शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

सजण दारी उभा...

‘बर्वे, तुम्हाला मी सांगितलं होतं मला कवितेचं इंटरप्रिटेशन तुमच्याकडून ऐकायला आवडतं. तुम्ही मला ते ऐकवणारही होतात. कुठल्या जन्मी?’

सखे, असा एकदम हल्ला नकोस ना चढवू. मान्य आहे मी आळशी आहे, सुख म्हणजे झोप, असं माझं साधं सोपं गणित आहे. त्यामुळे अनेक गोष्टी राहून जातात. माझं तुला ऐकवणं होत नाही आणि तू मला लेख देत नाहीस. 

‘मी लिहित नाही म्हटलंय का? पण, मला सुचतच नाही.’

लिहित राहा म्हणजे सुचत जाईल. तुझ्याकडे लिहिण्याचं सामर्थ्य आहे म्हणून तुझ्यामागे लागतो. एवढा त्या परमेश्‍वराच्या मागे लागलो असतो, तर एव्हाना तोच होऊन गेलो असतो. तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणून नको लिहूस. ते सांगणं आवश्यक आहे म्हणून लिही. जाऊ दे! मी सांगायचं आणि तू अजिबात कानामनावर घ्यायचं नाही हे नेहमीचंच झालं आहे. 

‘रागावू नका हो. मी लिहीन. पंधरवड्यातून एक लेख तरी लिहून देत जाईन.’

देवच पावला म्हणायचा! बाकी देव पावला आणि खरोखरंच समोर येऊन उभा राहिला तर काय अवस्था होईल, हे आपल्या विचार करण्यापलीकडलं आहे. संत आणि कवी यांना हे नेमकं जमतं. वास्तवतेच्या निखार्‍यात धगधगणारं समाजमन आणि प्रियकर प्रेयसीचं कोवळं शृंगारिक मन ज्या एकाच लेखणीतून तितक्याच नेमकेपणानं उतरतं, ती समर्थ लेखणी सुरेश भटांची. त्यांचीच ‘सजण दारी उभा’ कविता तू ऐक. हे गाणं भारती आचरेकर, आर्या आंबेकर आणि सलिल कुलकर्णींच्या आवाजात ऐकलं आहे. ‘भटां’च्या काव्याला प्रत्यक्ष ‘देवां’नी संगीत दिलं आहे, पण ते ऐकण्याचं भाग्य नाही मिळालं. ज्या कवितेने अनेकांना वेड लावलं आहे ते एकदा नव्हे अनेकदा ऐक.

‘अनेकदा का? एकदा वाचल्यावर अर्थ समजतोच की’

नाही सखे! एकच कविता आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर वाचावी. प्रत्येकवेळी तिचा कोणतातरी नवीन पैलू समोर येतो. आपण वाचताना शब्द वाचतो, अनुभवास आलेला अर्थ त्याच्याशी जोडतो. नवा अनुभव कवितेचा वेगळा अर्थ सांगून जातो. म्हणून कविता अनेकदा वाचावी. आता हीच कविता घे! काय वाटतं तुला वाचल्यानंतर?

‘हे काय! साधा सरळ अर्थ आहे. प्रेयसी प्रियकराची वाट पाहत होती. वाट पाहण्यातच तिचं सगळं काम राहून गेलं. मग, तो अचानक आला. तिला काय करावं तेच सुचेना. या सगळ्यात होणारी तिच्या मनाची घालमेल भटांनी टिपली आहे. तीही अप्रतिम!’

सखे, हा एक अर्थ आहे. तो नाही अशातला भाग नाही. त्याही पलीकडे एक खोल अर्थ त्यात दडला आहे. तो थोडासा आध्यात्मिक आहे. 

