तसं का वागली? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तसं का वागली? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

ती असं का वागली?

स्त्री, पुरुषाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जवळ येऊ देते. अनेकदा तिच्या स्वैर वागण्यातून पुरुष भलतेच अर्थ काढून मोकळा होतो. वास्तविक वर्तुळबाह्य पुरुषाशी स्त्रीचं लाघवी बोलणं, मधाळ हसणं हे सोयीपुरतं, गरजेपुरतं असतं. ती गरज संपली की, स्त्री वर्तुळबाह्य पुरुषाला लगेच ’जागा’ दाखवून देते.



’ती असं का वागली?’

हा त्याचा प्रश्‍न माझ्या मनात बरेच दिवस घोळत होता. त्रास देत होता. सखे, दु:ख त्रासदायक असतं. पण, त्या दु:खाचं कारण न समजणं त्याहूनही जास्त त्रासदायक असतं. झालं असं की माझ्या मित्राने त्याच्या मैत्रिणीचं एक काम करून दिलं. तिनच त्याला ते सांगितलं होतं. त्या कामासंदर्भातच त्यानं तिला बोलावलं. पण ती आली नाही. सवड नसेल, असं म्हणून तो गप्प बसला. परंतु, असं चार पाच वेळा घडलं, तेव्हा त्याला त्याचं दु:ख झालं. यथावकाश त्या कामातल्या अडचणी दूर सारून त्यानं कामही करून दिलं. त्याने परहस्ते ते काम पाठवूनही दिलं. तिने मेसेज पाठवून त्याचे धन्यवाद मानले. केलेल्या कामाचे पैसेही देण्याबद्दल सांगितलं. काम करणे, कामाबद्दलच्या पैशांची देवाणघेवाण हा व्यवहार होता. त्याला दु:ख झालं ते तिच्या न येण्याचं. त्यानं मला त्या दु:खावर शेरही ऐकवला;

हो गया हिसाब पाई पाई का बाकी न आना रह गया

न रही उम्मीदें जिंदगीसे बस तेरा न आना रह गया

त्यानं ’आना‘ हा एकच शब्द ’आणे‘ आणि ’येणे’ या अर्थाने वापरणं मला आवडलं. त्यामागचं दु:ख जाणवलं. ’ती असं का वागली?’ हा त्याचा प्रश्‍न खूप त्रास देऊन गेला. आपल्याला माहीत असलेलं दु:खाचं कारण इतरांच्या अनुभवास आलेलं असलं तरीही त्रास देऊन जातं. 

सखे, तू सुद्धा अशी जेव्हा रुसून जातेस तेव्हा मला त्रास होतो. कधी कधी येतेस बोलावल्यावर. पण, इतक्या लवकर निघून जातेस, की असं वाटतं न आली असतीस तरी चाललं असतं. तुझं येऊन लवकर निघून जाणं, तुझ्या न येण्यापेक्षाही जास्त त्रास देतं. बघ, आला ना राग? खरं सांगितलं की माणसाला राग येतो. लटकं सांगितलं की लगेच पटतं. तुझा राग घालवण्यासाठी एक गझल ऐकवतो. ’ले चला जान मेरी’ ही गझल लाइव्ह ऐकण्यात खूप मजा आहे. यातल्या अनेक जागा  

गुलाम अली अशा काही खुलवतात की दु:खही सुख देऊन जातं. हीच गझल मी अबिदा परवीन यांच्या आवाजातही ऐकली आहे. पण, ती ध्वनिमुद्रित होती. 

सखे, किती रागावशील? ही गझल ऐक. फणकार्‍याने मान वळवल्यानंतर तुझ्या बटा वार्‍यावर अधिकच उडू लागतात. त्या इतक्या अस्वस्थ का आहेत? डोळे न वळवताही डोळ्यांच्या कोपर्‍यातून नको ना पाहूस. बहुतेक, तू हृदय तोडलेल्या कुठल्यातरी प्रियकराच्या आठवणीने त्या बटा व्याकूळ झाल्या असाव्यात. कित्ती हा राग? तू रागावून पाहिलंस आणि डोळ्यासमोर वीज चमकली बघ माझ्या. अगं गंमत केली तुझी. तुझ्या केसांच्या बटा प्रियकराच्या आठवणीने नाहीत तर वार्‍यामुळे अस्वस्थ आहेत, हे मला पक्कं माहीत आहे. सोड ना हा रुसवा हे रागावणं. 

