रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

कार्पे डिअम

‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे.

‘शरीराशिवाय एखाद्या व्यक्तीला भेटणं प्रत्यक्षात शक्य आहे का रे? अरे मी आज एक चित्रपट पाहिला, ‘जस्ट लाइक हेवन’. खरंच असं घडू शकतं का रे आयुष्यात?  तू पाहिला आहेस का तो? ’

सखे, शांत हो, धाप लागली आहे बघ तुला. येता येता किती प्रश्न विचारशील? ‘कधी एकदा विचारेन’ अशी अवस्था होते तुझी हे माहीत आहे. पण, थोडा धीर धर.  बैस तरी आधी. आणि हो, पाहिलाय तो चित्रपट मी.

‘कोमामध्ये असलेली नायिका त्याला प्रत्यक्षात भेटते, इतरांना दिसत नाही, फक्त त्याला दिसते. ती भूत नसते, पण तरीही त्याला भेटते, बोलते आणि तो तिला कोमातून बाहेर आणतो वगैरे. हे सगळं खरंच असं घडतं? जे दिसतं त्या पलीकडेही काही असणं शक्य आहे का? सरळ, सोपं सांग. तुझं ते पुनर्जन्म, ब्रह्म सत्य वगैरे तत्त्वज्ञान नको सांगूस. डोक्यावरून जातं..’

सखे, आपलंच दर्शन, तत्त्वज्ञान, ओव्या आणि चक्क शिव्याही इंग्रजीतून ऐकल्या की, लाखमोलाच्या वाटतात. जाऊ दे. जमेल तेवढं सोपं सांगायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या कुठल्याच क्षणाशी स्वत:ला जोडत नाही. वास्तविक योग म्हणजे तेच आहे, ‘जोडले जाणे’.

‘ए! सोप्या मराठीत सांग..’ 

अरे देवा! आपण आयुष्यातील कुठल्याच गोष्टीशी कनेक्ट होत नाही. आयुष्य जगत नाही, ते फक्त ढकलत राहतो. 

‘असं कसं म्हणतोस? प्रत्येकाला आपली कुठली ना कुठली गोष्ट आवडत असतेच. ती गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. मग, कनेक्ट असल्याशिवाय हे कसं शक्य आहे? आज आपण सगळ्या जगाशी कनेक्टेड आहोत. वी लिव्ह ऑल द टाइम, एव्हरी सेकंड.’

सखे, थोडासा फरक आहे. आपण क्षणापुरते जगतो, प्रत्येक क्षण जगत नाही. आपलं कनेक्टेड असणं तेवढ्यापुरतं प्रामाणिक असतं. त्यानंतर आपल्या आत त्याची साधी जाणीवही नसते. आता तुझंच पाहा, तू कायम सोशल मीडिया, मोबाइल यावर अ‍ॅक्टिव्ह असतेस. पण, त्यातील किती माणसांना तू प्रत्यक्ष भेटली आहेस? त्यांच्याशी प्रत्यक्षात गप्पा मारल्या आहेस? अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच माणसांना तू प्रत्यक्षात ओळखतेस. 

सखे, आभासी जगणं आणि प्रत्यक्षात जगणं यात फरक आहे. माझा दादा, त्याने फुलवलेल्या प्रत्येक झाडाला स्पर्श करतो. त्या फुलांशी बोलतो. त्याला व्यवहारातलं काही कळत नाही, पण हे फुलांचं जग समजतं. डॉक्टरी भाषेत त्याला ‘बॉर्डरलाइन आयक्यू असलेला’ म्हणतात आणि सामान्य भाषेत वेडा. त्याच्या डोक्याला जन्मत: चिमटा लागला नसता, तर तो कदाचित फुलं, झाडं यात एखादा तज्ज्ञ, शास्त्रज्ञ झाला असता. तो फक्त त्यांच्याशी कनेक्टेड आहे आणि इतर सगळ्या गोष्टींशी डिसकनेक्टेड आहे, म्हणून तो सब-नॉर्मल गणला जातो. आपण कुठल्याच गोष्टीशी कनेक्टेड नसतो, म्हणून आपण स्वत:ला नॉर्मल, सोशल वगैरे समजतो.

