रविवार, ६ मार्च, २०२२

देवबाप्पा बघतोय....

देवाचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व आपण लहानपणीच घालवून बसलो आहोत. आपल्या मुलांच्या बालपणातूनही देव नाहीसा करत चाललो आहोत. ‘देवबाप्पा बघतोय’ ही केवळ भीती नाही, ‘देवबाप्पा बघतोय’ हा विश्वासही आहे, हेच आपण विसरतो. तो आहे, याची भीतीही असायला हवी आणि तो आहे, हा विश्वासही आवश्यक आहे.










देव म्हणजे काय रे? तो खरोखरच असतो का?’


सखे, तुला हे असं कधीपासून होतंय? काल परवापर्यंत विज्ञाननिष्ठ वगैरे होतीस ना तू? कपाळावर कुंकू लावायलाही लाज वाटायची तुला. आज अचानक एवढी जिज्ञासा?


‘खवचटपणा बंद कर. तू प्रश्न न विचारता उत्तर देणार आहेस का?’


सखे, मी उत्तर देईन गं. पण, तुला ते बोअरिंग फिलॉसॉफी वगैरे वाटणार असेल तर मग कठीणच आहे.


‘देतोसच तू बोअरिंग, न कळणारे अवघड शब्द वापरून बोजड भाषेतील लेक्चरे. अनेकदा पटत नाहीत मला. पण, तू गाणी ऐकायला सांगतोस ते जाम आवडतं. तू सोप्या शब्दांत सांग ना.’


सखे, तुला पुरुषसूक्तातला पहिलीच ऋचा ऐकवतो. 

ॐ स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः । स॒ह॒स्रा॒क्षः स॒हस्र॑पात् ।

स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वा । अत्य॑तिष्ठद्दशाङ्गु॒लम् ॥


आता त्याच अर्थाची मोरोपंतांची आर्याही ऐक

भूजल तेज समीरख रवि शशि काष्ठादिकीं असे भरला।

स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला ॥ 

संस्कृतातील ऋचेचा अर्थ तुला कळणार नाही. मोरोपंतांच्या मराठीतल्या आर्येचा अर्थही कळणे कठीणच जाईल. न कळण्यासाठी दोष ऋचेच्या कर्त्यांना द्यायचा, आर्या रचणार्‍या मोरोपंतांना द्यायचा की, तो अर्थ शोधण्याची तसदी न घेणार्‍या आपणाकडे घ्यायचा याचा विचार ज्याचा त्याने करावा. शब्दार्थ शोधण्याचा रस्ता आपण ‘क्रॉस’ करणे सोपे की, ‘ओलांडणे’ सोपे हे ज्याचे त्याने ठरवावे. ‘ओलांडणे’ समजत नसेल आणि ‘क्रॉस करणे’ समजत असेल तर दोष रस्त्याचा कसा?


‘बर्वेबुवा पुरे आता. देतोस माझ्या प्रश्नाचे उत्तर की, जाऊ?’


सखे, तू रागावल्यानंतर फारच सुंदर दिसत असलीस तरी रागावू नकोस आणि निघूनही जाऊ नकोस. दोष माझ्या सांगण्यात आहे, हे मी अमान्य करत नाही. जसं जमेल तसं सांगतो. तरीही तू ऐकतेस, मला सहन करतेस हेच  मोठं आहे. 

देव ही मानवनिर्मित संकल्पना नाही. माणसाच्या संकल्पनेतून देवाची निर्मिती झाली नाही. माणूस नव्हता तेव्हाही देव होता आणि नसेल तेव्हाही देवच असेल. विश्वातच असलेल्या रचनेला माणसाने आपल्याला समजावे म्हणून किंवा समजेल अशा एका  संकल्पनेत बसवले, ज्याचे नाव ‘देव’. एका अर्थाने मर्यादित केले. ज्या रचनेला आकार नाही, त्याला साकार केले. पण, समजण्यास सोपे केले. या वैश्विक रचनेला समजण्याचे दोन मार्ग आहेत. एक ज्ञान आणि दुसरा भक्ती. ज्यांच्याजवळ ज्ञान आहे, त्यांनी ती रचना ज्ञानाने समजून घ्यावी आणि ज्यांच्याजवळ भक्ती आहे, त्यांनी ती भक्तीने समजून घ्यावी. 


‘ज्ञानाने जे समजेल ते ज्ञान नसलेल्यालाही भक्ती केल्याने समजेल, हे पटत नाही. ज्ञान हा बुद्धीचा भाग आहे आणि भक्ती श्रद्धेचा प्रांत आहे. विज्ञान देव मानीतच नाही. मग, विज्ञाननिष्ठ, ज्ञानवंत आणि भक्त यांना देव कसा समजेल?’ 


