शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

भय इथले संपत नाही...






‘अनेकदा आपली भीती अनामिक असते. ती सांगता येत नाही...’

सखे, तू प्रेमात पडली आहेस असं म्हणतेस आणि घाबरतेसही. ज्याच्या प्रेमात पडली आहेस, त्याची भीती वाटते की, आई बाबांची?

‘तेच कळत नाही म्हणून तर तुझ्याकडे आले ना? सगळी जगावरची तत्त्वज्ञानं सांगतोस. आपले अनेक मित्रमैत्रिणी, ‘व्हेअर देअर इज नो वे देअर इज बर्वे’ असं म्हणत तुझ्याकडे येतात. तू त्यांचे प्रॉब्लेम सोडवतोसही. मी तर तुझी सखी आहे. मग, मला भीती कशाची वाटते हे तूच मला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकशील.’

घाल, माझे पाय माझ्याच गळ्यात घाल. वरून मी प्रचंड बोअर करतो, असं म्हणायलाही तू मोकळीच.  

‘रागावू नकोस ना रे! तुझी लांबलचक, जड भाषेतील तत्त्वज्ञानं जाम बोअर करतात. पण, तुझ्याकडे उत्तरे असतात, मार्ग असतो. उशिरा का होईना, पण तू सांगतोस ते पटतं.’

सखे, लोण्याचा स्टॉक संपला? मला सांगायला, शेअर करायला आवडतं हे खरं आहे. पण, प्रत्येकाला ते त्याच्या सोयीनेच ऐकायला आवडतं हेही तितकंच खरं. असो! हरकत नाही. ‘भय इथले संपत नाही..’ या ग्रेस यांच्या प्रासादिक कवितेला लतादीदींचे स्वरदान लाभले आहे. सखे, ती मुद्दाम ऐक. घाबरू नकोस त्या कवितेचे विवेचन करणार नाही. तेवढी माझी प्रज्ञा आणि प्राज्ञाही नाही. त्यातील शेवटची ओळ जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तेव्हा तू स्मरतेस. तुझे हे स्मरण, मला मरण येईपर्यंत काही जाणार नाही. 

‘नको ना रे मरणाविषयी बोलूस. मला भीती वाटते.’

सखे, तुला ही भीती अगदी लहानपणापासून वाटते. अंधाराची, वेगाची, गणिताची आणि अनेक गोष्टींची भीती. तुला कुठल्या गोष्टींची भीती वाटते हे सहज, नकळत माझ्यासमोर उघड व्हायचं. त्यानंतर तू अगदी मोकळेपणाने माझ्याशी खूप बोलायचीस. मीही तुला माझ्या पद्धतीने त्याचे त्याचे विवेचन करायचो, अनेक उपाय सांगायचो. तूही निर्भय होऊन मला खूप काही सांगायचीस. का कोण जाणे पण, तुला नंतर माझीच भीती वाटू लागली. कदाचित माझंच काही चुकलं असावं किंवा मग, ‘हया यक-लख्त आयी और शबाब आहिस्ता आहिस्ता’ असंही झालं असावं. काहीही असो, जे अंतर पडलं ते आजवर काही अंतरलं नाही. असो!

सखे, भीती हा प्राण्यांचा मूलभूत गुण आहे, ती ओळख आहे प्राणी असण्याची. ही भीती का वाटते, याची अनेक कारणे आहेत. ज्यांची कारणे आपल्याला आता सापडत नाहीत किंवा भीती कशाची वाटते हेच समजत नाही, त्यामागे आपल्या पूर्वजन्मीचे काही संकेत असतात. बहुतांश आपला मृत्यू ज्या कारणाने पूर्वजन्मी झालेला असतो, ते या जन्मात आपल्या भयाचे कारण असते. या जन्मात घाबरण्यासारखे ठोस कारण नसूनही किंवा तसे काही न घडताही एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्यामागे पूर्वजन्मात त्यामुळे आलेला मृत्यू हे कारण असू शकते. 