सखे, पाहुणे घरी आले की, तू खोलीत पळतेस. आईवडिलांसाठी आलेल्या फोनवर त्या व्यक्तीशी बोलून, विचारपूस करून तो त्यांना देण्याऐवजी तसाच देतेस. त्यांच्याशी बोलणेही टाळतेस. असं नाही की, तू बोलत नाहीस किंवा तुला बोलायला आवडत नाही. आवडत्या मैत्रिणीशी तासन्तास बोलतेस. चॅट करतेस.

‘ती फार बोअर करतात रे. मला नाही आवडत त्यांच्याशी कनेक्ट व्हायला.’

सखे, तरीही कनेक्ट हो. नको असलेल्या नातलगांशीही दोन मिनिटे बोलल्याने काही फरक पडत नाही. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीचीच असते असं नाही. पण, तरीही ती जीव लावून करावी. साधं टेबल आवरणं असो की, आपले कपडे हँगरला लावणं असो, त्यावर जीव जडवावा. सजीव नसलेलीही वस्तू आपल्याशी संवाद साधते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रत्यक्षात कनेक्टेड राहा. आजकाल जेव्हा कधी हॉटेलमध्ये जातो तेव्हा पलीकडच्या टेबलवर बसलेलं चौकोनी कुटुंब पाहून चकित होतो. प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो, प्रत्येक जण त्यात गुंग असतो. आपल्याच समोर किंवा बाजूला बसलेल्या कुटुंबातील व्यक्तीकडे मात्र पाहत नाही, बोलत नाही. एकत्र जेवावं, बोलावं, सुख दु:ख शेअर करावं असंही कुणाला वाटत नाही. आपण आपल्या माणसांना भेटत नाही, इतकंच कशाला आपण आपल्यालाही भेटत नाही. 

सखे, विरह, दुरावा जाणवण्यासाठी गुंतावंच लागतं. मीलन म्हणजे काय, हे समजण्यासाठी विरह सहन करावाच लागतो. तुला हवी ती माणसं भेटण्यासाठी त्यांच्यासोबत, त्यांच्याशिवाय त्यांचं व्हावं लागतं. आपल्याला हवं असतं, योग्य असतं ते सगळं आपल्याला मिळतं. फक्त आपण त्यात त्या आर्ततेने गुंतावं लागतं, जगावं लागतं. कनेक्ट होणं, गुंतणं म्हटलं की आपण त्याला शारीरिक पातळीवर घेतो. नवराबायको एकमेकांसोबत राहतात, जगत नाहीत. प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगणार्‍या जोडप्यांच्या मनात एकाच वेळी तोच विचार सहजपणे येतो. न सांगताही एकमेकांना समजतं. यालाच आपल्याकडे ‘सखा सप्तपदी भव’ असं म्हटलं आहे.

सखे, ‘जस्ट लाइक हेवन’ या चित्रपटात ती त्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि तो तिला, म्हणूनच ती कोमात जाऊनही एकमेकांना भेटतात. हा चित्रपट ज्या फ्रेंच कादंबरीवर बेतला आहे, त्या ‘इफ ओन्ली इट वर ट्रू (इंग्रजी भाषांतर) त्यात एक संकल्पना आहे, ती फार महत्त्वाची आहे. लॅटिन भाषेत त्याला ‘कार्पे डिअम’ असं म्हणतात. ‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे. 



चित्र : श्रिया प्रसन्न बर्वे


मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

काय उत्तर देऊ तूच सांग...