सखे, हाच प्रश्न उद्धवाने (महाभारतकालीन) कृष्णाला विचारला होता, जेव्हा कृष्णाने त्याला देव समजण्यासाठी गोपींच्याकडे जायला सांगितले. कृष्ण सांगतो म्हणून उद्धव गोपींच्याकडे जाऊन राहिला. ज्या निर्गुण, निराकाराला  उद्धवाने ज्ञानाच्या माध्यमातून जाणले होते त्याच देवाला निरक्षर, अशिक्षित गोपी भरवत होत्या, त्याच्यासोबत खेळत होत्या, भांडत होत्या, त्याच्यावर प्रेमही करत होत्या. सर्व मानवी भावनांमधून आणि नात्यांमधून त्यांना विश्वाची रचना समजली होती. ज्ञानाच्या विरुद्ध भक्ती नाही. अहंकारविरहित ज्ञान म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे, टिळा, गंध, उपासना नव्हे. ज्ञान वजा अहंकार म्हणजे भक्ती. भक्त, ज्ञानी असण्यापेक्षाही ज्ञानी, भक्त असणे फार महत्त्वाचे आहे. आपण आजकाल सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत नाही. आपण ज्ञानी आहोत, सश्रद्ध व भक्त नाही. म्हणूनच, आपल्याला देव समजत नाही.

सखे, देव हा शब्दच मुळात दिव् या धातूपासून तयार झाला. ‘दिव्’ म्हणजे प्रकाशणे, चकाकणे.  देव याचे इतर संस्कृतीमध्ये समानार्थी शब्द पाहिले तर आश्चर्य वाटतं. संस्कृत ’देव’, प्राचीन नॉर्स ’तिवार’ लॅटिन ’देयूस’, लिथुनिअन ’दिवास’, इराणी ’दिअ’, केस्टिक- ’दिओस’, गॅलिक ’दिओग्नत’.  निसर्गपूजक सर्व संस्कृतींमध्ये हे देवासाठी एकसमान शब्द काय सांगतात? संपूर्ण जगात निसर्गपूजक व विश्वरचना जाणणार्‍या संस्कृतींचे सहअस्तित्व होते. प्रेषितांच्या पंथांनी जगभरातील या संस्कृती संपवल्या. उंच पिकांतून डोलणारा आणि बाळमुखातून बोलणारा देव केवळ प्रेषितांच्या माध्यमातून सांगू लागला आणि आपल्यापासून दूर गेला. इतका दूर की त्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका वाटू लागली. त्याची भीतीही गेली आणि त्याच्यावरचा विश्वासही नष्ट झाला. त्याला समजणे कठीण, दुरापास्त झाले.

सखे, उपनिषदांमध्ये एक कथा आहे. शिष्य गुरूला विचारतो 'देव, ज्ञान म्हणजे काय?' गुरू सूर्याकडे बोट दाखवतो. रात्र होते. शिष्य विचारतो, 'आता ज्ञान म्हणजे काय?' गुरू चंद्राकडे बोट दाखवतो. अमावास्येच्या रात्री शिष्य पुन्हा तोच प्रश्न विचारतो. गुरू मिणमिणत्या दिव्याकडे बोट दाखवतो. थोड्यावेळाने वार्‍याचा झोत येतो आणि दिवा विझतो. शिष्य विचारतो, 'गुरुजी सूर्य दाखवून झाला, चंद्र दाखवून झाला शेवटी दिवाही दाखवलात. आता दिवा विझला. अंधार झाला आहे. आता कुणाकडे बोट दाखवणार?' गुरू त्याला विचारतात, 'वत्सा, अंधार आहे हे कशामुळे समजलं? अंधार आहे हे ज्याच्यामुळे समजलं तेच आत्मज्ञान, तेच ब्रह्म, तोच देव.' हेच सूत्र गौतम बुद्धांनी ‘आत्मदीपो भव:’ म्हणत मांडले आहे. या वैश्विक जाणिवेलाच चैतन्य, ब्रह्म अशी अनेक नावे वेगवेगळ्या संदर्भात आहेत. ही वैश्विक जाणीव सर्वत्र आहे. 


‘देव देवळात आहे, तर तो सर्वत्र कसा असू शकेल आणि देव सर्वत्र आहे, तर त्याला देवळातच का बंदिस्त करायचे?’ 


