मंगळवार, २० मे, २०२५

मरीज ए इश्क का क्या है...

सखे, आपलं प्रेम आणि भक्ती सामान्यत: कशावर तरी आधारलेली असते. प्रिय व्यक्ती किंवा परमेश्वर. आपण कोसळताना प्रिय व्यक्तीने, परमेश्वराने आधार द्यावा, आपल्याला सावरावं, असं आपल्याला वाटतं. प्रेम आणि भक्ती यांची उत्कट अवस्था ही आहे की, या आधाराचीच आवश्यकता राहत नाही. अर्थ, आधार यापलीकडची ही अलौकिक अवस्था असते. लौकिकार्थाने यालाच कदाचित आजारी पडणं म्हणत असावेत.
सखे, गेले तीन चार महिने आजारपणामुळे झोपून काढले. डॉक्टरी आदेशावरून आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता. लहानपणी आम्हांला ‘आजारी पडण्याचे प्रयोग’ नावाचा एक धडा होता. आजारी माणसाची केली जाणारी सेवा, घेतली जाणारी काळजी याने भारावलेला एक मुलगा आजारी पडण्यासाठी खटपटी करतो, असं काहीसं ते चित्रण होतं, ते सहज आठवून गेलं. पडल्या पडल्या काय काय नाही आठवलं ते विचार. अगदी जन्म मृत्यूपासून सगळं आठवलं. आपल्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्यासाठी माणसाला आजारी तरी पडावं लागतं किंवा प्रेमात तरी पडावं लागतं. प्रेमात आजारी पडणाऱ्यांची तऱ्हा तर याहून फारच निराळी होते. केवळ जगणंच नव्हे तर मृत्यूही हवाहवासा वाटू लागतो.

सखे, मृत्यू या विषयावर आपण बोलणं सहसा टाळतो. मला माहिती आहे, तुलाही तो विषय अजिबात आवडत नाही. अटळ, निश्चित गोष्टींचा उल्लेख टाळला म्हणून त्या टळत नाहीत. मृत्यू कधी येणार आहे, हे कुणालाच माहिती नसतं. निश्चित मृत्यूची तिथी दोघांना समजली होती. त्यापैकी एक म्हणजे देवव्रत आणि दुसरा राजा परीक्षित. बाकी आपण सर्वजण त्या अर्थाने ‘अतिथी’च असतो. दोघांनीही आपापल्या परीने आपल्या कल्याणाचे मार्ग निवडले. आपण या अज्ञात आणि अटळ गोष्टीकडे भीतीनेच पाहतो. त्याविषयी बोलणंही टाळतो. प्रेमात पडलेला माणूस एकूणच जगण्याकडे आणि मृत्यूकडेही फार वेगळ्या तऱ्हेने पाहतो.

ऐसे नव्हे मृत्यूस आम्ही, केव्हाच नाही पाहिले
खूप आहे पाहिले त्याला, प्रत्येक  जन्मी पाहिले
मारीले आहे आम्हीही, मृत्यूस या प्रत्येकदा
नुसतेच ना मेलो आम्ही, जन्मलो प्रत्येकदा

मृत्यो अरे तू का कुणाला, येऊ नयेसा वाटतो?
येतो असाही काळ जेव्हा, तूच यावा वाटतो
असते जरी काळी अशा, तूही कुणा सन्मानिले
देवाहूनीही जास्त असते, आम्ही तुला सन्मानिले


‘येतो असाही काळ जेव्हा, तूच यावा वाटतो’ अशा ओळी भाऊसाहेब पाटणकर लिहितात तेव्हा ती निराशा नसते, ती वस्तुस्थिती असते. प्रेमात जन्म आणि मृत्यू यांची आसक्ती, भीती निघून जाते. तुला मृत्यू हा विषयच आवडत नसल्याने कदाचित मी म्हणतो, ते ऐकायला आवडणार नाही. डॉ. सफी हसन यांची ‘मरीज - ए- इश्क का क्या है’ ही गजल तू ऐक. लाइव्ह ऐकायला मिळाली तर आणखीनच गंमत येते. उस्ताद झाकिर हुसेन यांचा तबला आणि हरिहरन यांचा स्वर. अप्रतिम जुगलबंदी रंगली आहे या गाण्यात.

मरीज ए इश्क का क्या है, जिया जिया ना जिया
है एक सॉंस का झगड़ा, लिया लिया ना लिया...

