शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

जो नही मिला उसे भूल जा....

‘आता हे वर्ष संपत आले. नवीन वर्ष येईल. पण सगळे तसेच आहे. काही फरक पडला नाही. कॅलेंडर बदलते, तारखा बदलतात. परिस्थिती तशीच राहते. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यातील दरी वाढतच आहे. तत्त्वज्ञांनी फक्त जगाचे अनेक प्रकारे विवेचन केले, पण हे जुने जग बदलण्याचा कुणीच प्रयत्न करत नाहीत’

सखे, बरी आहेस ना? तुला माझ्यापेक्षा मार्क्स जास्त मिळाले होते हे ठीक आहे, पण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सांगायला आलीस आणि हे काय ऐकवत आहेस?

‘तोच संकल्प आहे. काय नाही मिळाले यापेक्षाही काय मिळाले याचा विचार मी पहिल्यांदा करेन, हाच संकल्प आहे. प्रगतीसाठी ‘नाही’ विरुद्ध ‘आहे’ याचा संघर्ष होणे अटळ आहे. मला कायम जे नाही मिळाले तेच पहिल्यांदा आठवते’. 

सखे, तो संघर्ष वगैरे जाऊ दे. त्यामुळे प्रगती वगैरे होते की अधोगती होते, तेही जाऊ दे. आपल्यामध्ये भांडणे मात्र निश्चितच होतात. या दोन्ही गोष्टी सुखात किंवा दु:खात ढकलतात. समाधानाने जगू देत नाहीत. 

‘कितीही तत्त्वज्ञ वगैरे असलास तरी ती गोमंतकीय असल्यामुळे ‘सुशेगाद’ आहेस. जग बदलण्यासाठी तुला काहीच करायचे नाही’.

सखे, तत्त्वज्ञ वगैरे म्हणून शिव्या नको घालूस. मी सामान्य माणूस आहे. ‘सुशेगाद’ म्हणजे तुला वाटते तसे आळशी, कृती न करणे नव्हे; ‘सुशेगाद’ म्हणजे समाधानी असणे.

‘समाधान म्हणजे मनाची समजूत घालणे. नाही मिळाले ना सोडून दे असे म्हणणे. प्रयत्न न करणे’. 

सखे, तुला माझे म्हणणे कधी पटले आहे, जे आज पटेल. त्यामुळे, हे भांडण, वादविवाद सोड आणि मस्तपैकी अमजद इस्लाम अमजद यांची ‘कहाँ आ के रुकने थे रास्ते’ ही गझल ऐक. तोवर मी कॉफी करतो. हृदयाची सतार छेडत येणारा उस्ताद शुजात खान यांचा स्वर ऐक. 

सखे, आपण ‘मिळाले’ आणि ‘मिळाले नाही’, यात फार अडकतो. दु:खात बुडतो आणि सुखात वाहवत जातो. ‘आहे रे’ला ‘नाही रे’च्या विरुद्ध ठेवल्यामुळे आपण कायम संघर्ष करण्यात सगळी शक्ती घालवतो. त्यातून मागणी आणि तक्रार करू लागतो. वास्तविक, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. 

‘तुझे नेहमी काहीतरी वेगळे, विचित्र असते. पूरक कसे असेल, विरुद्धच तर आहे’.

सखे, सगळ्यांजवळ असते किंवा सगळ्यांजवळ नसते तर आहे आणि नाही याला काही अर्थच उरत नाही. गरीब आहे म्हणून कुणीतरी श्रीमंत आहे. सगळेच श्रीमंत असते तर गरिबीला अर्थ उरला नसता आणि सगळेच गरीब असते तर श्रीमंतीला अर्थ उरला नसता. कमी जास्त हे असायचेच. विषमता हा संघर्षाचा पाया नाही तर एकत्र येण्याचा मार्ग आहे. कामगार विरुद्ध नोकर असा संघर्ष निर्माण केल्याने, संपूर्ण आशिया खंडात एकेकाळी प्रथम स्थानावर असलेला पश्चिम बंगाल, आज भिकेकंगाल आहे. हे मालक विरुद्ध नोकर करण्याचं लोण कुटुंबातही पोहोचलं. बायकोचे नवर्‍याला ‘मालक’ म्हणणेही खटकू लागले. ‘मालक म्हणायला बायको काय नोकर आहे का?’ असले प्रश्न विचारले जाऊ लागले. नवरा मालक असेल तर बायको मालकीण असते, हे लक्षांत आले नाही. त्यामुळे, नवरा विरुद्ध बायको असा नाते-संघर्ष निर्माण झाला. स्त्री विरुद्ध पुरुष या प्रकारात सगळी नाती भरडली. स्त्री व पुरुष विरुद्ध नाहीत, ते एकमेकांना पूरक आहेत. 