‘उगाच काहीतरी! तुम्हांला आध्यात्म आवडतं आणि त्याहीपुढे जाऊन आलेल्या गेलेल्याला ते ऐकवण्याचीही खाज आहे म्हणून तुम्ही त्याच्यातून तसे अर्थ काढता. प्रियकर अचानक दारात उभा राहिल्यावर प्रेयसीचा उडणारा गडबडगोंधळ एवढाच काय तो भटांना सांगायचा आहे. बाकी काही नाही.’

सखे, ओढून ताणून अर्थ लावणे आणि अन्वयार्थ काढणे यात फरक आहे. एखादा शब्द तसाच आणि तिथेच का योजला आहे, यावर कवितेचा नेमका अर्थ ठरतो. प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन म्हणूनच वेगळं असतं. कविला तेच सांगायचं आहे, असा दावा करण्यात अर्थ नसतो. ‘सांगणार्‍याला काय वाटतं?’ ते त्याला त्याच्या पद्धतीने सांगायचं असतं. ते बरोबर की, चूक हे ऐकणार्‍याने ठरवावं. जाऊ दे! 

सखे, ‘दुबळी कुडी’, ‘प्राणपूजा’ या कवितेत आलेल्या शब्दांचा विचार कर. शेवटचं कडवं तर माझं सगळ्यांत आवडतं कडवं. त्यामागची भावना प्रेमापलीकडलं काहीतरी सांगते. 

‘हं...! तुम्हीच सांगा!!’

सखे, शब्द, स्वर यातून अर्थ पोहोचला पाहिजे. त्याहीपलीकडे जाऊन भावना पोहोचली पाहिजे. आता बघ! प्रियकर अचानक आल्यामुळे प्रेयसीला प्रश्‍न पडलाय घर कधी आवरू आणि स्वत:ला कधी सावरू. आवरावं तेव्हा लागतं जेव्हा पसारा झालेला असतो आणि सावरावं तेव्हा लागतं जेव्हा तोल गेलेला असतो. जशी ही अवस्था प्रेयसीची होते, तशीच ती जिवाचीही होते. शरीर हे जिवाला राहायला मिळालेलं तात्पुरतं घर आहे. हे घर सोडायच्या वेळेला जिवाला शिव करण्यासाठी शिव (तत्त्व) येतो. पण, जीव मृत्यूचा उंबरठा ओलांडून पुन्हा दुसर्‍या घरात जाणं पसंत करतो. शिव होत नाही. शिव होण्यासाठी लागणारी तयारी केलेलीच नसते. काम क्रोधाने शरीरात केलेला पसारा आवरायला आणि ‘वेळ थोडा राहिलाय’ या धक्क्यातून सावरायला वेळ मिळत नाही. 

सखे, प्रेयसी स्वत:ला आपण कशी दिसायला हवी असा विचार करते तेव्हा आरशात ‘पाहते’. त्याला मी कशी दिसायला हवी, तशी होण्यासाठी ती स्वत:ला ‘निरखून पाहते’. परमेश्‍वराला हवं तसं आपण कधी वागतो? आपण आपल्याला हवं तसंच वागतो. प्रियकर जिला स्वत:ला भेटायला आलाय ती शृंगार करताना स्वत:ला दुबळी का म्हणेल? तिथेही शब्द ‘देह’ असा नाही, ‘कुडी’ असा आहे. समर्पणाचा भाव असल्याशिवाय दुबळेपणाची जाणीव होत नाही. मला मी कशी दिसायला हवी यापेक्षाही त्याला मी कशी दिसायला हवी, त्याप्रमाणे तिला सजायचं आहे. 