सखे, वयोमानाप्रमाणेही आपली भीती कमी जास्त होत जाते, बदलत जाते. सामान्यत: लहानपणी बहुतांशी गणिताची, कठीण विषयांची भीती वाटते. प्रयत्न केला तर हे कठीण विषय आपल्यासाठी सोपे होऊन जातात. कालांतराने लक्षात येतं की, आपण ज्या विषयांना घाबरत होतो ते तर खूप सोप्पे होते, नाहीतर आयुष्यात अजिबात उपयोगाचे नव्हते. भीती आपल्याला तो विषय येत नाही म्हणून असते असे नव्हे तर तो परीक्षेमध्ये ठरावीक वेळेत तो कसा सोडवायचा याची भीती असते. दुसरा एक मुद्दा मांडतो. आपण का कोण जाणे पण, विद्यालयीन अभ्यासक्रमात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध जोडला आहे. त्यामुळे साहजिकच नापास होण्याची, कमी गुण मिळण्याची भीती डोक्यात बसते. प्रत्येक विद्यार्थ्याचे शास्त्रीय मूल्यमापन करून त्याला उपजत कुठल्या विषयात गती आहे, त्याच विषयात त्याला पुढे नेण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. ट्रिगॉनोमेट्रीची प्रमेये सोडवण्याचा जो हट्टाग्रह आपण प्रत्येक मुलाकडून का करवून घेतो, ज्याचा उपयोग केवळ आणि केवळ तो एका विशिष्ट क्षेत्रात गेला तरच होतो, अन्यथा नाही. ‘सर्वांना सर्व शिक्षण’ ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. 

सखे, ज्याला ज्यात गती आहे, तेच शिक्षण त्याला सर्वार्थाने दिलं गेलं पाहिजे. अशी शिक्षण पद्धती गुरुकुल व्यवस्थेमध्ये होती. आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय, वैज्ञानिक पद्धतीने आपण कोवळ्या वयातच मुलांचे मूल्यमापन करू शकतो. पण, त्याउलट आपण आपण ज्या क्षेत्रात इच्छा असूनही जाऊ शकलो नाही किंवा ज्या क्षेत्रात आपण नाव कमावले आहे, तिकडेच मुलांना ढकलत आहोत. ती आयुष्यात अयशस्वी होतील, चांगली नोकरी मिळणार नाही, आयुष्य सेटल होणार नाही याची भीती आपल्याला असते. तीच भीती आपण त्यांच्या डोक्यात घालतो. ज्याला आपण जन्म दिला आहे, त्याच्यात काय उपजत गुण आहे, त्याचा वर्ण कुठला आहे, त्याला कशात गती आहे याचे मूल्यमापन आपण करतो का? 

सखे, आपण आपल्या मुलांना चुकूच देत नाही. ही चुका करण्याची, नापास होण्याची भीती, त्यांच्यात असलेले निसर्गदत्त गुण, कला दाबून टाकते. त्यांनी इच्छा व्यक्त करण्याआधीच सर्व काही त्यांच्यापुढ्यात हजर करतो. नकार ऐकण्याची सवयच लावत नाही. मग, पुढे हा नकार, अपयश पचवणे त्यांना शक्यच होत नाही. अपयश, नकार यांची कायम भीतीच वाटत राहते. अपयश आले तरीही आपण त्यातून मार्ग कसा काढावा, याचा विचारही होत नाही. पर्यायांचा विचार होत नाही. त्यामुळे, परिणामांची भीती वाटते. 

सखे, सगळ्या पर्यायांचा विचार केला आणि कुठलाच पर्याय परिणाम म्हणून स्वीकारला नाही तर आपण निर्भय होतो. निर्भय होणे म्हणजेच भीती नसणे आणि निष्काळजी असणे यात फरक आहे. करोना, ऑमिक्रोन याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. त्याचा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याचा विचार केला आणि तसं वागलं की, झालं. 

‘तू ना, पर्याय आणि परिणाम या तुझ्या संकल्पनेवर पेटंट लावून घे. किती वेळा ऐकवशील? तरीही ती कळत नाही. तिचा भीतीशी काय संबंध?’