आपल्या नवर्‍याचा कायम सर्वांसमक्ष पाणउतारा करणार्‍या बायकोने कधीतरी तो किती राबतो याचा विचार करून पाहावा. बायकोने केलेल्या स्वयंपाकाचे शेवटचे कौतुक आपण कधी केले होते हे नवर्‍याने एकदा आठवून पाहावे. नवर्‍याच्या उणीवा काढल्याने बायको चांगली ठरत नाही आणि बायकोच्या उणीवा काढल्याने नवरा श्रेष्ठ ठरत नाही. जिथे उणीव आहे तिथे दोघांपैकी कुणीही उभे राहत नाही, असाच त्याचा अर्थ होतो. 

सखे, आपल्याला नसण्याची तक्रार तेव्हाच करता येते जेव्हा आपण असण्याबद्दल कृतज्ञ असतो. आहे ते टिकवण्यासाठी आणि नाही ते मिळवण्यासाठी धावताना कधी तरी थांबून आपण त्याचा विचार करतो का? प्रत्येक गोष्ट आपण घट्ट धरून बसतो व त्यात अडकतो. बनारसच्या व्यापार्‍यांना माकडे फार त्रास देतात. म्हणून ते व्यापारी अरुंद तोंडाच्या भांड्यात खाद्यपदार्थ घालून बाहेर ठेवतात. माकड त्यात हात घालून मुठीत जे असेल ते घेते, पण हात अडकतो. मुठीत घट्ट धरून ठेवलेले सोडल्याशिवाय हात बाहेर येत नाही. आपलेही तसेच आहे. जे मिळाले व जे मिळाले नाही, त्यांना जोवर आपण घट्ट धरून बसतो तोवर आपली सुटका होत नाही. आपण अडकत जातो. जी परिस्थिती आहे ती स्वीकारत पुढे जाणे हाच योग्य मार्ग आहे. आम्ही परिस्थितीला स्वीकारत नाही हा आमचा दोष आहे, परिस्थितीचा नाही. 

सखे, म्हणूनच ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्हींच्या भानगडीत पडू नकोस. अगदीच जमत नसेल तर, अमजद इस्लाम अमजद या गझलेत म्हणतात तसे, ‘जो मिल गया उसे याद रख, जो नही मिला उसे भूल जा’ असे तरी वागून पाहा. एका शब्दात सांगायचे तर ‘सुशेगाद’ राहा!



शनिवार, ६ जुलै, २०२४

जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें..

‘ही पानं चिकटली आहेत बघ. यावर लिहिलेली अक्षरंही पुसट झाली आहेत. बरं झालं तू आलास.’

वाचलीस सगळी? 

‘नाही रे. तुझी वाट पाहून कंटाळा आला. मग, तुझ्या टेबलावर ही डायरी सापडली. अंगठ्याने पाने गर्रकन फिरवताना, चिकटलेल्या पानांवर बोट स्थिरावलं. तीच पानं उघडून पाहिली. सुकलेलं फूल होतं आणि खराब झालेली अक्षरं. अरे, एवढा सिरीयस का झालास?’  

काही नाही गं. चल, तुला एक गझल ऐकवतो. अहमद फराज यांची ’अब के हम बिछड़े तो शायद’ ही गझल अप्रतिम आहे. मेहंदी हसनचा मखमली आवाज. प्रत्येक शेराच्या शेवटी जीवघेणी आर्तता. तू स्वत:च ऐक.

अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें 
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें 

सखे, काल घर स्वच्छ करायला घेतलं. तेव्हा ही खूप जुनी रोजनिशी सापडली.  तू पहिल्यांदा भेटलीस त्यादिवशी लिहिलेलं पान वाचताना तो दिवस, तो क्षण डोळ्यांसमोरून जाईना. त्यावेळेस जे वाटलं होतं, ज्या भावना हृदयात होत्या, त्या आजही तशाच आहेत. त्या पुढची पानं वेड्यासारखा चाळत गेलो. कालपासून खूपच अस्वस्थ झालो.  वाचता वाचता ज्या पानांनी त्रास दिला तीच तुला पहिल्यांदा सापडली. आयुष्य असो किंवा एखादं पुस्तक, ते चाळताना दुमडलेल्या, चिकटलेल्या पानांकडे पहिल्यांदा लक्ष जातं. अक्षरं पुसट होतात, फुलं सुकतात. आठवणी मात्र स्पष्ट, ताज्या असतात. 