सखे, मला माहिती आहे तुला उत्सुकता त्या मित्राची ती मैत्रीण असं का वागली, हे जाणून घेण्याची. कारणं अनेक असू शकतात. देता येण्यासारखी आणि देता न येण्यासारखीही. तू नाही का, यायचं तुझ्या मनात असलं की केव्हाही, कधीही बिनधास्त येतेस. नसेल यायचं, तर मग हजारो कारणं. पटणारी, न पटणारी. ती का आली नाही, हे तिचं तिलाच ठाऊक. 

सखे, माणसाला माणसं हवी असतात. बरेचदा ती काही कारणपरत्वे असतात. एखादी गरज, एखादे कार्य होईपुरतीच त्यांची आवश्यकता असते. त्यापेक्षा अधिक ती नको असतात. प्रत्येक माणूस स्वत:भोवती अनेक वर्तुळं आखून घेत असतो. अगदी आतल्या वर्तुळात तो स्वत:लाच ठेवत असतो. इतर कुणीही त्याला नकोसं असतं. यालाच साहेबाच्या भाषेत ’प्रायव्हेट स्पेस’ म्हणतात. यानंतरच्या वर्तुळात अगदी जवळची नाती आईवडील, नवराबायको, मुलं येतात. त्यानंतरच्या वर्तुळात मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, सगे सोयरे असतात. त्याही बाहेरील वर्तुळात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असणारे सहयोगी असतात. अशी असंख्य वर्तुळे बदलत्या प्राधान्यक्रमाने असतात. ही वर्तुळे अंतर ठेवण्यासाठी, दाखवून देण्यासाठी असतात. 

सखे, मला आवडलेली गाणी अनेकांना मेल करण्याची सवय आहे. काही माणसं प्रतिसाद देतात. आपल्याला आवडलेल्या जागा, त्या गाण्याबद्दलचे अनुभवही शेअर करतात. सुरुवातीला प्रतिसाद आला नाही की, मला प्रचंड त्रास व्हायचा. एरव्ही इतरांशी प्रचंड बोलकी असणारी माणसं आपल्याशी दुर्मुखलेली का वागतात? असा प्रश्‍न पडायचा. आपल्याबद्दल त्यांच्या मनात काही गैरसमज तर नाही ना, हा विचार छळून जायचा. मी गाणी पाठवण्यामागे त्यांनी भलताच हेतू चिकटवला नसेल ना, असही वाटायचं. मित्राला सांगितलेल्या विनोदावर तो पोटशूळ असल्यासारखा चेहरा करायचा. तोच विनोद त्याला दुसर्‍या कुणी ऐकवला की, पोट धरून हसायचा. विनोद वाईट नसतो, सांगणाराही चुकीचा नसतो. फक्त तो हव्या असलेल्या वर्तुळातला नसतो. चौकोनी कुटुंबात ही आखलेली वर्तुळे स्पष्ट दिसतात. त्यावर उभारलेल्या अदृश्य परंतु अभेद्य भिंती प्रचंड छळतात. नवरा बायकोमध्येही ही वैयक्तिक वर्तुळे असतात. त्या जागेमध्ये नवर्‍यानं किंवा बायकोनं किती आत शिरायचं याचे वज्रलेपित ठोकताळे असतात. आपल्या माणसाला जपण्याऐवजी ही ‘प्रायव्हेट स्पेस’ जपली जाते. 

सखे, स्त्री, पुरुषाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जवळ येऊ देते. अनेकदा तिच्या स्वैर वागण्यातून पुरुष भलतेच अर्थ काढून मोकळा होतो. वास्तविक वर्तुळबाह्य पुरुषाशी स्त्रीचं लाघवी बोलणं, मधाळ हसणं हे सोयीपुरतं, गरजेपुरतं असतं. ती गरज संपली की, स्त्री वर्तुळबाह्य पुरुषाला लगेच ’जागा’ दाखवून देते. 