सखे, साज, शृंगार करण्यासाठी तरी तिच्याकडे अलंकार कुठे आहेत? तिनं प्रचंड सोसलं आहे. पदरी खूप आसवं आहेत. तीच माळायचं ती ठरवते. पण, माळताना त्यातली थोडीच माळते. अजून खूप आसवं शिल्लक आहेत. जी काही माळली आहेत ती त्याच्याच विरहात गाळलेली आहेत. आपल्याला झालेलं दु:ख, आपण होता होईल तेवढं मोठं करून दाखवत असतो. दु:खाने दु:खी होण्याएवढं सुख, सुखाने सुखी होण्यातही नसतं. त्यासाठी नसलेली आसवेही आपण खूप गाळत असतो. प्रेयसीला दु:खाचं प्रदर्शन नाही घडवायचं, फक्त जाणीव करून द्यायची आहे. म्हणून प्रेयसी प्रियकराच्या विरहात झालेलं दु:खही, त्याला दु:ख होऊ नये म्हणून लपवते. आसवेही ती ‘माळते’, गाळत नाही. 

सखे, शब्द अर्थप्रवाही असतात. म्हणूनच ते कसेही वापरता येत नाहीत. ते जपून वापरावे लागतात. आपण जेव्हा पूजा ही कृती सांगतो तेव्हा ‘घातली’, ‘केली’, ‘उरकली’ असे शब्द वापरतो. इथे भटसाहेबांनी वापरलेला शब्द आहे ‘बांधली’. तीसुद्धा ‘प्राणपूजा’! आपल्यासाठी परमेश्‍वराची पूजा झाली की, ती घातली, केली किंवा उरकली जाते. परमेश्‍वरासाठी परमेश्‍वराची पूजा ही कायम ‘बांधली’ जाते. हे कसं तरी करणं नाही. हे सृजन आहे, ही निर्मिती आहे. 

सखे, शेवटच्या कडव्यातला ‘पुन्हा’ हा शब्द उच्चारताना, ‘दारावर आधी थाप वाजली होती’ हे स्वरातून सांगणे हे गायकाचं कसब. दारावर वाजलेली थाप ही जन्मजन्मांतरी ऐकलेली आहे, हे प्रेयसीच्याबाबतीत कितीही काव्यात्म असलं तरी जीवाच्याबाबतीत ते सत्य आहे. ही ओळख पटण्याचा तो क्षण इतका अचूक टिपला आहे की, शब्दच थांबतात. आपलंच हृदय आपणच कसं हृदयी धरायचं, हा प्रेयसीला पडलेला प्रश्‍न खरं तर जिवाला पडलेला प्रश्‍न आहे. आपणच ब्रह्म आहोत याची जिवाला ‘जीव’ जाताना झालेली जाणीव आणि तरीही ‘आपण जीव आहोत’ असं वाटणं ही संभ्रमावस्थाच विचित्र. ती तडफड, ती तगमग यात भटांनी नेमकी सांगितली आहे. अद्वैताचा अनुभव आल्यानंतरही जाणिवेने द्वैत स्वीकारणार्‍या ज्ञानेश्‍वरांच्या विरहिणीची ही व्यथा आहे. आपण एकच आहोत, तर मग तो न्यायला का आलाय आणि मी त्याची वाट का पाहते? हे वेगळेपण का आहे? आपण एकच आहोत तर त्याला कसं पाहू? असे असंख्य गोंधळात टाकणारे प्रश्‍न प्रेयसीला पडतात. 

सखे, आपण ब्रह्म आहोत ही जाणीव झाल्यानंतरही जिवाला मिळालेलं तात्पुरतं घर सोडवत नाही. त्यात तो गुंतलेला असतो. त्याचा मोह सुटत नाही. कितीही मोह असला, तरी ते नष्ट होणारं असतं, म्हणून त्याचा त्याग करावाच लागतो. पण, जीव दुसरं घर निवडतो.  तेही नष्ट होणारंच असतं. ते घर सोडताना पुन्हा शिव दारावर थाप मारतो. थाप ओळखीची असते, जन्मजन्मांतरी ऐकलेली असते. तरीही दार उघडताना पुन्हा तोच गोंधळ, तीच संभ्रमावस्था. जीव शिव किंवा ब्रह्म होईपर्यंत हे चक्र सुरूच राहतं. ‘मी आहे’ या स्वत:च्या अस्तित्वाच्या जाणिवेने सुरू झालेला प्रवास, ‘मी ब्रह्म आहे’ या जाणिवेनंतर, ‘ब्रह्मच आहे’ या शुद्ध जाणिवेत संपतो. या प्रवासातील स्थित्यंतरात होणारी घालमेल, तगमग, तडफड जशी जिवाची होत असते तशीच प्रेयसीचीही होत असते. हा समान धागा पकडून संतांनी आणि कवींनी अध्यात्म सोपं करून आपल्याला कळेल अशा भाषेत मधुराभक्तीच्या माध्यमातून पोहोचवलं आहे. जे ज्ञानमार्गाने समजतं तेच भक्तिमार्गानेही समजतं. मार्ग वेगवेगळे असले, तरीही गंतव्य एकच!