पूजाने लिफाफा आणून दिला आणि तंद्री भंगली. लिफाफ्यावर माझं नाव लिहिलं होतं, वर्तमानपत्राचा पत्ता होता. त्या अक्षरात माझं नाव आणि पत्ता वाचताना माझे डोळे भरून आले. ते अक्षर माझ्या सवयीचं होतं. व्हॉट्सअ‍ॅप व एफबीच्या जमान्यात स्वहस्ते मला पत्र लिहील आणि तेही ती? का? आयुष्यातून सहज वजा करताना जिला जराही काही वाटलं नाही, तिला पत्र लिहावसं का वाटावं?

सखे, बराचवेळ मी तो लिफाफा हाती घेऊन तसाच बसून होतो. वॉशरूममध्ये जाऊन गरम पाणी चेहर्‍यावर मारले. कॉफीचा कप भरला. एक दोन घोट प्यायल्यावर बरं वाटलं. लिफाफा फोडला. क्लासमेट वहीच्या फाडलेल्या कागदावर पहिलाच शब्द होता, ’सख्या‘. पत्रातलं अक्षर तिचं नव्हतं. कदाचित कुणाकडून लिहून घेतलं असावं किंवा स्वत:च डाव्या हाताने लिहिलं असावं. पुढं लिहिलं होतं;

’ओळखलंस मला? तू मला ओळखणार नाहीस, असं होऊच नाही शकत. खरं तर कधी कधी वाटतं की, मला तू माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस!! बरं ते सोड. तू कसायस? आणि तुझं काम कसं चाललंय? हल्ली काहीही वाचायला लागले की, तुझी आठवण होते. तू बोलता बोलता पुस्तकातल्या चार ओळी सणसणीत ठेवून देतोस, ते आठवतं. गेल्या काही दिवसांत स्वत:साठी असं काही लिहिलंच नव्हतं. तर आता म्हटलं तुझ्यापासूनच सुरुवात करूयात. आपण नेहमी पैलतीरावर राहतो आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी निरखत राहतो. आपल्याला वाटतं की, जे पलीकडे आहे, ‘तेवढंसं’ आकर्षक नाही. आणि त्याची किंमत आपल्याला किनार्‍यापेक्षा कमीच. पलीकडच्या लोकांनासुद्धा आपल्याविषयी तसंच वाटत असतं बहुधा!! पण हे ऐलतीर आणि पैलतीर एकमेकांचेच रिजेक्टेड सोल्स (नाकारलेले आत्मे) असतात. त्यांना जसंच्या तसं स्वीकारलं नाही की, जगणं कठीण होऊन बसतं!! असो. जास्त लिहायची सवय नाहीये. तुला सगळं माहीत असतंच. त्यामुळे जास्त सांगण्यात काहीच अर्थ नाही. तू क्षणात समजून घेशील. अक्षर खराब आहे. चालवून घे. चालवून घेत आलायस!! उत्तराची वाट बघेन!! मुद्दाम लिही!! माणसं जपता येतील की नाही माहीत नाही. निदान पत्र तरी जपायचा प्रयत्न करेन!!

तुझीच

कुणी लिहिलं आहे ते तुला एव्हाना कळलं असेलच

(उत्तर लिही बरं का!!)’

सखे, ती आयुष्यात आली तेव्हा माझं लग्न झालं होतं. पण, तरीही मी तिच्यात गुंतत गेलो. शारीरिक दृष्ट्या नव्हे, मनाने. काही माणसांचं व्यक्तिमत्त्वच असं असतं की, आपण आपल्याही  नकळत त्यांच्यात गुंतत जातो. हे गुंतणं जेवढं जास्त, तेवढाच त्यातून बाहेर निघताना त्रास होतो. कधी कधी निघणं जमतंच नाही. मलाही आजपर्यंत जमलं नाही. यापुढेही जमणार नाही. काही गोष्टी स्वत:बरोबरच संपण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. असो!