ढूँढ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती 
ये ख़ज़ाने तुझे मुम्किन है ख़राबों में मिलें 

सखे, प्रेम, मैत्री, विश्‍वास, चांगुलपणा ह्या गोष्टी आजकाल फार दुर्मीळ झाल्या आहेत. यांचा वापर आकर्षक वेष्टनासारखा केला जातो. वेष्टनाला भुलून स्वीकारलेली भेट उघडायला जावं तर आत स्वार्थ, सत्ता, संपत्ती आणि सोय ही विष्ठाच सापडते. आपल्याला हव्या असलेल्या मैत्रीपायी, आपुलकीपायी आपला फक्त वापरच झाला, हे लक्षात येईपर्यंत आयुष्य बरबाद झालेलं असतं. म्हणूनच विश्‍वास, प्रेम वगैरे हे अनमोल, दुर्मीळ मोती शोधायचे असतील, तर तुला या मोत्यांपायी बरबाद झालेल्या, भंगारात निघालेल्या माणसांकडे शोधावे लागतील.

तू ख़ुदा है न मेरा इश्क़ फ़रिश्तों जैसा 
दोनों इंसॉं हैं तो क्यों इतने हिजाबों में मिलें 

सखे, भक्ती म्हणजे प्रेमच आहे. मनुष्यावर केलं की त्याला प्रेम म्हणतात आणि परमेश्‍वरावर केलं की त्याला भक्ती असं म्हणतात. नश्‍वराने नश्‍वराची केलेली भक्ती म्हणजे प्रेम आणि नश्‍वराने ईश्‍वरावर केलेलं प्रेम म्हणजे भक्ती. परमेश्‍वराची थेट भेट घडत नाही. निर्गुणाच्या आड दडलेला भगवंत भेटावा म्हणून भक्त स्वत:ला समजेल, आवडेल अशा सगुण रूपामध्ये त्याला घेऊन येतो. त्याला माणसांप्रमाणे गुण, अवगुण, नातीगोती चिकटवतो. यालाच ’आलंबन’ असं म्हणतात. मूर्ती हे आलंबन आहे. मूर्तीमधून अमूर्ताकडे पोहोचावं लागतं. भक्त आणि भगवंत यामध्ये असलेले हे पडदे आहेत. हिजाब याचा अर्थ पडदा. तू माझ्यासमोर मूर्तिमंत उभी होतीस. तरीही आमच्यामध्ये सौंदर्य, संपत्ती, नाव, प्रतिष्ठा, वय हे पडदे होतेच. त्यामुळे तू भेटूनही भेटलीच नाहीस. अगदी, त्या परमेश्‍वरासारखी. 

ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यार में शामिल कर लो
नशा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें 

सखे, तू न भेटल्याचे दु:ख तुझ्या प्रत्येक भेटीनंतर व्हायचे. जेवढा मी तुझ्याजवळ जायचा प्रयत्न करायचो, तेवढीच तू दूर जायचीस. मला तुझ्या मनापर्यंत पोहोचण्यापुरतंच तुझं शरीर हवं होतं. तुला मात्र कायम वाटत राहिलं, हा शरीरासाठी मन जवळ करतोय. आमच्यामध्ये हे अंतर कायम राहिलं. तुला कायमचा अंतरलो हे दु:ख आयुष्यातल्या अनेक दु:खांपेक्षा वरचढ होतं. ग़म-ए-दुनिया म्हणजे दुनियेने दिलेली दु:खं आणि ग़म-ए-यार म्हणजे प्रिय व्यक्तीनं दिलेलं दु:ख. ही दोन्ही दु:खं एकमेकात मिसळली तर धुंद करणार्‍या वेदनेची एक निराळीच चव निर्माण होते. मदिरा मदिरेत मिसळल्यानंतर वाढत जाणारी धुंदी असावी तशी. 