‘हे लिहिताना असा, एवढा विचार भटसाहेबांनी केला असेल?’

सखे, एखादी गोष्ट प्रत्यक्षात येते तो क्षणच आपल्या ओळखीचा असतो. त्याआधी त्यामागे त्याच्या निर्मितीची सुरू असलेली अखंड प्रक्रिया आपल्यासाठी अज्ञातच राहते. कवितेची रचना होतेवेळी एवढा सगळा विचार कवी करतो आणि मग काव्य रचतो, असं आपण समजतो ते याचमुळे. कवीच्या बाबतीत, विचारांच्या निरंतर प्रक्रियेचं प्रकटीकरण एके क्षणी होण्याला काव्य म्हटलं जातं. आपल्याला हे कसं सुचलं याचं आश्‍चर्य कवीला वाटत असतं आणि ते नेमकेपणानं सांगता येत नाही. एकाच कवितेचे अनेक पैलू आपल्याही कालांतराने प्रत्ययाला येतात. म्हणूनच सखे, खूप ऐक, खूप वाच आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सातत्याने लिही! 

‘लिहिते बर्वे! खरंच लिहिते!!’

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

दर्द के रिश्ते...

सखे, पाऊस मला खूप आवडतो. अगदी, तिच्यासारखा. पाऊस अनेकांना अनेक अर्थांनी आठवत असतो.  पाऊस, ती आणि मी यांच्यात वेगळंच नातं आहे; दु:खाचं.  तुला गंमत वाटली असेल ना हे मी सगळं तुला का ऐकवतोय?. अगं, आमचे दोघांचे वाद व्हायचे पाऊस यायच्या आधी आणि नंतरही. पाऊस पहिल्यांदा चिंब भिजवून गेला. तिच्यासोबतच्या सगळ्या आठवणी परत देऊन गेला. तिच्यासोबतचा प्रत्येक शब्द, प्रत्येक क्षण असा थेंबा थेंबांतून बरसवून गेला. तिची आणि माझी भेट त्याच्या सोबतीनेच झाली होती. पहिली मिठी, पहिलं चुंबन, पहिलं भांडण या सगळ्याचा साक्षीदार हा पाऊस आहे. तिची पहिली भेट आणि शेवटची भेट, पहिल्या पावसातच झाली होती. प्रत्येकवर्षी येणारा पाऊस मला असा शेवटपर्यंत छळत राहणार बहुतेक.

सखे, एरव्हीसुद्धा मला आवडणारा पाऊस, तिच्यामुळे खूपच आवडतो. तिलाही आवडतो. नाही, असं नाही. पण, ती त्याचा राग करते. तो नाही आला तरीही रागावते आणि खूप आला तरीही रागावते. मला मात्र त्याचं वाट पाहायला लावणं आणि बेधुंद बरसणं दोन्ही आवडतं. अगदी, तिच्या प्रेमासारखं. कुठल्यातरी एका शायरानं म्हटलंच आहे,