सखे, माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले क्षण कुठले म्हणशील तर ते जे मी तिच्यासोबत घालवले. ती होतीच तशी. झोकून देणारी. माझी अशी कुठलीच गोष्ट नव्हती, जी तिला माहीत नव्हती. तिला सगळं सांगायचो. तिच्यापासून काही लपवणं, मला जमलंच नाही. हे प्रेम होतं की माहीत नाही. पण, जे काही होतं ते होत गेलं. कुठल्या मुलीने माझ्यामध्ये गुंतावं असं माझ्यात काहीच नव्हतं. ना रूप, ना देहयष्टी, ना बुद्धी, ना कर्तृत्व, ना पैसा. तशातच इतरांना फशी पडण्याचा माझा जन्मजात स्वभाव. मला माणसं ओळखता नाही येत. आई म्हणायची मला, ‘माणसांच्या आहारी जाऊ नकोस.’ मी प्रत्येक माणसांच्या आहारी जात राहिलो, स्वत:चा वापर होऊ देत गेलो.  मैत्री, आपुलकी आणि प्रेम यांच्या आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या व्यवहाराला भुलत गेलो. 

सखे, पतीपत्नीमधील नातं दृढ होण्यासाठी पतीला एक मैत्रीण आणि पत्नीला एक मित्र अवश्य असावा. दोघांच्याहीसाठी ‘सेफ झोन.’ नवरा बायकोचं नातंच अधिकार गाजवण्याचं असतं. प्रेम नसतं असं नव्हे, त्याहीपेक्षा अधिकार प्रबल असतो. सगळ्याच गोष्टी बायको नवर्‍याला आणि नवरा बायकोला सांगू शकत नाही त्याला कारणही हे अधिकाराचं प्राबल्य असतं. मित्राच्या कितीही मैत्रिणी असल्या तरी फरक न पडणार्‍या स्त्रीला, तोच मित्र नवरा झाल्यानंतर त्याची एकही मैत्रीण चालत नाही आणि नवर्‍याला बायकोचा मित्र चालत नाही. समाजही एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या नात्याकडे निर्भेळपणे नाही पाहत. म्हणूनच सांगता न येणारं प्रत्येक नातं, प्रत्येक संबंध कायम ‘अनसेफ’ असतात. 

सखे, कालांतराने तिचं लग्न झालं. ती मला घाबरू लागली. मी तिच्यासाठी कमालीचा ‘अनसेफ’ होत गेलो. आमच्यातलं अंतर वाढत गेलं. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप होतं. पण, आता तिला ऐकायचंच नव्हतं. गप्पा करण्यासाठी तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. ती म्हणाली हे शेवटचं. आता आपण भेटायचं नाही, फोन करायचा नाही. काहीच नाही.  अगदी सहजपणे म्हणाली, झालं गेलं विसरायचं. माझ्या ओठावर जितक्या लवकर हसू उमटतं, त्याहीपेक्षा जलद पापण्यांच्या किनार्‍यावर अश्रूंची गर्दी जमते. त्यांना थांबवत तिला विचारलं, 

‘झालं गेलं असं जे म्हणतेस ते काय होतं? ते प्रेम नव्हतं?’ 

तितक्याच सहजतेने ती म्हणाली, 

‘नव्हतं. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.’

’तुला तुझ्या संसारात अडचणीचं वाटत असेल कदाचित. नको भेटूयात आपण. वाईट नाही वाटणार मला. पण, जे होतं, त्याला तू नव्हतंच असं म्हणतेस त्याचं फार वाईट वाटतं. प्रचंड त्रास होतो.’ हे सांगताना मी स्वत:ला सावरलं, आसवं ओघळलीच. 

तरीही ती तितक्याच सहजपणे पुन्हा एकदा ‘नव्हतंच’ असं म्हणाली आणि त्याहीपेक्षा जास्त सहजपणे निघूनही गेली. त्यानंतर कित्येक दिवसांनी हे पत्र. 

सखे, काय उत्तर देऊ तूच सांग.