आज हम दार पे खेंचे गये जिन बातों पर 
क्या अजब कल वो ज़माने को निसाबों में मिलें 

सखे, एक गंमत सांगतो. आपण आज जो शहाणपणा म्हणून अभ्यासक्रमातून शिकतो, तो गतकाळातला वेडेपणाच असतो. आपल्याकडे आयुष्यभर छळवाद करून, जिवंतपणी मरणयातना देऊन, मेल्यानंतर संतत्व प्राप्त होतं. जिवंतपणी संतत्व हा आजकाल व्यवसायाचा भाग झाला आहे. इतिहास पाहता, मेल्याशिवाय संतत्व नाही. या संतांनी रचलेले अभंग, मांडलेले विचार, ते जिवंत असताना समाजाच्या लेखी वेडेपणाचेच होते. आज त्याच विचारांवर लिखाण करून आपण पीएचडी मिळवतो. ’दार पे खेंचे’ म्हणजे सुळावर चढवणे आणि  ’निसाबों में’ म्हणजे पाठ्यपुस्तकात, अभ्यासक्रमात. न जाणो आज ज्या प्रेमातल्या वेडेपणासाठी तू मला सुळावर देत आहेस, तेच वेडेपण उद्या कदाचित पाठ्यपुस्तकातून अभ्यासाचा विषय होईल.

अब न वो मैं हूँ न तू है न वो माज़ी है ’फ़राज़’ 
जैसे दो शख़्स तमन्ना के सराबों में मिलें 

सखे, पाठ्यपुस्तकातून अभ्यासाचा विषय होईल की माहीत नाही, पण तुझं वेड मात्र मला निश्‍चितच आहे. ही रोजनिशी वाचताना निसटून गेलेला गतकाळ पुन्हा वर्तमानात आला. ते वेड प्रकर्षाने जाणवलं, ती मृगतृष्णा पुन्हा कंठशोष करून गेली. असं असलं तरीही आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. मीही बदललोय, तूसुद्धा बदलली आहेस आणि हा काळही बदलला आहे. आता आपली भेट घडते ती इच्छेच्या मृगतृष्णेमागे धावताना किंवा स्वत:च्याच आयुष्यातली दुमडलेली, चिकटलेली पाने चाळताना. सखे, त्या चिकटलेल्या पानांमध्ये जो सुकलेला गुलाब आहे ना, तो तुलाच देण्यासाठी त्या दिवशी मी घेऊन आलो होतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे सांगायचं होतं. तू तुझं लग्न ठरल्याच्या आनंदात एवढी मग्न होतीस की, माझं सांगणं राहूनच गेलं. तुला न सांगितलेलं रोजनिशीत लिहिलं, तुला देता न आलेला गुलाब तिथेच ठेवून दिला. त्यानंतरची पानं आयुष्यभर कोरीच राहिली. त्याआधी लिहिलेली अक्षरं पुसट झाली, गुलाब सुकून गेला आणि पानं चिकटली.


बुधवार, १५ मे, २०२४

ये ज़रूरी तो नहीं


सखे, काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये एक स्त्री आली होती. कुठे तरी झालेल्या कार्यक्रमाची बातमी देण्यासाठी. सोबत फोटोही होता. तिने बातमीचा कागद दिल्यावर माझं लक्ष सहज तिच्या हातांकडे गेलं. चेहर्‍यावर लपवलेलं वय हात दाखवून देत होता. त्यातली विसंगती स्पष्ट जाणवत होती. बातमीचा कागद हाती देऊन, सगळ्यांना हात हालवून, हाय हॅलो करीत ती निघून गेली. तिने लावलेल्या अत्तराचा अघोरी वास हळूहळू कमी होत गेला. या स्त्रीला मी कुठे पाहिलं आहे याची संगती  लावण्यासाठी स्मृतींची पानं चाळू लागलो. अचानक आठवलं, ही स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेली सौंदर्यवती, अभिनेत्री होती. तिची मुलाखत घेण्यासाठी, छायाचित्रे घेण्यासाठी पत्रकारांची रांग लागायची. तिच्या साध्या साध्या गोष्टींची खूप प्रसिद्धी व्हायची. तिच्या सौंदर्याच्या सगळीकडे चर्चा व्हायच्या. कालांतराने सौंदर्याला, अभिनयाला उतरती कळा लागली. प्रसिद्धीचे झोत बंद झाले. बातमीसाठी मागे लागणारे जवळपासही फिरकेनात. चर्चेत राहण्यासाठी समाजसेवा करणं तिला क्रमप्राप्त होतं. अशा प्रसिद्धी देणार्‍या समाज कार्याची बातमी स्वत:च लिहून, ती छापून येईपर्यंत पाठपुरावा करत राहणंही क्रमप्राप्तच होतं. 