प्रेम तुझे पावसासारखे आहे सखे
मरतो दुष्काळातही अन् पुरातही

ती खूप हळवी होती. पाऊस नाही आल्याने होणारी त्राही त्राही तिला कधीच पाहावत नव्हती. मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या झोपड्या तिला विचलित करून सोडायच्या. वास्तविक नेमेचि येणार्‍या पावसाळ्यात या गोष्टी घडतच राहायच्या. पण दरवर्षी असं व्हायचं आणि दरवर्षी आमचं भांडण व्हायचं. ती पावसाबरोबर मलाही हृदयशून्य, कठोर म्हणायची. ’पावसाला हृदय असतं का गं?’ या प्रश्‍नावर आणखीनच चिडायची. तिला पाऊस आवडायचा. पण, तिला हवा तसा तो कधी बरसलाच नाही. मलाही ती खूप आवडायची. पण, मला हवी तशी ती कधी माझी झालीच नाही. हे आमच्यामध्ये असलेलं अंतर, आपल्या अंतरात ठेवून हा पहिला पाऊस मला उभा आडवा छळतो. तरीही खूप आवडतो, अगदी तिच्यासारखा.

सखे, अचानक आलेल्या पावसाने चिंब भिजवून टाकलं. सगळे कपडे यथासांग ओले झाले. घरी परतलो. मस्तपैकी कॉफी करून घेतली. तिची आठवण मनात घोळवत गाणी ऐकत होतो. हरीहरन यांनी गायिलेली एक गझल लागली. कुठेतरी झालेल्या लाइव्ह कार्यक्रमाचं ते ध्वनिमुद्रण होतं. झाकिर हुसेनांचा तबला आणि हरिहरन यांचा आवाज.  ’दर्द के रिश्ते न कर डाले उसे बेकल कहीं' ही गझल तू मुद्दाम ऐक. ही गझल कुणी लिहिली आहे हे माहिती नाही, पण फारच सुंदर गझल आहे. ही गझल मी तिलाही ऐकवली होती, आमचं भांडण झालं तेव्हा. ते भांडण जसंच्या तसं आठवलं. 

सखे, विचाराला अहंकार चिकटला की भांडणं होतात. 

विचार, हा ’विचार’ म्हणून केला तर आपण तो साकल्याने करू लागतो. पण, जेव्हा हाच विचार, ’माझा विचार’ होतो तेव्हा त्याला अहंकार चिकटलेला असतो. त्यापेक्षा वेगळा विचार बरोबर असू शकतो हे आपण मनातही आणत नाही.  

सखे, आटत चाललेल्या विहिरी, पाण्यासाठी करावी लागणारी वणवण या बातम्या ऐकून ती खूपच विचलित व्हायची. स्वत:च्या घरात चोवीस तास पाणी असतानाही, पाण्याचा थेंब मिळत नाही अशांसाठी तिच्या डोळ्यात पाणी यायचं. मग, पाय आपटत आपटत ती माझ्याकडे यायची. थेट मलाच प्रश्‍न विचारायची, 

’कुठे गेला तुझा तो पाऊस? एकेका थेंबासाठी मैलो न मैल चालत जातात माणसं. त्याला दया येत नाही?’

पाऊस काही माझ्या सांगण्यावरून कोसळत नाही. पण, तो मला आवडतो म्हणून तिची बोलणी मला खावी लागायची.  तिच्या भाबडेपणाला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं.  रक्ताच्या नात्यातही एवढा कळवळा नाही सापडत. नात्यांमध्ये संबंध कोणते व कसे असावेत हे व्यवहार ठरवतो, नाती नाहीत. नाती या शब्दाचा अर्थच बहुधा ना ती म्हणून ’नाती‘ असा झाला असावा. फक्त व्यवहारापुरती असतात, एरव्ही नसतात म्हणून नाती. बातम्या ऐकून आपल्यालाच पाणी मिळत नाही अशा पद्धतीने ती कळवळायची म्हणून थोडं विचित्र वाटायचं.  मुसळधार पावसामुळे घरात शिरलेलं पाणी, वाहून गेलेल्या झोपड्या तिला अशाच विचलित करून जायच्या. वास्तविक दु:ख करण्यासाठी यातलं कुणीही तिच्या नात्याचं नव्हतं. दुसर्‍याचं दु:ख माणसाला कायम आपल्या दु:खापेक्षा कमीच वाटत असतं. म्हणूनच इतरांच्या दु:खाचा आपण किती त्रास करून घ्यायचा याचेही ठोकताळे आपण ठरवलेले असतात. नात्यातली दु:ख सगळ्यानाच समजतात पण ही दु:खाची नाती समजायला थोडी अवघड होती. मग, मी म्हणायचो, बाई गं, तू बातम्या बघू नकोस, सिरियली बघ. ती आणखीन चिडायची.