सखे, चिडू नकोस ना. आता तुझंच उदाहरण घेऊ. तुझं प्रेम सफल होईल की, नाही ही भीती तुझ्या मनात आहे. आता आपण पर्यायांचा विचार करू. तो तुला फसवेल, आईबाबा लग्नाला परवानगी देणार नाहीत, आईबाबा आपलं काहीतरी बरंवाईट करून घेतील, ते आजन्म आपल्यासोबत काहीच संबंध ठेवणार नाहीत, असे असंख्य पर्याय प्रत्यक्षात घडू शकतात. यातील प्रत्येक पर्याय परिणाम म्हणून समोर आला तर आपण काय करायचं, तो परिणाम आपण कितपत स्वीकारू शकतो याचा पूर्ण विचार कर. पण, कुठलीच गोष्ट अशी होईल किंवा होणार नाही, असे स्वीकारू नकोस. यामुळे तू कुठल्याही परिस्थितीसाठी तयार होशील. निर्भय होशील. विचार केलेल्या पर्यायाशिवाय वेगळंच काही परिणाम म्हणून समोर आलं तरी त्याचं दु:ख होत नाही. उलट, ‘अरेच्चा! आपण याचा विचारही केला नव्हता’, असा विस्मय वाटेल. हे बुद्धिबळ खेळण्यासारखं आहे. हरलो तरी त्याचं दु:ख होत नाही. आपलं प्रत्येक हरणं नवीन चाल शिकवून जातं. त्याही पुढे जाऊन आपल्याला हरवणार्‍याचं कौतुक वाटतं. 

सखे, भीती आवश्यकही आहे आणि अनावश्यकही आहे. ‘मी कुणालाही घाबरत नाही’ असं म्हणणारा माणूसच सगळ्यात जास्त भित्रा असतो. घाबरणं वाईट, चुकीचं किंवा कमीपणा आणणारी गोष्ट नाही. आपण त्यासाठी तयार नसणं हे चुकीचं आहे. 

‘तुला एक विचारू?’

माझ्या होकारासाठी तू कधी थांबली आहेस? नको म्हटलं तरी विचारणारच आणि उत्तरासाठी हट्ट धरून बसणारच. 

‘तुला आठवतं, आपण तुझ्या खोलीत बसलो होतो. तू टेबलला हात लावून भिंतीला टेकून बसला होतास. मी हेतुपूर्वक तुझ्या हाताला स्पर्श केला होता. तू घाबरून लगेच हात काढून घेतलास. त्या क्षणी कुठली भीती वाटली होती तुला?’

अनेकदा आपली भीती अनामिक असते. ती सांगता येत नाही...





नोंद घेण्यासारखे : 

या लेखाच्या चित्रामध्ये वापरलेले सुलेखन माझे मित्र अमित वाघचौरे यांचे आहे.... 


शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

आनंदाचे डोही आनंदतरंग...



सखे, आपल्या आयुष्यात सुख हे प्राधान्यक्रमाने येतं. आपण जे जे काही करत असतो ते ते सर्व सुखासाठी करत असतो. स्वत: दु:खी होण्यासाठी कुणी प्रयत्न करीत नाही. असं असूनही सुख म्हणजे नक्की काय? याचा कुणीही गांभीर्याने विचार करीत नाही. म्हणूनच आपण नेहमी ’कशात तरी‘ सुख शोधतो. मुळात सुखी होणे म्हणजे काय, याचा विचार आपण सहसा करीत नाही. केवळ सुखी माणसाचे सदरे शोधत फिरतो. 

’जगात सदा सर्वकाळ सुखी असा कुणीच नसतो. दुसर्‍या बाजूने विचार केला तर सदा सर्वकाळ दु:खी असाही कुणीच नसतो. प्रत्येकाला आपलं दु:ख इतरांपेक्षा मोठ्ठं वाटत असतं.’

सखे, तूसुद्धा लागलीस की माझ्यासारखी प्रवचनं झोडायला. गंमत केली गं. तुझा विचार बरोबर आहे. 