'प्रत्येक खेपेला स्त्रीच्या असं वर्तुळं आखून वागण्यामागे गरज किंवा स्वार्थच असतो, असं तुला म्हणायचं आहे का?'

सखे, तू अशी लगेच पर्सनली घेऊन भांडू नकोस ना. तिला तिच्या सुरक्षिततेसाठी तसं वागणं अपरिहार्य असतं, हे मान्यच आहे. त्याबद्दल वादच नाही. पण, जशी प्रत्येक स्त्री स्वार्थी नसते, त्याप्रमाणेच प्रत्येक पुरुष ’त्याच’ अर्थाने स्त्रीकडे पाहतो, असा पूर्वग्रह बाळगणेही चुकीचेच नाही का? त्याचा त्रास संवेदनशील माणसाला होतो. 

'म्हणजे तू असं म्हणतोस की, स्त्रीने वर्तुळे आखणे ही स्त्रीचीच चूक आहे? समजा तिने अशी वर्तुळे आखलीच नाहीत तर त्याचा गैरफायदा पुरुष घेणारच नाही याची काय गॅरंटी? तू एक पुरुष आहेस, म्हणून तुझा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तसाच आहे. एकदा स्त्रीच्या दृष्टिकोनातून स्त्रीकडे पाहा. म्हणजे मग कळेल.'

अरे देवा! तुझा माझ्याशी भांडायचा मूड आहे का? सखे, तू म्हणतेस तसेही असेल कदाचित. मी पुरुष असल्याने स्त्रीच्या भावना मला कळत नसाव्यात. मी जे म्हणतोय त्याचं तू सार्वत्रिकरण नको करूस. सगळ्याच स्त्रिया व सगळेच पुरुष तसेच असतात असे म्हणणे योग्य नाही. सर्वस्व बहाल करून बसलेल्या स्त्रीला जसा प्रतारणेचा त्रास होतो, त्याहीपेक्षा जास्त त्रास, स्त्रीने ही वर्तुळे आखून वापर करून घेतल्यामुळे एखाद्या पुरुषाला होतो. 

सखे, या वर्तुळांचा त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण त्या व्यक्तीमध्ये भावनेने गुंतलेले असतो. निखळ मैत्री हवी  असलेली माझ्यासारखी माणसं, या वर्तुळांकित वागण्याने प्रचंड दुखावली जातात. आपुलकीच्या आडून साधला जाणारा स्वार्थ छळतो. आपला वापर झालाय ही भावना बोचते. सेवा पुरवणे, विक्री करणे हा ज्यांच्या व्यापाराचा भाग असतो, त्यांना या आपुलकीशी काही देणंघेणं नसतं.  समोरच्याने कितीही सलगी, आपुलकी दाखवली तरीही आपला फायदा व्यापारी सोडत नाही. आखलेली वर्तुळं स्वत:च्या स्वार्थासाठी  भेदून पुढे होणारी माणसं, दुसरा माणूस त्या वर्तुळात येऊ लागला की जागी होऊन त्याला ’जागा’ दाखवतात. अशा ’वापरून’ घेणार्‍या माणसांपेक्षा ’व्यापारी’ खूप चांगला. 

सखे, मित्राला त्रास झाला कारण त्यानं निखळ मैत्रीची अपेक्षा ठेवली. तिच्या येण्याची अपेक्षा ठेवली. त्याला बोचणी आहे, ती तिच्या न  येण्यापेक्षाही, तिने न येऊन दाखवून दिलेल्या, तिच्या आयुष्यातल्या  त्याच्या स्थानाबद्दलची आहे. ज्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात खूप स्थान देतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्यासाठी जागाच नसल्याचं ते दु:ख आहे.  आपल्या भावना अव्यक्त, निरपेक्ष ठेवाव्या. त्या व्यक्त केल्या किंवा समोरच्या व्यक्तीकडून भावना समजण्याच्या अपेक्षा ठेवल्या की, एक प्रश्‍न आपल्याला कायम छळतो;

’ती असं का वागली?’