सखे, तिचं हे भावुक होणं मला फार आवडायचं. या गोष्टी होतच असतात असं म्हणून त्या सोडून देणं, तिला पटत नसे. या तिच्या भावविश्‍वातून तिला बाहेर काढणं अनेकदा खूपच कठीण होत असे. लहान मूल जत्रेत रमतं, तेव्हा त्याला रमू द्यायचं असतं. फक्त त्याचं बोट सोडायचं नसतं. तिच्या उसन्या दु:खातून ओढून बाहेर काढणं तिला आणखी यातना देणारं ठरलं असतं. ती माझ्यापासून दूर जाईल अशीही भीती वाटायची. तिचा हात हाती धरून लांब कुठे तरी निघायचो. तिची लांबसडक बोटं स्वत:च्या बोटात गुंफून घ्यायचो. चांदण्यात गुंडाळलेलं रेशीम हाती यावं तसा तिचा तो मृदू मुलायम हात हाती आला की सुखाच्या स्वर्गात घेऊन जायचा. त्याचवेळी नेमका पाऊस कोसळायचा. ती बिलगायची. चिंब भिजायची माझ्यासोबत. नको असलेलं बेरंग आयुष्य हवंहवंसं वाटायचं. तिनं कधीच सोडून जाऊ नये असं वाटायचं. 

सखे, आपल्याला जसं वाटतं तसं घडत नाही. तिची प्रत्येक कृती, भेट हे आपल्यावरचं तिचं प्रेम आहे असं मला वाटायचं. तिच्या डोळ्यातून ते नेहमी जाणवायचं. सगळ्या बारीक सारीक गोष्टी ती सांगायची. खूप बोलायची, खूप भांडायची. पहिल्यांदा एखादी गोष्ट केली की ती आणून दाखवायची. ड्रेस असो की ड्रेसिंग केलेला खाद्यपदार्थ. आयुष्याची प्रत्येक चव ती माझ्याकडून चाखायची. न विसरता, हवं, नको ते सगळं सांगायची.  फक्त तिचं माझ्यावर प्रेम नाही, हे सांगायला विसरली. आता पुन्हा आपली भेट नाही, हे सांगून ती निघाली तेव्हा मी कोसळलो. आपण तहानेने गतप्राण व्हावे आणि पाऊस भलतीकडेच धो धो कोसळावा, असंही वागतो पाऊस कधी कधी. अगदी तिच्यासारखा.


चित्रस्रोत : आंतरजाल

शनिवार, ८ जुलै, २०२३

पूजेतल्या पानाफुलां

सखे, आज तुझ्या चेहर्‍यावर विलक्षण मिश्किल प्रश्‍नांची नांदी मला दिसत आहे. खूप वेळ श्‍वास कोंडून ठेवून एकदम सोडला, तर चेहर्‍यावर जसे भाव प्रकटतील तसेच काहीसे भाव तुझ्या चेहर्‍यावर आहेत. 