’तुझं ऐकून ऐकून असा विचार आपोआप येत असेल कदाचित. समर्थ रामदास स्वामींनीही प्रश्‍न विचारलाच आहे, ’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ 

सखे, थोडासा वेगळा विचार मांडतो. चुकत असेनही कदाचित, पण ऐक. समर्थांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर आपण नकारार्थी घेतो. ’विचारी मना’ या दोन शब्दांनंतर आपण थांबतो आणि मग म्हणतो ’तूचि शोधून पाहे’. मनाला विचार, तूच शोधून पहा. म्हणजे तुला पटेल की, जगात कुणीच सुखी नाही, असा त्याचा अर्थ आपण घेतो. त्याऐवजी आपण विचारी या शब्दापाशी थांबलो, तर एक वेगळा विचार, निराळा अर्थ समोर येतो. समर्थ प्रश्‍न विचारतात आणि त्याचं उत्तरही देतात. जगात सर्वसुखी असा कोण आहे? याचं उत्तर विचारी असं समर्थांनी दिलं आहे. आणि वर पुन्हा सांगत आहेत की, आपण सांगतो म्हणून विश्‍वास ठेवू नकोस, स्वत: शोधून पाहा. विचार केला तर लक्षात येतं की, ज्याच्यासाठी आपण एवढी धडपड करतो, त्यात सुख नसतच. म्हणूनच आपला प्रवास सुखाकडून दु:खाकडे आणि दु:खाकडून सुखाकडे एकसारखा होत राहतो. आपण सुखी होतो, दु:खी होतो. पण कधी सुखरूप होण्याचा, आनंदी होण्याचा विचारही आपण करीत नाही. 

’एक मिनिट. तू ना काहीच्या काही बोलतोस. सुखी माणूस सुखरूप किंवा आनंदी नसतो असं तुला म्हणायचं आहे का? सुखात असलेला माणूस म्हणतो ना, मी सुखात आहे, मी आनंदात आहे.’

सखे, सुख वेगळं आणि आनंद वेगळा. नाही पटत. सुख याला विरुद्धार्थी शब्द दु:ख. तसाच आनंद याला विरुद्धार्थी शब्द सांग पाहू! सापडणारच नाही, कारण तो नाहीच. सुखामध्ये दु:ख अनुस्यूत असतं. सुखी झाला की समजावं तो दु:खी होणारच. आनंदामध्ये आनंदच अनुस्यूत असतो. दुसरं काहीच असत नाही. जे परिवर्तनीय असतं ते सुख आणि जो अपरिवर्तनीय असतो तो आनंद. अवघड होत चाललं आहे का? तुला तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकवतो. मुद्दाम ऐक. ’आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा अभंग लतादिदींच्या तोंडून ऐकताना वेगळाच अनुभव येतो. त्यात खळेकाकांची चाल म्हणजे, ऐकायला सोपी व नादमधूर. पण, त्यातले खाचखळगे गाणार्‍यालाच समजतात.  

सखे, मला वांगी आणि वांग्याचा कुठलाही खाद्यपदार्थ खूप आवडतो. भरलेली वांगी खाल्ली की, मला बरं वाटतं. सुख मिळाल्याचा आभास निर्माण होतो. वास्तविक वांगं खाल्ल्यामुळे सुख मिळालेलं नसतं, तर माझं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार शांत व स्थिर झाल्यामुळे मला सुख प्राप्त होतं. वांगं हे फक्त निमित्त असतं. वांगं खावं अशी वासना झाली की, त्याचा संकल्प मन करतं. बाजारात जावं, वांगी विकत घ्यावी, हे मनाचे संकल्प सुरू होतात. आत्ता जावं की उद्या, भाजीवालीकडे वांगी नसलीच तर, एटीएमपुढे लांबच्या लांब रांग असली तर, असे नाना तर्‍हेचे विकल्प मन करू लागतं. मनाचं कामच आहे संकल्प आणि विकल्प करणे. हो, नाही करता करता जायचा निश्‍चय होतो. बाजारातून वांगी आणल्यानंतर ते त्याची भाजी होऊन पानात पडेपर्यंत आपण अनेक अवस्थांमधून गेलेले असतो. पानात वाढलेल्या भाजीचा पहिला घास घेतल्याबरोबर मन, बुद्धी,चित्त आणि अहंकार शांत झालेल्या अनुभवास आपण सुख म्हणतो. चव बिघडली तर मन विचलित होतं. चव तीच असली आणि बायकोचा मूड बिघडला की आपलं चित्त बिघडतं. जे सुख त्या पदार्थातून अपेक्षित असतं ते मिळत नाही. कारण, अंत:करणचतुष्टय अशांत, अस्थिर असतं. 