सखे, इतर कुठल्याही व्यसनाप्रमाणेच प्रसिद्धीचं व्यसनही घातकच आहे. हा प्रसिद्धीचा झोत जेवढं अंधारात ढकलतो, तेवढं अंधारात ढकलणं प्रत्यक्ष काळोखालाही जमत नाही. आपण कायम प्रसिद्ध राहू, कायम लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतील, आपल्याला चांगलं म्हणतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ असतं. मुळात अशा गोष्टींची आवश्यकताही नसते. अपेक्षा ठेवणं व्यर्थ असतं हे तुला पटेल. पण, ’या गोष्टींची आवश्यकता नसते’ हा विचार तुला पटलेला दिसत नाही. हरकत नाही. तू खामोश देहलवी यांची ’उम्र जलवों मे बसर हो’ ही जगजित सिंगांच्या मखमली आवाजातली अप्रतिम गझल ऐक. कदाचित तुला माझं म्हणणं पटेल.


उम्र जल्वों में बसर हो ये ज़रूरी तो नहीं 
हर शब-ए-ग़म की सहर हो ये ज़रूरी तो नहीं 


सखे, आपलं आयुष्य कायम झगमगाटाने भारलेलं राहील असं नाही. आपल्या हातून कायम चांगलं, बरोबर घडेल असं होत नाही. कायम पूर्णावस्थाच प्राप्त होईल असं घडत नाही. कितीही केलं तरी करायचं काहीतरी शिल्लक राहतच. जे राहून गेलं आहे, त्यातून जे केलं आहे ते वजा होत नाही. अशी वजाबाकी करणार्‍यांची उत्तरे कायम नकारार्थी येतात. जे हातून घडलं त्याचं गुणगान करत बसणं आणि जे राहून गेलं त्याविषयी खंत करीत बसणं योग्य नव्हे. दु:खानंतर सुख येतं ही आपण आपली करून घेतलेली समजूत आहे. दु:खांच्या शेकडो धाग्यानंतर सुखाचा एक धागा विणला जातो. प्रत्येक दु:खाची पहाट सुख घेऊन येतेच असं नाही. सुखाच्या अपेक्षेने दु:ख भोगलं की अपेक्षाभंग होतो. 


चश्म-ए-साक़ी से पियो या लब-ए-साग़र से पियो
बेख़ुदी आठों पहर हो ये ज़रूरी तो नहीं


सखे, जे आहे ते कायम तसंच राहील अशी समजूत आपण करून घेतलेली असते. आपलं आयुष्यही आपण याच गृहीतकावर रेखाटत असतो. आपण करीत असलेली नोकरी, धंदा, व्यवसाय हा कायम ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तो राहील असे आपण गृहीत धरून चालतो. जास्त मिळालेले पैसे जास्त खर्च करण्यावर घालवतो. कालांतराने मिळकत कमी झाली तरी जास्त खर्च करायची सवय जात नाही. याची कल्पना असल्याने माणूस जे आहे ते टिकवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतो. असलेलं नाहीसं होईल तेव्हा काय यासाठी कोणतीही व्यवस्था करीत नाही. आपल्याजवळ जे आहे ते संपणार नाही याची धुंदी माणसाला संपवून टाकते. मिळालेलं यश, प्रसिद्धी, पैसा, नावलौकिक कायम टिकत नाही. म्हणूनच या न टिकणार्‍या गोष्टींची सवय माणसाला अगतिक बनवते. धुंदी कुठल्या मार्गाने येते व किती येते यापेक्षाही ती कायम टिकणारी नसते हे महत्त्वपूर्ण आहे. चश्म-ए-साकी म्हणजे प्रेयसीच्या डोळ्यातून प्या किंवा लब-ए-सागर म्हणजे प्याला ओठाला लावून प्या, येणारी धुंदी व होणारी आत्मविस्मृती कायम टिकत नाही.  