‘काही नाही रे. एक वाक्य वाचलं एका पुस्तकात आणि असं का होतं या विचारात मन गढून गेलं. माझ्यावर बेतलेले प्रसंग आठवले. काहीच सुचेना. वाटलं तुला विचारावं. पण, तुझं ते लांबलचक स्पष्टीकरण, अतर्क्य बोलणं सगळं डोक्याच्या फार वरून जातं. तरीही तुझीच वाट पाहात होते. इतक्यात तू आलास.’

काय विचारायचं काय होतं सखे, आणि कुठलं असं वाक्य वाचलस ज्यामुळे तू एवढी विचारात गर्क झालीस?

‘माणसाच्या चांगल्या गोष्टी पाण्यावर लिहिल्या जातात आणि वाईट गोष्टी लोखंडावर कोरल्या जातात, असं काहीसं ते वाक्य होतं. एखाद्यासाठी आपण खूप गोष्टी कराव्यात, पण एखादीच राहून जावी. त्यानही नेमकी न केलेली गोष्टच लक्षात ठेवावी व केलेल्या सगळ्याचा त्याला विसर पडावा. हे असे मैत्रीत, प्रेमात निदान माझ्याबाबतीत तरी अनेकदा घडून गेले आहे. असं का होतं रे?’

सखे, तू आपण केलेल्या आणि न केलेल्या गोष्टींना फार महत्त्व देतेस म्हणून तुला त्याचा त्रास होतो. त्याच्या लक्षात न केलेल्या गोष्टी राहतात आणि तुझ्या लक्षात केलेल्या. आपण मोजदाद करण्यामध्ये केलेल्या गोष्टी घालवून बसतो. इतरांच्या लक्षात राहतं किंवा राहात नाही हा त्यांच्या स्मृतीचा दोष आहे. बरेचदा हे असं स्मरण किंवा विस्मरण सोयीनुसार घडतं. या सगळ्या गोष्टींची मोजणी करणं सोडलस की तुला खर्‍या मैत्रीची, प्रेमाची ओळख पटेल. तुझ्या चेहर्‍यावरून लक्षात येतय की तुला नाही पटली ही गोष्ट. ठीक आहे, माझं नको ऐकूस बा. भ. बोरकरांचं ‘नाही पुण्याची मोजणी’ हे प्रासादिक गीत ऐक. स्थितप्रज्ञता कशी असावी याचं उत्कट प्रत्यंतर ज्या काव्यातून येतं, ते हे काव्य. अभिषेकीबुवांचा धीरगंभीर आवाज. सखे, तुला सांगतो जेव्हा मृत्यू येईल ना, तेव्हा हेे कान शाबूत असावेत आणि ‘नाही पुण्याची मोजणी’ व ‘इतना तो करना स्वामी’ ही दोनच गाणी ऐकायला मिळावीत. आयुष्याचं सार्थक होईल. गंमत म्हणजे दोन्ही गाणी अभिषेकीबुवांनीच गायली आहेत. 

सखे, पाप पुण्य या फार मोठ्या गोष्टी झाल्या. आपण केलेलं चांगलं काम आणि वाईट काम दोन्ही आपल्याला त्रास देत राहतात. केलेल्या कृतीचा चांगलेपणा आणि वाईटपणा आपणच ठरवत असतो. हे त्या त्रास होण्यामागचं कारण आहे. कृती चांगली की वाईट हे आपण प्रत्यक्ष कृती, त्यामागचा हेतू आणि झालेल्या परिणामांवरून ठरवतो. चांगल्या कृतीची मालकी आपण आपल्याकडे आणि वाईट कृतीला आपल्याशिवाय सगळे जबाबदार अशी पद्धतशीर विभागणी करून टाकतो. सगळ्या चांगल्या किंवा बरोबर कृतीची मोजणी करीत बसतो. वाईट, चुकीच्या गोष्टी आणि हातून न घडलेल्या श्रेयस्कर गोष्टींची टोचणी मनाला लावून घेतो. इथेच आपली फसगत होते. केलेल्या चांगल्या कामांचं संचित म्हणजे पुण्य आणि हातून घडलेल्या वाईट कर्मांचं संचित म्हणजे पाप. जेवढी पुण्याची मोजणी घातक तेवढी पापाची टोचणीही घातकच.