सुख साधनांत किंवा विषयात नाही. अमुक एखादी गोष्ट केल्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होते असं वाटणं हा आपला भ्रम आहे. त्याहीपुढे जाऊन त्या गोष्टीत सुख आहे, असा दृढनिश्‍चय होणं ही भ्रांतीची परिसीमा आहे. 

’ज्यापासून सुख मिळतं, त्यात ते नसतं असं कसं म्हणतोस तू?’

सखे, समजा असं धरू की वस्तू किंवा विषय यामध्ये सुख असतं. तर जेवढी ती वस्तू आपल्या संग्रही जास्त तेवढं सुख जास्त मिळालं पाहिजे. ज्यात सुख आहे त्या विषयाचं सेवन जेवढं आपण जास्त करू तेवढं सुख आपल्याला जास्त मिळालं पाहिजे. प्रत्यक्षात तसं होत नाही. तुला माझ्यासारखीच कॉफी आवडते. तुझ्या म्हणण्याप्रमाणे कॉफी प्यायल्याने सुख मिळतं, म्हणून कॉफीत सुख आहे. मग, जेवढी तू कॉफी जास्त पिशील तेवढं सुख तुला जास्त मिळालं पाहिजे. तेही प्रत्येक वेळी. असं घडत नाही. कॉफी पिऊन पिऊन किती पिशील? एका मर्यादेनंतर कॉफीचं नाव काढलं तरी तुला मळमळायला लागेल. म्हणूनच कॉफीत सुख नाही, कॉफी पिण्यात सुख नाही. ज्याला आपण सुख म्हणतो, ते अंत:करण चतु:ष्टय आत्मसुखात लीन झाल्यानंतर येणारा तात्पुरता अनुभव आहे. 

सुख हे बाहेर नाही आपल्या अंत:करण चतु:ष्टयातच आहे, असा पक्का निश्‍चय झाला, की आपण सुखरूप होण्याच्या दिशेने आपोआप जाऊ लागतो. पण, शेकडा नव्याण्णव लोकांना हे पटत नाही. तुलाही ते अजिबात पटणार नाही. आपल्या गुणसूत्रांमध्येच ही धारणा पक्की बसलेली आहे की, ज्यामुळे सुख मिळतं, त्यातच सुख आहे. ते मिळवण्यासाठी अखंड धडपड सुरू राहते. साधनांचं सामर्थ्य संपलं, की दुसरं साधन शोधायचं. साधनांचा संग्रह करत रहायचं. एकातून एक असं न संपणारं चक्र सुरूच राहतं. लहानपणापासून म्हातारे होईपर्यंत आपण फक्त पळत राहतो. वयोपरत्वे सुखाची साधनं बदलत राहतात. कायम राहते ती तृष्णा. संसारात सुख, मुलाबाळांमध्ये सुख, पैशात सुख, घरादारात सुख. हे सगळं मिळवण्यासाठी पैसा. पैशासाठी काम, नोकरी. प्रत्येकाने एकदा तरी थांबावं आणि विचार करावा. ज्यासाठी पळत होतो ते मिळालं आहे? ज्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी आपण धडपडत आहोत, त्या मुलांना देण्यासाठी वर्तमानात आपल्याकडे वेळ आहे? ज्याक्षणी आपण थांबून या सगळ्याचा आढावा घेऊ, तेव्हा ते आपण सुखरूप होण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असेल. 

