ध झालो. माझ्यामागून चित्र पाहून जाणार्‍यांचे चेहरे, ’काय यडपटासारखा बघत राहिला आहे?’ असं न बोलताही बोलून जायचे. दलालांच्या चित्रातली रेषन रेष बोलकी असते. प्रत्येक रंग आपला वेगळाच रंग दाखवत असतात. आपण जे पाहतो ते चित्र नसतच. आपल्याच भावभावना आपण पाहत असतो. चित्रामध्ये दिसणारी ’ती’, दलालांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेली चित्रवती नसते, ती तर आपलीच सखी असते.  प्रत्येक चित्रामध्ये तू दिसू लागल्यानंतर मी वेड्यासारखा स्तब्ध होणार नाही तर आणखी काय होणार? 

‘पुरे हां! तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, हे दाखवायची एकही संधी सोडू नकोस.’

सखे, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही मी असाच स्तब्ध झालो होतो. तो क्षण आजही जसाच्या तसाच मनावर रेंगाळला आहे. पी. सावळारामांचं एक गीत ऐकलं की तो क्षणही मनमोहक होतो. ’मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो’ हे गीत तू नक्की ऐक. हे गीत लिहिलंय सावळ्या रामाची उपाधी लाभलेल्या निवृत्तीनाथानेे, त्याला संगीत दिलं आहे वसंत प्रभूंनी आणि मखमली गळ्यातून उतरवलं आहे हृदयाच्या नाथाने. असा त्रिवेणी संगम नियती नावाच्या विचित्रकारालाही क्वचितच जमतो. 

सखे, या गीतामध्ये एक गंमत आहे. सकाळ, संध्याकाळ आणि रात्र अशा तीन वेळा या गाण्यातून रेखाटल्या आहेत. रणरणती दुपार मात्र कवीने टाळली आहे. ही पोळून काढणारी दुपार कदाचित आयुष्याचा कॅनव्हास असावा ज्यावर हे तीन काळ आपले रंग, रूप दाखवून जातात. 

सखे, माझा एक चित्रकार मित्र आहे. अप्रतिम चित्रे काढतो. तो एकदा प्रेमात पडला. मग काय विचारता? प्रत्येक चित्र प्रेयसीचेच काढू लागला. ती कठड्यावर हात ठेवून उभी आहे आणि निसर्गसौंदर्य पाहते, हे चित्र त्यानं इतकं सुंदर काढलं होतं की, मलाही ते फार आवडलं. विचारलं त्याला, हा वेडेपणा का करतोस. तो म्हणाला, दुसरं काही सुचतंच नाही, तिच्याशिवाय कुंचल्यातून कुणीच कॅनव्हासवर साकारत नाही. त्याची प्रेयसी मात्र व्यवहारी निघाली. एका श्रीमंताशी लग्न ठरलं, तेव्हा बोलेनाशीच झाली. त्याचा फोनही घेईनाशी झाली. तो चित्र काढेल म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवर स्वत:चे फोटोही ठेवणे तिने बंद केले. त्याला भेटणे तिने बंद केले. ती त्याला टाळू लागली.  अर्थात पुढे जे व्हायचं तेच झालं. 

तिचं लग्न झाल्यानंतर सहज एकदा मित्राला भेटायला गेलो. त्याच्या प्रेयसीचं त्यानं काढलेलं जे चित्र मला आवडलं होतं तेच तो पुन्हा चितारत होता. तोच निसर्ग होता, तोच कठडाही होता. फक्त त्यात कठड्यावर हात ठेवून उभी असलेली प्रेयसी नव्हती. विचारलं त्याला, चित्रात ती का नाही? तो एवढंच म्हणाला, चित्रातून तिला दूर करणं सोपं होतं, मनातून कसं दूर करू? त्याच्या मनाच्या कॅनव्हासवरून तिच्या स्मरणाचं चांदणं काही केल्या सरतच नव्हतं. त्याच्या मानसीचा चित्रकार तिचंच चित्र काढत होता आणि माझा मित्र तिचं चित्र काढत नव्हता, कुठलंंच चित्र काढत नव्हता. ही अवस्था म्हणजेच त्या गाण्यात टाळलेली टळटळीत दुपार. 

सखे, तिची भेट त्याच्यासाठी पहाटेचे रंग भरणारी निळी मोहिनीच होती. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत विरह देणारी संध्याकाळही मोहकच होती. नक्षत्रांचा निळा चांदवा झरवणारी रात्रही स्वप्नवत होती. पण, ती सोडून गेल्यानंतर पुन्हा कधीच, काहीच रम्य राहिलं नाही. त्याला चित्र काढणं त्यानंतर जमलंच नाही कधी. का माहिती आहे? 

‘का?’

सखे, त्याच्याकडे कॅनव्हास होता, पेन्सिल होती, रंग होते. फक्त अंतरंग नव्हते.