सखे, प्रिय गोष्टी करण्यासाठी आणि श्रेयस्कर गोष्टींसाठी आपण फार धावाधाव करतो, जिवाचा आटापिटा करतो. माणूस तारुण्याचा उंबरठ्यापर्यंत प्रेयसाच्या मागे धावतो. प्रेयस म्हणजे जे प्रिय आहे ते करणं. तारुण्याचा आवेग थोडासा ओसरला की, श्रेयसाच्या मागे लागतो. श्रेयस म्हणजे ज्या गोष्टी केल्याने श्रेय मिळतं अशा गोष्टी. या वयात माणूस श्रेय मिळत असेल तर अप्रिय गोष्टही करतो. या दोनच अवस्थांमध्ये आयुष्य संपून जातं. या दोनच गोष्टींमुळे माणसाचा विकासही होतो. तिसरी एक महत्त्वाची अवस्था म्हणजे निश्रेयस. प्रियही नाही आणि श्रेयस्करही नाही, तरीही ते करणे आवश्यक आहे म्हणून जे काही केलं जातं त्याला निश्रेयस असं म्हणतात. ते करण्यामध्ये आपला कसलाच लागभाग नसतो, कशाचा पाठलागही नसतो. ही स्थितप्रज्ञ होण्याची पहिली पायरी आहे. हा विचार कायमचाच आचरणात आणला की आयुष्य फुलांच्या परागासारखं होतं.

सखे, एकदा ही स्थिती आली की मग आपल्या नावाचं, रूपाचं, आपल्या कृतीचं सुख दु:ख वाटणं बंद होतं. बाह्य लक्षणाने हीच स्थिती कोडगेपणाचीही असते. त्यातला फरक लक्षात आला की फसगत होत नाही. निसर्ग आपल्याला देताना कधी त्याची मोजणी करीत नाही. तसच, आपल्यापासून हिरावून घेतल्याची टोचणीही त्याला नसते. आपल्या हातून घडणार्‍या प्रत्येक गोष्टीकडे साक्षीभावाने पाहायला शिकले पाहिजे. असे सहजतेने घडू लागले की, आपण आकाशस्वरूप होतो. आयुष्य धूपाप्रमाणे सुगंधित होऊन जातं.

सखे, आपल्या बाबतीत जन्म आणि मृत्यू यांचा सोहळा एकांगी असतो. या दोन्ही सोहळ्यात आपला सहभाग हा ते सोहळे आपल्यासाठी आहेत एवढ्यापुरताच असतो. जन्म झाल्यानंतर आपल्याला पाळण्यात ठेवतात, नाव ठेवतात, बारसं साजरं करतात ते सर्व आपल्याला दिसतं, पण समजत नाही. आपल्या मृत्यूनंतर होणारे सोहळे आपल्याला दिसतही नाहीत आणि समजतही नाहीत. जन्माच्या वेळी आपण तो सोहळा समजण्याच्या खूप अलीकडे असतो व मृत्यूच्या वेळी आपण तो सोहळा समजण्यापलीकडे गेलेलो असतो. पूजेसाठी देवावर वाहिलेली पानं फुलं काही देवावर वाहिली म्हणून दुसर्‍या दिवशी ताजी नाही राहात. ती शिळीच होतात. पण सखे, तीच शिळी पानं फुलं आपण  प्रसाद म्हणून स्वीकारतो. देवावर वाहिलेल्या त्या फुलांचा मृत्यू सर्वांगाने परिपूर्ण होतो. स्थितप्रज्ञता ही अवस्थाच अशी आहे की, इथे एकदा माणूस पोहोचल्यावर त्याचा जन्म आणि मृत्यू सर्वांग सोहळा होतो.