सखे, सुखी असणं वेगळं आणि सुखरूप असणं वेगळं. आपलं सुखी असणं कशावर तरी आधारित असतं. ते नसलं की आपण दु:खी होतो. मनासारखं अनुकूल घडलं तर सुखी होतो आणि प्रतिकूल घडलं तर दु:खी होतो. आपलं सुखी असणं साधनांवर अवलंबून असतं. चहात साखर हवी तशी पडली की सुखी आणि जरा कमी जास्त झाली की दु:खी. आयुष्यातील लहानातली लहान आणि मोठ्यातली मोठी, प्रत्येक गोष्ट आपण सुखाशी किंवा दु:खाशी जोडतो. या ना त्या कारणाने आपला मूड लगेच ऑफ होऊ लागला की समजावं आपण अजून सुखरूप झालो नाही. ’मी सुखी आहे’ इथपासून ’माझ्यात सुख आहे‘ इथपर्यंतचा प्रवास आपल्याला सुखरूप करत जातो. ’मी सुखी आहे’ आणि ’माझ्यात सुख आहे’ या दोन अवस्थांमधून पुढे गेल्यानंतर एकच अवस्था शिल्लक राहते, ती म्हणजे ’मीच सुख आहे’ याची जाणीव. इथे आपण सुखरूप होतो. ’मीच सुख आहे’ यातही कुठेतरी मी म्हणजे अहं शिल्लक राहतो. तोही निसटला की जे शिल्लक राहतं त्याला ’आनंद’ असं म्हणतात. तीच शांती, तेच ब्रह्म. वेगळं काही नाही.

सखे, आनंदात आनंद मिसळला तरीही आनंदच आणि आनंदातून आनंद वजा केला तरीही आनंदच शिल्लक राहतो. डोहाच्या तळापर्यंत, जे अथांग, अंतरंग असतं ते पाणी असतं आणि डोहाच्यावर उठणारे उथळ तरंगही पाण्याचेच असतात. तसंच या आनंदाच्या डोहाचंही आहे. आत बाहेर आनंदच आहे. दुसरं काही नाही. 

सखे, इथे सगळी धडपड, पळापळ थांबते. आपण स्थिर होतो, आपलं अंत:करण स्थिर होतं. जे मिळवायचं ते आधीच प्राप्त झालेलं असतं. याचा अर्थ बरेच प्रयत्नवादी निष्क्रियता असा घेतात. उलट आनंदी माणूस जेवढा क्रियाशील असतो, तेवढा सुखासाठी धडपडणाराही नसतो.  आनंदी माणूस आणि आपल्याच जगात वावरणारा वेडसर माणूस यात बाह्यांगाने काही फरक नसतो. अगदी तसाच कोडगा मनुष्य आणि स्थितप्रज्ञ यातही बाह्यांगाने काही फरक नसतो. दोघांचेही वर्तन सारखेच दिसते. फरक असतो तो दृष्टिकोनात.  दैनंदिन व्यवहार होतच राहतात. त्याच्या परिणामांचा कोणताच परिणाम आनंदी माणसावर होत नाही. आनंदी माणूस सुखाचा अव्हेर करतो असं नव्हे. सुखाला महत्त्वच देत नाही. मिळालं तरी आनंदी आणि नाही मिळालं तरी आनंदी. 

सखे, सुखापेक्षाही सुखाचं व्यसन वाईट असतं. सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायल्याने सुखाचा अनुभव येतो. पण, चहा प्यायल्याशिवाय सकाळच होत नसेल किंवा न पिण्यामुळे दिनचर्या बिघडत असेल तर समजावे, चहा पिणं हे आपलं ते व्यसन बनलं आहे. सुखाच्या अनुभवाला आपल्या क्रियाशीलतेशी जोडल्याने व्यसनाची निर्मिती होते. आमचे एक मस्त डिझायन मित्र आहेत. तोंडात चुना तंबाखूचे मिश्रण ठेवूनच काम करतात. मी त्यांना एकदा विचारलंही, साहेब, काय मिळतं हो यातून? ते म्हणाले, ’तुम्हांला नाही कळणार बर्वे. त्यातून ’किक’ येते‘. ते मिश्रण तोंडात ठेवलं की सुचतं, असा त्यांचा समज होता. त्याशिवाय त्यांना सुचत नाही, ही वस्तुस्थिती होती. हीच ’किक’ येण्यासाठी लागणारे मिश्रण, द्रव्य यांची मात्रा सेवनागणिक वाढत जाते. आपण स्वत:ला निर्व्यसनी म्हणवून घेणारी माणसं, ’सुख’ नावाच्या व्यसनामध्ये गुरफटलो आहोत. तेही इतके की, सुख हे व्यसन आहे, असंही आपल्याला वाटत नाही. ’आनंदाचे डोही आनंद तरंग’ म्हणणार्‍या तुकाराम महाराजांचं आयुष्य सुखाचं नव्हतं. पण, ते स्वत: आनंदी होते.