नींद तो दर्द के बिस्तर पे भी आ सकती है
उनकी अगोश मे सर हो ये ज़रूरी तो नहीं


सखे, आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला अलिप्ततेच्या एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. ही अलिप्तता एवढी सहज घडत नाही. व्यसन असणारा माणूस, व्यसनाचा संबंध आपल्या सुखप्राप्तीशी किंवा दु:खनिवारणाशी जोडून मोकळा होतो. गुटखा खाणार्‍या माणसाच्या मेंदूला तो खाल्ल्यामुळे चालना मिळते. गुटखा खाल्ला नाही तर आपल्या मेंदूला चालना मिळणार नाही, अशी त्यानं समजूत करून घेतलेली असते. गुटखा खाणं हे व्यसन नाही, तो न सुटणं हे व्यसन आहे. चुना, तंबाखू चोळून तोबरा भरल्याशिवाय आपल्याला काही सुचतच नाही, अशी समजूत करून घेणं हे व्यसन आहे. आपल्या क्षमतेवर आपणच दाखवलेला तो अविश्‍वास आहे. आपल्या क्षमतेवर विश्‍वास असलेल्या शायर प्रेयसीला उद्देशून म्हणतो, झोप घ्यायची असेल तेव्हा दु:खाच्या शय्येवरही मी झोपेन, त्यासाठी तिच्या बाहुपाशाची आवश्यकता नाही. हे सामर्थ्य, ही अलिप्तता जेव्हा आपल्यात येते, तेव्हा आपल्याला खर्‍या अर्थाने प्रेम समजते. 



शेख़ करता तो है मस्जिद में ख़ुदा को सजदे
उसके सजदों में असर हो ये ज़रूरी तो नहीं


सखे, आपल्याला प्रपंचात होणार्‍या दु:खांचं निवारण आपल्यालाच करावं लागतं. धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थामध्ये निर्माण होणारे संघर्ष, दु:ख यांची निवृत्ती आपल्यालाच करावी लागते. ती निवारण करण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध असतात, सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालेलं असतं. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, ज्याला परमार्थ म्हटलं जातं, त्यात निर्माण होणारी दु:खं निवारण करण्यासाठी देवाजवळ मागावं. आपण नेमकं उलट करतो. प्रपंचातील दु:खांसाठी देवाजवळ मागणं मागतो. पारमार्थिक दु:ख आपल्याला होत नाही, कारण त्याची जाणीवच झालेली नसते. आपली अवस्था ढाल तलवार धारण करणार्‍या रडत-राउतासारखी असते. एक हात तलवारीत आणि दुसरा हात ढाल पकडण्यात गुंतला आहे, देवा आता लढण्यासारखी आणखी दोन हात दे, अशी मागणी तो करतो. आपल्या प्रार्थनेमध्ये बळ नसतच. परमेश्‍वराला करुणा वाटावी असं आपलं मागणं नसतं.  करुणा म्हणजे दु:खितांचं दु:ख दूर व्हावं यासाठी दाखवलेली दया.  स्वदु:खाची जाणीव होण्याबरोबर फक्त परमेश्‍वरच ते दु:ख निवारण करू शकतो, ही श्रद्धा असावीच लागते. तेव्हाच आपल्या मागण्याला अर्थ प्राप्त होतो.


सब की नज़रों में हो साक़ी ये ज़रूरी है मगर
सब पे साक़ी की नज़र हो ये ज़रूरी तो नहीं


सखे, इथे साकी हा शब्द परमेश्‍वर या अर्थाने आला आहे. परमेश्‍वराची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी आपली प्रत्येकाची नजर त्याच्याकडे लागलेली असते. पण, त्याची मेहरनजर प्रत्येकावर होतेच असं नाही. लहानपणी आपण आईवडिलांचं बोट धरून देवळात जातो. पण, आपली नजर खाजे, फुगे, खेळणी यांच्यावर असते. याच जत्रेच्या निमित्ताने देवळात मोठेपणी जातो तेव्हा नजर चालत्या बोलत्या प्रेक्षणीय स्थळांकडे असते. म्हातारपणी घरी वेळ जात नाही म्हणून देवळात जातो. आपण आयुष्यभर आपल्याच कारणासाठी देवाकडे  जातो. देवासाठी कधी जातो? देवळात जाताना पायातल्या चपला बाहेर ठेवतो. आपल्यावर असलेला प्रकाशझोत, सौंदर्य, सत्ता, संपत्ती, पद या चपला मात्र मिरवत राहतो. आयुष्यात एकदा तरी त्याला भेटण्यासाठी उपाधीच्या चपला बाहेर ठेवून जावे. तो आपल्या स्वागतासाठी धावत येतो.