सखे, आपण त्याला कसे पाहतो, समजतो त्यावर ते अवलंबून आहे. निर्गुण, निराकार चैतन्य सर्वत्र आहे. ते ब्रह्म एकच आहे. जेव्हा आपण त्याला सगुण साकार पाहतो, तेव्हा देव, देवस्थान याला महत्त्व येते. देवस्थानात आहे, म्हणजे तो इतरत्र नाही, असा त्याचा अर्थ नाही. तो निर्गुण निराकारही आहे आणि सगुण साकारही आहे. तो सर्वत्र आहे, मग देवळात का जावे, हा प्रश्न विचारणार्‍याने आधी स्वत:ला विचारावे, ‘तो सर्वत्र आहे, याची जाणीव मला झाली आहे, की फक्त तर्क मांडायचा म्हणून मांडतोय?’ खरोखरच ही जाणीव जर झाली असेल तर देवळाचे प्रयोजन त्याच्यापुरते राहत नाही. देवळाच्या असण्यानेही फरक पडत नाही आणि नसण्यानेही पडत नाही. फरक पडत नसल्याने देवाची मूर्ती फोडण्याची आणि देवळे पाडण्याचीही गरज उरत नाही. आपण बुतपरस्त (मूर्ती पूजा करणारे) नाही याचा अर्थ आपण बुतशिकन (मूर्ती तोडणारे) झालेच पाहिजे, असे नाही. ज्ञानवंतांनी श्रद्धावानांचा आदर राखावा आणि श्रद्धावानांनी ज्ञानवंतांचा. 

सखे, लहानपणी आई सांगायची, ‘वाईट बोलू नकोस, देवबाप्पा ऐकतोय. चुकीचं वागू नकोस, देवबाप्पा बघतोय...’ माझ्याही नकळत मी या मला पाहणार्‍या, ऐकणार्‍या देवबाप्पाला शोधायचो. तो दिसला नाही, पण तो आहे याची भीतीही वाटायची आणि धीरही वाटायचा. पुढे पुढे जास्त अक्कल आली तशी, देवबाप्पा वगैरे काही नसतो. उगाच आपल्याला भीती घालण्यासाठी सगळं सांगितलं जातं अशी भावना दृढ होत गेली. विज्ञानाचं वारं अंगावरून गेलं आणि आमच्या देवभक्तीला लकवा मारला. आयुष्याच्या संध्याकाळी आता पुन्हा देवाचा शोध सुरू केला तेव्हा तोच देव विज्ञान, ज्ञान आणि श्रद्धा यापलीकडे जाऊन स्वत:च्या डोक्यात मोरपीस खोवून बासरी वाजवत बसलेला आढळला. 

सखे, आपण विज्ञाननिष्ठ असणे म्हणजे देवपूजेला विरोध करणे किंवा हीन समजणे, असा भ्रम जाणीवपूर्वक तयार केला आहे. म्हणूनच आपण देवपूजा करणार्‍या शास्त्रज्ञाची, विज्ञाननिष्ठाची टिंगल उडवतो. विज्ञानाच्या अभ्यासकाने देव मानणे हे महापाप समजतो. विज्ञाननिष्ठ किंवा नास्तिक म्हणतात, 'देव असल्याचा पुरावा द्या मग आम्ही देव मानू. अन्यथा देव आहे, ही आस्तिकांची केवळ श्रद्धाच आहे. त्याला पुरावा नाही.' त्याच न्यायाने देव नसण्याचाही पुरावा नाही. म्हणजेच नास्तिकांनी देव नाही, असे म्हणणे हीसुद्धा नास्तिकांची श्रद्धाच आहे, त्याला पुरावा नाही.  

श्रद्धा आणि ज्ञान एकमेकांच्या विरुद्ध नाही, ते एकमेकांना पूरक असलेले आत्मविकासाचे टप्पे आहेत.  हे ओलांडल्यानंतर देव, ब्रह्म, चैतन्य, विश्वरचना याची प्रचिती येते. त्यामुळे, आपल्या मानण्यावर देवाचे अस्तित्व नाही. मानले तरी देव आहेच, नाही मानले तरी देव आहेच. हे देवाचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व आपण लहानपणीच घालवून बसलो आहोत. आपल्या मुलांच्या बालपणातूनही देव नाहीसा करत चाललो आहोत. ‘देवबाप्पा बघतोय’ ही केवळ भीती नाही, ‘देवबाप्पा बघतोय’ हा विश्वासही आहे, हेच आपण विसरतो. तो आहे, याची भीतीही असायला हवी आणि तो आहे, हा विश्वासही आवश्यक आहे. 

सखे, चल आपण त्यांच्या आयुष्यात देवबाप्पाला पुन्हा आणू. आपणही त्यांच्यासोबत लहान होऊ. म्हणजे मग त्यातील कुणीही मोठे झाल्यानंतर एक प्रश्न विचारणार नाहीत.


‘कुठला?’


‘देव म्हणजे काय रे? तो खरोखरच असतो का?’