सखे, प्रेमात विव्हल झालेल्या, आजारी पडलेल्या माणसाला जीवन आणि मृत्यू यामध्ये फारसं स्वारस्य राहिलेलं नसतं. जगलो तर जगलो, नाही तर नाही, काय त्यात एवढं? असं आपण एरव्ही म्हणत नाही. माणसाला मृत्यू हवा हवासा वाटणं, ही अवस्था कंटाळ्यातून उत्पन्न होते. ज्यात ‘जगणं’ नाही  असं जिवंत राहण्यापेक्षा मृत्यू चांगला, असं वाटणं साहजिक आहे. मरण येत नाही म्हणून नाइलाजाने जिवंत असणाऱ्या माणसाच्या पराभूत मानसिकतेची ती उत्कटता आहे. जिवंतपणी जगणाऱ्या माणसाला मृत्यू यावासा वाटत नाही. त्याची कल्पनाही त्याला नको असते. प्रेम आणि भक्ती ही दोनच शक्तिस्थळं अशी आहेत ज्या ठिकाणी माणूस जेवढ्या उत्कटतेने जगणं स्वीकारतो, तेवढ्याच उत्कटतेने मृत्यूही स्वीकारतो. शेवटचा श्वास आणि त्या आधीचा श्वास यामध्ये एका श्वासाचं अंतर असतं. आपण घेऊ तो कुठला श्वास शेवटचा असेल, हे सांगताही येत नाही. त्या शेवटच्या एका श्वासाचं अज्ञात असणं, जगण्यावरचा विश्वास वाढवतं.

बदन है आज अगर, तार तार है मेरा
तो एक चाक-ए-गिरेबॉं, सिया सिया ना सिया...

सखे, आपण प्रतिष्ठेच्या, सुसंस्कृत असण्याच्या मागे फार लागतो. भले आयुष्य चुरगळलेलं असलं तरी चालतं, शर्टची कॉलर इस्त्री-टाईट लागते. आपण कसं असावं यापेक्षाही आपण कसं दिसावं, याला प्रचंड महत्त्व देतो. आपलं शिक्षण, समाजातला दर्जा, मान-सन्मान यांना प्रेमापेक्षाही जास्त जपतो. प्रेमात पडलेला माणूस असा विचार करतो की, जिथं माझा देह छिन्नविछिन्न झाला आहे, तिथे फाटलेली कॉलर शिवली काय आणि नाही शिवली काय? काही फरक पडत नाही. जिथे स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवही नाहीशी झाली आहे तिथे त्या अस्तित्वाच्या उपाधीची फिकीर तरी कशाला करायची?

ये और बात के, तू हर राह-ए-खयाल मे है
के तेरा नाम जबॉंसे, लिया लिया ना लिया...

सखे, असलेलं प्रेम व्यक्त करता येतच असं नाही. व्यक्त होत नाही म्हणजे ते नसतं, असं समजणं चुकीचं आहे. दाही दिशांना ओरडून, किंचाळून ‘आय लव्ह यू’ म्हणणाऱ्यांच्या हृदयात प्रेमाचा लवलेशही नसण्याचा संभव अधिक असतो. स्त्रीच्या बाबतीत एक विचित्र विरोधाभास कायम आढळतो. लग्नाआधी ‘प्रेम आहे हे सांगितल्याशिवाय कळणार कसं?’ असं प्रियकराला विचारणारी स्त्री, त्याच प्रियकराचा नवरा झाल्यानंतर त्याच्याकडून ‘न सांगता आपणास समजून घेण्याची’ कायम अपेक्षा ठेवते. जे प्रेमात तेच भक्तीतही. तोंडात कायम रामनाम असणाऱ्यांच्या हृदयात राम असेलच याची खात्री देता येत नाही. भक्त असण्याचा पुरावा म्हणजे एकसारखं देवाचं नाव घेणे नव्हे. देव विचारांत हवा, प्रेयसी विचारांत हवी. मग, तोंडात नाव असलं काय आणि नसलं काय, काही फरक पडत नाही.

ये हाल-ए-दिल है ‘साफि’, मै तो सोचता ही नहीं
के क्यों किसने सहारा, दिया दिया ना दिया....

सखे, आपलं प्रेम आणि भक्ती सामान्यत: कशावर तरी आधारलेली असते. प्रिय व्यक्ती किंवा परमेश्वर. आपण कोसळताना प्रिय व्यक्तीने, परमेश्वराने आधार द्यावा, आपल्याला सावरावं, असं आपल्याला वाटतं. प्रेम आणि भक्ती यांची उत्कट अवस्था ही आहे की, या आधाराचीच आवश्यकता राहत नाही. अर्थ, आधार यापलीकडची ही अलौकिक अवस्था असते. लौकिकार्थाने यालाच कदाचित आजारी पडणं म्हणत असावेत.